जिल्हा बँकेच्या सभेत ‘दादा-बापू’ वाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2015 00:05 IST2015-09-23T22:11:55+5:302015-09-24T00:05:54+5:30

अहवालात छायाचित्राची मागणी : दिलीपतात्यांकडून वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न

'Dadasaheb Bapu' debate in District Bank meeting | जिल्हा बँकेच्या सभेत ‘दादा-बापू’ वाद

जिल्हा बँकेच्या सभेत ‘दादा-बापू’ वाद

सांगली : जिल्ह्याच्या राजकारणात कधीकाळी वसंतदादा पाटील व राजारामबापू पाटील यांच्यातील राजकीय वाद गाजला होता. त्याचे पडसाद अधुनमधून विविध संस्थांत उमटत असतात. सध्या वाळवा पंचायत समितीच्या सभागृहाच्या नामकरणाचा वाद रंगला असतानाच, बुधवारी जिल्हा बँकेच्या वार्षिक सभेतही त्याचे पडसाद उमटले. शिराळ्यातील एका सभासदाने बँकेच्या वार्षिक अहवालात दादांचे छायाचित्र असावे, अशी अपेक्षा व्यक्त केली. तोपर्यंत वाळव्याच्या एका सभासदाने राजारामबापूंच्या छायाचित्राचाही आग्रह धरला. हा वाद रंगण्यापूर्वी अध्यक्षांनी त्यावर पडदा टाकला. वसंतदादा पाटील आणि राजारामबापू पाटील यांच्यामधील राजकीय संघर्ष संपूर्ण महाराष्ट्राला सर्वज्ञात आहे. या वादाला वरचे वर उजाळा देण्याचे काम दादा, बापू गटाचे समर्थक करीत असतात. सध्या वाळवा पंचायत समितीच्या नवीन इमारतीमधील सभागृहाला राजारामबापूंचे नाव देण्याच्या ठरावावरून वाद रंगला आहे. वसंतदादांच्या नावे असलेले जुने सभागृह पाडले जाणार असल्याने दादांचे नावच जमीनदोस्त होणार आहे. वाळवा तालुक्यात दादा-बापूंच्या नावावरून वाद रंगला असताना, बुधवारी जिल्हा बँकेतही या जुन्या वादाला पुन्हा उजाळा देण्यात आला.
बँकेच्या वार्षिक अहवालात केवळ आमदार जयंत पाटील यांच्यासह बँकेचे अध्यक्ष, उपाध्यक्ष व संचालकांची छायाचित्रे आहेत. माजी गृहमंत्री आर. आर. पाटील यांनाही अहवालात आदरांजली वाहण्यात आली आहे. शिराळा येथील विलास पाटील या सभासदाने वार्षिक अहवालात वसंतदादा पाटील यांचे छायाचित्र समाविष्ट करावे, अशी मागणी केली. वसंतदादांनी बँक सक्षमपणे उभी केली आहे. त्यांचे योगदान मोलाचे आहे. त्यामुळे या मागणीचा विचार व्हावा, असे मत व्यक्त केले. त्यांच्या या वक्तव्यावर संचालक विशाल पाटील व इतर काँग्रेसचे संचालक व्यासपीठावर टाळ्या वाजवत होते. त्याचवेळी या सभासदाला अध्यक्ष दिलीप पाटील यांनी रोखले. हा सभासद दुसरा मुद्दा मांडत असताना त्याला सभेत बोलू दिले नाही. तुम्हीच एकटे किती वेळ बोलणार, दुसऱ्या सभासदांनाही संधी मिळावी, असे म्हणत त्यांच्याकडील ध्वनिक्षेपक काढून घेतला.
तोपर्यंत येलूर येथील सभासद युवराज सूर्यवंशी यांनी, सहकार क्षेत्रात राजारामबापू पाटील यांनी मोठे काम केले आहे. त्यांचेही छायाचित्र अहवालात असावे, असा आग्रह धरला. हा वाद रंगण्याची चिन्हे दिसू लागताच, दोन्ही सभासदांना खाली बसविण्यात आले. (प्रतिनिधी)


सभासद काय म्हणाले...
रघुनाथ गायकवाड : मध्यम मुदतीच्या कर्जासाठी वाडवडिलांपासूनचे फेरफार मागितले जातात. त्यामुळे हे कर्ज मंजूर करून घेताना सभासदांना यमयातना होत आहेत. ऊस पिकाला कारखान्याचे हमीपत्र द्यावे लागते. द्राक्ष, मका, हळद लावल्यावर हमीपत्र का मागत नाही?
तानाजी शिंदे : जिल्हा बँकेने सोसायट्यांमार्फतच शेतकऱ्यांना कर्जपुरवठा करावा. राजकीय नेत्यांच्या थकबाकी वसुलीसाठी बँकेचा वरिष्ठ अधिकारी द्यावा.
नामदेव चव्हाण : एखाद्याचे सामान्य कर्ज थकले, तर इतर सभासदांना कर्ज दिले जात नाही, हा नियम बदलावा.
प्रभाकर पाटील : बँकेच्या ठेवीदारांचे दोन प्रतिनिधी संचालक म्हणून घ्यावेत. गैरव्यवहार करणाऱ्या कर्मचाऱ्यांमुळे बँक विश्वास गमावत आहे. त्यांच्यावर कारवाई करावी.

Web Title: 'Dadasaheb Bapu' debate in District Bank meeting