एकाच आठवड्यात रत्नागिरीत दोन घटनांमधून रत्नागिरीकरांचा उद्रेक दिसून आला. हा उद्रेक नेमका कशासाठी होता, कोणत्या कारणातून झाला होता, त्यातून साध्य काय झाले, उद्रेक कोणत्या जागी केला गेला, असे अनेक प्रश्न पडत आहेत. दोन्ही घटनांमध्ये अॅक्शनवर रिअॅक्शन देणारी माणसं तिसरीच होेती. म्हणजे एखाद्या प्रसंगात एखाद्या व्यक्तीला त्रास झाल्यानंतर त्या व्यक्तीने संतापातून, निराशेतून एखादी तीव्र प्रतिक्रिया नोंदवणे ही गोष्ट काहीशी स्वाभाविक आहे. पण, त्यात संधी मिळते म्हणून हात धुवून घेण्याचाच प्रकार अधिक दिसतो. कुठल्याही गोष्टीचा अतिरेक झाला की, सर्वसामान्य माणसाकडून उद्रेक होतो. पण अलिकडच्या काळात हा उद्रेक होण्यामागे नैसर्गिक संताप दिसत नाही. त्यातही हा उद्रेक इतक्या आंधळेपणाने केला जातो की, त्याचे परिणाम काय आणि कसे होतील, याचा विचारही केला जात नाही.पहिली घटना म्हणजे रत्नागिरी शहरातील एका भागात नागरिकांनी एका भुरट्या चोराला पकडले. यथेच्छ बदडले. इतके बदडले की तो चोर बेशुद्ध पडला. दुसरी घटना जीजीपीएसजवळची. एका बसचालकाच्या चुकीमुळे निष्पाप चिमुरडीचा हकनाक बळी गेला. पण त्यानंतर संतप्त झालेल्या जमावाने दोन बस फोडल्या. बराचवेळ रस्ता अडवून धरला.या दोन्ही घटना रत्नागिरीच्या वेगवेगळ्या भागात घडल्या. त्यात ज्यांच्या भावनांचा उद्रेक झाला ती माणसे वेगवेगळी होती. पण दोन्ही ठिकाणी एक गोष्ट समान होती, ती म्हणजे कायदा हातात घेणे. पहिल्या घटनेत लोकांनी चोराला पकडले, ही बाब अभिनंदनीय आहे. लोकांनी सतर्क राहाणे आवश्यक आहे आणि या सतर्कतेमधूनच चोरटा पकडला गेला, ही खरोखरच कौतुकास्पद बाब आहे. पण त्या चोरट्याला बेशुद्ध पडेपर्यंत मारणे समर्थनीय आहे का? काही वर्षांपूर्वी रत्नागिरीच्या गणेशनगर भागात एका चोराला लोकांनी पकडले. एका खांबाला बांधून ठेवले आणि पोलीस येईपर्यंत त्याला प्रचंड मारण्यात आले.कायदा नावाचा एक प्रकार आपण सर्वांनीच मान्य केला आहे. त्यानुसार चोराला पकडून पोलिसांच्या स्वाधीन करणे ही नागरिकांची जबाबदारी आहे. पण त्याला बेशुद्ध पडेपर्यंत मारण्याचा हक्क आपल्याला कोणी दिला? तो चोरटा पळून जात असेल तर त्याला बांधून ठेवणे समर्थनीय आहे. पोलीस वेळेवर आले नाहीत तर त्यांच्यावर आगपाखड करणे समर्थनीय आहे. पण एखाद्या माणसाला अशी शिक्षा करण्याचा अधिकार सर्वसामान्य माणसाला नाही. कायद्याने हा अधिकार काही ठराविक व्यक्तींना दिला आहे. या कायद्याचे रक्षक विकले जातात, पकडून दिलेले आरोपी तपासातील हलगर्जीपणामुळे निर्दोष सुटतात, असा आरोप केला जातो. किंबहुना कायदा हातात घेण्याचे समर्थन याच पद्धतीने केले जाते. पण पोलिसांना त्यांच्या कामात अडवतो कोण? आरोपींना सोडून देण्यासाठी, साधी कलमे लावण्यासाठी दबाव आणतो कोण? तुम्ही आम्ही निवडून दिलेला एखादा लोकप्रतिनिधीच ना? मग दोष फक्त पोलिसांना का द्यायचा?दुसरी घटना जीजीपीएससमोर एका बसच्या धडकेमुळे एका शाळकरी विद्यार्थिनीचा दुर्दैवी मृत्यू झाला. बसचालकाच्या चुकीमुळे हा अपघात झाला, असेच प्रथमदर्शनी दिसत आहे. तपासाअंती यात निष्काळजीपणा हे कारण पुढे आले तर चालकावर सदोष मनुष्यवधाच्या कलमानुसारच कारवाई व्हायला हवी. पण या घटनेनंतर तेथे झालेला उद्रेक न पटणारा आहे. एकतर अपघात झाला, तेव्हा जीजीपीएसच्या एका वर्गातील मुले शारीरिक शिक्षणाच्या तासासाठी मैदानावर होती. अपघात आणि त्यानंतर झालेली तोडफोड, तणाव यामुळे अनेक मुले रडतच वर्गात गेली. अनेक शिक्षकांनाही या घटनेचा शॉक बसला. आज ही घटना घडून गेल्यानंतरही अपघातानंतरचा तणावपूर्ण प्रसंग दिसत असल्याची मानसिकता काही मुलांमध्ये आहे. या प्रकारामुळे एक दहशतच मुलांच्या मनावर बसली आहे. हा परिणाम या उद्रेकातून अपेक्षित होता का? अपघातग्रस्त बसच्या आसपास जो जमाव जमला होता, त्यात एक महाविद्यालयीन वयाचा तरूण ‘जान के बदले जान’ असे मोठमोठ्याने ओरडत होता. हा कायदा आहे? अपघातग्रस्त बसच्या चालकावर अपघाताचा गुन्हा दाखल न होता मनुष्यवधाचा गुन्हा दाखल व्हावा, ही अपेक्षा चुकीची नाही. त्याला तत्काळ निलंबित करावे, ही अपेक्षाही चुकीची नाही. दुर्दैवी अंत झालेल्या चिमुरडीच्या पालकांना एस्. टी. महामंडळाने नुकसानभरपाई द्यावी, ही मागणीही चुकीची नाही. या सर्व मागण्या रास्त आहेत. पण ‘चालकाला आमच्या ताब्यात द्या’, ही मागणी रास्त मानायची का? चालकाला तत्काळ अटक करा, ही मागणी कुठलाही सामान्य माणूस करेल. पण त्याला आमच्या ताब्यात द्या, ही मागणी टोकाची आहे. कुठल्याही नागरिकाने, जमावाने आपल्याला कायद्यापेक्षा मोठे समजू नये.काही वर्षांपूर्वी एक तरूण भर बाजारातून तलवार घेऊन दुसऱ्याचा पाठलाग करत होता. तेव्हा कुणाच्याही भावनांचा उद्रेक झाला नाही. रत्नागिरीत एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार झाला. तेव्हा कुणाच्या भावनांचा उद्रेक झाला नाही. बाजारातून अनेक तरूण ‘धूम’ स्टाईलने गाडी चालवत जातात, तेव्हा कुणाच्या भावनांचा उद्रेक होत नाही. तेव्हा साऱ्यांच्या भावना मेलेल्या असतात.खरंतर कायदा कोणीही हातात घेत नये. कायद्यापुढे पंतप्रधान आणि राष्ट्रपतीही मोठे नाहीत, असे आपली घटना सांगते. एखाद्या अपघातात कुणाचा दुर्दैवी बळी गेला तर त्याच्या आई-वडिलांच्या, मुला-मुलीच्या भावनांचा उद्रेक झाला तर त्याचे एकवेळ समर्थन करता येते. आपल्या सख्ख्या - जीवाभावाच्या नातेवाईकाला दुसऱ्याच्या निष्काळजीपणाचा त्रास सहन करावा लागण्याने संतापाचा कडेलोट होणे एका मर्यादेपर्यंत समर्थनीय आहे. पण ज्यांचा त्या घटनेशी संबंध नसतो, अशी माणसेही हात धुवून घेण्यासाठी पुढे येतात. प्रत्येक माणसाच्या मनात कुठे ना कुठे राग भरून राहिलेला असतो. जिथे आपल्या अंगाशी येणार नाही, हे लक्षात येते तेथे तो व्यक्त केला जातो. एखाद्या नामचीन गुंडाला अडवायची हिंमत कुठला जमाव दाखवेल का? ते काम पोलिसांचे, असे लगेच सांगून टाकले जाते. पण जिथे आपल्या जीवाला काही होणार नाही, अशी खात्री असते, तिथे मात्र जमाव मर्दुमकी दाखवायला पुढे असतो. प्रत्येक माणसाचा विचार माणूस म्हणून व्हायला हवा आणि कायद्याची चौकट प्रत्येकाने पाळायलाच हवी. त्यात कसलीच हयगय होता नये. अडचणीच्या काळातही माणुसकीचा धर्म सुटणार नाही, तेव्हाच आपली प्रगती होईल. नाहीतर चुकीच्या ठिकाणी होणारे भावनांचे उद्रेक अनेकांच्या आयुष्यावर दुष्परिणाम करतील.मनोज मुळ्ये
अविचारी उद्रेक
By admin | Updated: January 10, 2015 00:12 IST
चुकीच्या ठिकाणी होणारे भावनांचे उद्रेक अनेकांच्या आयुष्यावर दुष्परिणाम करतील.
अविचारी उद्रेक
{{#config.logo.enabled}} {{/config.logo.enabled}}
{{/allowed}}