Pachpadra Refinery Fire: उद्घाटनाच्या केवळ एक दिवस आधी राजस्थानच्या रिफायनरीमध्ये आग
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 21, 2026 14:45 IST2026-04-21T14:45:06+5:302026-04-21T14:45:53+5:30
Rajasthan Pachpadra Refinery Fire पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत आज होणारा उद्घाटनाचा कार्यक्रम पुढे ढकलला

Pachpadra Refinery Fire: उद्घाटनाच्या केवळ एक दिवस आधी राजस्थानच्या रिफायनरीमध्ये आग
जयपूर : राजस्थानच्या बालोतरा जिल्ह्यातील पचपदरा रिफायनरीमध्ये उद्घाटनाच्या अवघ्या एक दिवस आधी सोमवारी भीषण आग लागली. या प्रकारामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत मंगळवारी होणारा कार्यक्रम पुढे ढकलण्यात आला आहे. प्रशासनाने आगीच्या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले आहेत.
अग्निशमन दलाने सुमारे दोन तासांत आगीवर नियंत्रण मिळवले. रिफायनरीच्या 'क्रूड डिस्टिलेशन युनिट' विभागाच्या परिसरात ही आग भडकली. आगीच्या ज्वाळांवर नियंत्रण मिळवण्यासाठी आपत्कालीन प्रतिसाद पथके घटनास्थळी दाखल झाल्याने परिसरात गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. या प्रकारामुळे राजस्थानचे मुख्यमंत्री भजनलाल शर्मा यांचा सोमवारी रिफायनरीला भेट देण्याचा नियोजित दौराही रद्द करण्यात आला आहे. तसेच, आगीमुळे झालेल्या नुकसानीचा आढावा घेण्याचे काम सुरू आहे. राज्य विधानसभेतील विरोधी पक्षनेते टीका राम जुली यांनी ही घटना चिंताजनक असल्याचे म्हटले आहे. राजस्थानच्या बालोतरा जिल्ह्यातील पचपदरा रिफायनरीमध्ये सोमवारी लागलेल्या आगीमुळे आकाशात धुराचे लोट पसरले होते.
आगीच्या चौकशीचे आदेश, जीवितहानी नाही
- सोमवारी एचआरआरएल रिफायनरीच्या 'क्रूड डिस्टिलेशन युनिट' परिसरात आगीची दुर्दैवी घटना घडल्यामुळे, पंतप्रधानांच्या हस्ते २१ एप्रिल २०२६ रोजी होणारे रिफायनरीचे नियोजित लोकार्पण पुढे ढकलण्यात आले आहे. आगीवर पूर्णपणे नियंत्रण मिळवण्यात आले असून, कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही.
- या घटनेची चौकशी सुरू करण्यात आली आहे, असे पेट्रोलियम व नैसर्गिक वायू मंत्रालयाने समाजमाध्यमावर दिलेल्या संदेशात म्हटले आहे. उद्घाटनाची सुधारित तारीख योग्य वेळी जाहीर केली जाईल, असेही मंत्रालयाने पुढे नमूद केले.
माजी मुख्यमंत्री गेहलोत यांचे टीकास्त्र
या घटनेमुळे रिफायनरीच्या सुरक्षा व्यवस्थेत त्रुटी असल्याचे उघड झाले आहे, असा आरोप विरोधी पक्ष काँग्रेसने केला आहे. पचपदरा रिफायनरी ही संपूर्ण राजस्थानवासीयांसाठी अभिमानाची बाब आहे. अशा महत्त्वाच्या वेळी ही घटना घडणे अत्यंत दुर्दैवी आहे. मी सर्वांच्या सुरक्षिततेसाठी प्रार्थना करतो, असे माजी मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी म्हटले आहे.
७९,४५० कोटींचा महत्त्वाचा प्रकल्प
७९,४५० कोटी रुपयांहून अधिक गुंतवणुकीचा हा महत्त्वपूर्ण प्रकल्प, भारताच्या ऊर्जा आणि पेट्रोकेमिकल क्षेत्रामधील एक महत्त्वाचा टप्पा दर्शवतो, असे एका अधिकृत निवेदनात यापूर्वी म्हटले होते.