Fuel Shortage: सुटीच्या हंगामामुळे कोकणात पर्यटकांची गर्दी, इंधन पुरवठा पडू लागला अपुरा
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 15, 2026 13:07 IST2026-05-15T13:05:15+5:302026-05-15T13:07:29+5:30
आखाती देशातील युद्धामुळे सध्या पेट्रोलची टंचाई

Fuel Shortage: सुटीच्या हंगामामुळे कोकणात पर्यटकांची गर्दी, इंधन पुरवठा पडू लागला अपुरा
शोभना कांबळे
रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यात विविध प्रकारची एकूण वाहने साडेपाच लाखांपेक्षा अधिक आहे. या वाहनांसाठी भारत पेट्रोलियम, इंडियन ऑईल कार्पोरेशन आणि हिंदुस्तान पेट्रोलियम या तीन ऑइल कंपन्यांकडून पेट्रोल आणि डिझेलचा पुरवठा केला जातो. तसेच काही वाहने एलपीजी आणि सीएनजी गॅसवर धावतात. सध्या या सर्व वाहनांना सुमारे चार लाख लिटर्सचा इंधन पुरवठा हाेेत आहे. मात्र, सध्या सुटीचा हंगाम असल्याने पर्यटन वाढले आहे. परिणाम वाहनांच्या संख्येत सुमारे ३० टक्के वाढ झाल्याने आता इंधन पुरवठाही अपुरा पडू लागला आहे.
आता वाहन ही प्रत्येकाचीच गरज झाली आहे. त्यामुळे प्रत्येक महिन्याला जिल्ह्यात अडीच हजार ते २८०० वाहनांची भर पडत असते. रत्नागिरी जिल्ह्यात मार्च २०२६ अखेर एकूण वाहनांची संख्या ५,३३,६४२ इतकी आहे. यात एप्रिल महिन्यात पुन्हा वाढ झाली आहे. प्रत्येक महिन्याला जिल्ह्यात अडीच हजार वाहनांची भर पडत असते. सध्या जिल्ह्यात धावत असलेल्या साडेपाच लाखांपेक्षा अधिक संख्येने असलेल्या वाहनांना सध्या तीन लाख लिटर पेट्रोल - डिझेल आणि ७० हजार किलो सीएनजीचा दर दिवशी पुरवठा हाेेत आहे.
जिल्ह्यात सर्व वाहनांमध्ये वापरायला सुटसुटीत आणि एक - दोघांसाठी असलेल्या दुचाकींची संख्या सर्वाधिक ३ लाख ८१ हजार तर कारची संख्या ६४ हजार इतकी आहे. आखाती देशातील युद्धामुळे सध्या पेट्रोलची टंचाई जाणवत असतानाच आता सुटीचा कालावधी सुरू झाला. त्यामुळे वाहनांची संख्या अधिकच वाढली आहे. एलपीजी बंद झाल्याने आता कार किंवा रिक्षा यांचा सीएनजीकडे ओढा वाढला आहे.
परंतु युद्धाच्या अनुषंगाने भविष्यात इंधनाची तीव्र टंचाई निर्माण होऊ शकेल, यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नागरिकांना इंधन कमी वापरण्याचे आवाहन केले आहे. मात्र, यामुळे नागरिकांमध्ये संभ्रमावस्था कमालीची वाढल्याने भीतीने लोक पेट्रोल पंप, सीएनजी पंप यांच्यासमाेर सकाळपासून रात्रीपर्यंत रांगा लावू लागले आहेत. त्यामुळे इंधनाच्या नियमित पुरवठ्यावर कमालीचा ताण आला आहे.
सध्या साडेपाच लाखांपेक्षा अधिक असलेल्या जिल्ह्यातील वाहनांमध्ये बाहेरून येणाऱ्या ३० टक्के पर्यटकांची भर पडली आहे. तसेच इंधन तुटवड्याच्या भीतीने नागरिक वाहनाची टाकी भरून घेत असल्याने पुरवठा दुपटीपेक्षा अधिक वाढू लागला आहे. परिणामी आता इंधनाचा नियमित पुरवठाही अपुरा पडत आहे.