उरुळीकांचन / लोणीकाळभोर : पुण्यातील म्हातोबाची आळंदी येथे शनिवारी सकाळी राजकीय वातावरण चांगलेच तापल्याचे पाहायला मिळाले. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रवक्ते विकास लवांडे यांच्यावर कीर्तनकार संग्राम भंडारे आणि त्यांच्या समर्थकांकडून शाईफेक करण्यात आल्याची घटना घडली. या प्रकारामुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
मिळालेल्या माहितीनुसार, सकाळी दहाच्या सुमारास हा प्रकार घडला. घटनेनंतर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांनी संताप व्यक्त करत निषेध आंदोलन सुरू केले. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली. आमदार रोहित पवार यांनी आंदोलनस्थळी भेट देत संबंधित घटनेचा तीव्र शब्दांत निषेध केला. “धमक्या देणे, शाईफेक करणे आणि अशा मार्गाने प्रसिद्धी मिळवण्याचा प्रयत्न करणे हे महाराष्ट्राच्या संस्कृतीला आणि वारकरी संप्रदायाला शोभणारे नाही,” असे ते म्हणाले.
रोहित पवार यांनी पुढे बोलताना वारकरी परंपरेचा उल्लेख करत, “खरे वारकरी संतांचा विचार पुढे नेत असतात. ते शिवीगाळ, धमक्या किंवा बंदूक दाखवण्यासारखे प्रकार करत नाहीत. जर कोणी बंदूक घेऊन फिरत असेल किंवा घुसखोरी करत असेल, तर तो गंभीर विषय आहे,” असा इशाराही दिला.
यावेळी त्यांनी काही तथाकथित धार्मिक नेत्यांवरही अप्रत्यक्ष टीका केली. “या भोंदू महाराजांच्या गुरुंनी सुरू केलेल्या शाळांमध्ये बहुजन समाजातील विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जातो का?” असा सवाल उपस्थित करत त्यांनी सामाजिक समतेचाही मुद्दा उपस्थित केला. या प्रकरणातील आरोपींवर कठोर कारवाई करून तातडीने अटक करण्यात यावी, तसेच विकास लवांडे यांना पोलिस संरक्षण द्यावे, अशी मागणीही रोहित पवार यांनी पोलिस प्रशासनाकडे केली आहे. घटनेनंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले असून, आगामी काळात या प्रकरणावरून राजकीय आरोप-प्रत्यारोप अधिक तीव्र होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
Web Summary : Ink was thrown on NCP spokesperson Vikas Lavande, escalating political tensions. MLA Rohit Pawar condemned the act, questioning if such behavior aligns with Warkari values. He demanded action against the perpetrators and protection for Lavande, highlighting the need for social equality.
Web Summary : एनसीपी प्रवक्ता विकास लांडे पर स्याही फेंकी गई, जिससे राजनीतिक तनाव बढ़ गया। विधायक रोहित पवार ने इस कृत्य की निंदा करते हुए सवाल किया कि क्या ऐसा व्यवहार वारकरी मूल्यों के अनुरूप है। उन्होंने दोषियों के खिलाफ कार्रवाई और लांडे को सुरक्षा देने की मांग की, सामाजिक समानता की आवश्यकता पर प्रकाश डाला।