चेन्नईतील समुद्रात राज्यातील तरुणीसह दोघे बुडाले, पुण्यातील तरुण सुखरूप
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 23, 2026 12:02 IST2026-02-23T12:01:36+5:302026-02-23T12:02:18+5:30
मयूरी चौधरी मूळची भंडारा जिल्ह्यातील असून तिचा मृत्यू झाला आहे तर जळगावच्या जाय पाटीलचा अजूनही शोध सुरु आहे

चेन्नईतील समुद्रात राज्यातील तरुणीसह दोघे बुडाले, पुण्यातील तरुण सुखरूप
पुणे : पंधरवड्यापूर्वी चेन्नईतील एका नामवंत माहिती-तंत्रज्ञान कंपनीत रुजू झालेल्या महाराष्ट्रातील तरुणीसह दोघेजण बुडाले. या घटनेत तरुणीचा मृत्यू झाला. समुद्रात बुडालेल्या एका तरुणाचा शोध लागलेला नाही. पुण्यातील तरुण मात्र, या दुर्घटनेतून बचावला आहे.
मयूरी चौधरी असे मृत्युमुखी पडलेल्या तरुणीचे नाव आहे. समुद्रात बुडालेल्या जय पाटील याचा अद्याप शोध लागलेला नाही. त्याचा शोध घेण्याचे काम सुरू आहे. पुण्यातील तरुण राज केदारी हा सुखरूप आहे. मयूरी चौधरी मूळची भंडारा जिल्ह्यातील आहे. जय पाटील मूळचा जळगावचा आहे. राज केदारी हा पुण्यातील रहिवासी आहे. तिघेजण पंधरा दिवसांपूर्वी चेन्नईतील नामवंत माहिती-तंत्रज्ञान कंपनीत रुजू झाले होते. तीन महिन्यांच्या प्रशिक्षणानंतर त्यांना कंपनीत पूर्णवेळ नोकरी देण्यात येणार होती.
चेन्नईतील मचिया नारायण मंदिरात शनिवारी या कंपनीतील प्रशिक्षणार्थी कर्मचारी दर्शनासाठी गेले होते. त्या वेळी मयूरी, राज आणि जय हे समुद्रात उतरले. पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने तिघेजण बुडाले. त्या वेळी किनाऱ्यावर असलेल्या प्रशिक्षणार्थ्यांनी आरडाओरडा केला. मयूरी आणि राज यांना पाण्यातून बाहेर काढण्यात यश आले. मात्र, पाण्याच्या प्रवाहात जय वाहून गेला. दोघांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारांपूर्वीच मयूरीचा मृत्यू झाला होता. पुण्यातील राज केदारी हा सुखरूप असल्याची माहिती पुण्यातील निकटवर्तीयांनी दिली.