विद्यार्थी, व्यापारी हैराण; खंडाळीत दररोज ४ तास वीज बंद; ग्रामस्थांची बेमुदत धरणे आंदोलनाची हाक
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 1, 2026 16:16 IST2026-05-01T16:16:30+5:302026-05-01T16:16:50+5:30
- विद्यार्थ्यांच्या अभ्यासावर मोठा परिणाम होत असून व्यापारी, लहान उद्योग आणि घरगुती कामकाज देखील विस्कळीत होत आहे.

विद्यार्थी, व्यापारी हैराण; खंडाळीत दररोज ४ तास वीज बंद; ग्रामस्थांची बेमुदत धरणे आंदोलनाची हाक
खंडाळी ( पुणे जि. ) - माळशिरस तालुक्यातील खंडाळी दत्तनगर परिसरातील नागरिकांना गेल्या अनेक दिवसांपासून दररोज सायंकाळी चार तास वीज खंडिततेचा सामना करावा लागत असून, वाढत्या समस्येमुळे ग्रामस्थांमध्ये तीव्र संतापाची लाट उसळली आहे. अखेर या विरोधात शुक्रवारी (दि. १) सायंकाळी ६ वाजल्यापासून बेमुदत धरणे आंदोलन छेडण्याचा निर्णय ग्रामस्थांनी घेतला आहे.
खंडाळी गावचे माजी उपसरपंच तथा ग्रामपंचायत सदस्य रिकेश चव्हाण यांनी ही माहिती दिली. त्यांच्या म्हणण्यानुसार, महावितरणकडून दररोज सायंकाळी ६ ते रात्री १० या वेळेत “लोडशेडिंग”च्या नावाखाली वीजपुरवठा खंडित केला जात आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या अभ्यासावर मोठा परिणाम होत असून व्यापारी, लहान उद्योग आणि घरगुती कामकाज देखील विस्कळीत होत आहे.
उन्हाळ्याच्या तीव्र उकाड्यात चार तास अंधारात राहावे लागत असल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. विशेष म्हणजे, केंद्र सरकारच्या Electricity (Rights of Consumers) Rules, 2020 नुसार ग्राहकांना अखंडित आणि दर्जेदार वीजपुरवठा देणे बंधनकारक असताना प्रत्यक्षात मात्र खंडाळीतील परिस्थिती याच्या पूर्णपणे विरोधात असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.
ग्रामस्थांनी महावितरण प्रशासनाला अनेकदा निवेदने आणि तक्रारी दिल्यानंतरही केवळ “चार दिवसांत काम पूर्ण होईल” अशी आश्वासने दिली जात असल्याचा आरोप करण्यात आला आहे. संबंधित अधिकारी तात्पुरती कारणे देऊन वेळकाढूपणा करत असल्याचेही नागरिकांचे म्हणणे आहे. दरम्यान, वीजपुरवठा तात्काळ सुरळीत न झाल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल, असा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे. त्यामुळे अकलूज महावितरण प्रशासन आता या प्रश्नावर कोणता तोडगा काढते, याकडे संपूर्ण खंडाळीकरांचे लक्ष लागले आहे.