देशभरात कुठेही वाहन चालवा; बीएच सीरीज नंबर घेतला का? वाहनधारकांकडून प्रतिसाद
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 29, 2026 10:30 IST2026-04-29T10:29:45+5:302026-04-29T10:30:56+5:30
पूर्वी एका राज्यातून दुसऱ्या राज्यात गेल्यावर वाहनाची पुनर्नोदणी करावी लागायची. मात्र बीएच सीरिजमुळे हा त्रास टळतो. वाहनाचा क्रमांक बदलत नाही, त्यामुळे वेळ आणि खर्च दोन्ही वाचतात.

देशभरात कुठेही वाहन चालवा; बीएच सीरीज नंबर घेतला का? वाहनधारकांकडून प्रतिसाद
सांगली : देशात एका राज्यातून दुसऱ्या राज्यात नोकरी किंवा व्यवसायानिमित्त स्थलांतर करणाऱ्यांसाठी वाहन नोंदणी हा मोठा त्रास ठरत होता. ही प्रक्रिया सुलभ करण्यासाठी केंद्र सरकारने २०२१ पासून 'बीएच सीरीज' सुरू केली. त्यामुळे वाहनधारकांना राज्य बदलले तरी वाहन क्रमांक बदलण्याची गरज राहत नाही. जिल्ह्यातही या योजनेला प्रतिसाद मिळत असून, नोंदणीची संख्या हळूहळू वाढताना दिसत आहे.
राज्य बदलले तरी वाहन क्रमांक कायम
पूर्वी एका राज्यातून दुसऱ्या राज्यात गेल्यावर वाहनाची पुनर्नोदणी करावी लागायची. मात्र बीएच सीरिजमुळे हा त्रास टळतो. वाहनाचा क्रमांक बदलत नाही, त्यामुळे वेळ आणि खर्च दोन्ही वाचतात.
काय आहे बीएच सीरीज नंबर?
बीएच म्हणजे 'भारत सीरिज' नोंदणी. ही एक विशेष वाहन नोंदणी प्रणाली असून, केंद्र सरकारने २०२१ मध्ये सुरू केली. या नंबरमुळे वाहनधारकाला देशातील कोणत्याही राज्यात वाहन वापरण्याची मुभा मिळते.
कुणासाठी उपयुक्त आहे बीएच सीरिज ?
बीएच सीरीज ही केंद्र सरकारचे कर्मचारी, राज्य सरकारी कर्मचारी, संरक्षण दलातील कर्मचारी, खासगी क्षेत्रातील अशा कंपन्यांचे कर्मचारी, ज्यांची कार्यालये चार किंवा अधिक राज्यांत आहेत, अशा व्यक्तींसाठी उपयुक्त ठरते.
पाच वर्षांत किती वाहनांना बीएच नंबर ?
जिल्ह्यात २०२१ पासून बीएच सीरिजला चांगला प्रतिसाद मिळत आहे. गेल्या पाच वर्षात ४०९ जणांनी बीएच सीरिजमध्ये वाहनांची नोंदणी केली आहे. यात ७० दुचाकी व स्कूटर, तर ३३९ चारचाकी वाहनांचा समावेश आहे.