प्रलंबित सिंचन कामे लवकरच मार्गी लागणार : युगेंद्र पवार
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 17, 2026 10:21 IST2026-04-17T10:21:41+5:302026-04-17T10:21:54+5:30
- बारामती तालुक्यातील सिंचनाच्या विविध प्रश्नांबाबत कृष्णा खोरे विकास महामंडळाचे मुख्य अभियंत्यांची घेतली भेट

प्रलंबित सिंचन कामे लवकरच मार्गी लागणार : युगेंद्र पवार
बारामती : बारामती तालुक्यातील सिंचनाच्या विविध प्रश्नांबाबत पुणे सिंचन भवन येथे कृष्णा खोरे विकास महामंडळाचे मुख्य अभियंता डॉ. हनुमंत धुमाळ आणि अधिकाऱ्यांची गुरुवारी (दि. १६) युगेंद्र पवार यांनी भेट घेतली. यावेळी पवार यांनी डाॅ. धुमाळ यांच्याशी जनाई - शिरसाई उपसा सिंचन योजना, पाण्याचे प्रश्न व उन्हाळी आवर्तनाविषयी सविस्तर चर्चा केली. यासोबतच पुरंदर उपसा सिंचन योजना, नीरा कऱ्हा नदी जोड प्रकल्प आणि लाभधारक शेतकरी बांधवांच्या बंदिस्त पाइपलाइन कामांविषयी सद्यस्थिती निर्देशनास आणून दिली.
यावेळी येत्या दोन दिवसात शिरसाई योजनेचे पंप सुरू करणार आणि जनाई योजनेचे पाणी २२ एप्रिलनंतर सोडणार असल्याची ग्वाही मुख्य अभियंता यांनी दिली. यासोबतच बंदिस्त पाइपलाइनच्या प्रश्नावरदेखील सकारात्मक चर्चा झाली. बारामती आणि पुरंदर तालुक्यातील अवर्षणग्रस्त गावांतील शेतजमीन ओलिताखाली आणण्यासाठी तसेच पिण्याचे पाणी उपलब्ध करुन देण्यासाठी नीरा व कऱ्हा नदीच्या पाण्याची महत्त्वाकांक्षी उपसा सिंचन योजना स्व. अजितदादा पवार यांचे स्वप्न होते. या योजनेच्या माध्यमातून या भागातील गावांवरील जिरायत हा शिक्का कायमस्वरुपी पुसून टाकला जाणे शक्य आहे.
विशेषत: मुख्यमंत्री तथा वित्तमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी यावर्षीच्या अर्थसंकल्पात नीरा कऱ्हा नदीजोड प्रकल्पाची घोषणा केली. परंतु, ही केवळ घोषणाच असून, या योजेनेसाठी निधीची तरतूद केलेली दिसली नाही. त्यामुळे हा प्रकल्प कधी व कसा पूर्ण करणार, याबाबत कसलीही स्पष्टता नसल्याचे यावेळी पवार यांनी नमूद केले. तसेच हा प्रकल्प या भागातील शेतकरी बांधवांसाठी अतिशय महत्त्वाचा असून, या प्रकल्पाच्या माध्यमातून येथील जमीन ओलिताखाली येणार आहे. तसेच पिण्याचे पाणीदेखील उपलब्ध होणार आहे. या भागातील नागरिकांची होणारी सोय आणि शेतकऱ्यांचे हित लक्षात घेता सदर प्रकल्प लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी शासनाने भरीव तरतूद करावी. हे काम मार्गी लावावे, अशीही मागणी पवार यांनी केली. यावेळी प्रशांत सातव, कैलास पवार, पोपट पानसरे, विठ्ठल जराड, अमोल गवळी, शशांक पवार आणि भाऊसाहेब बागल आदी शेतकरी उपस्थित होते.