चीन, अमेरिका की सौदी... इराण युद्धात कोणाचं जास्त नुकसान? आयएमएफच्या नव्या रिपोर्टने जगात खळबळ
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 17, 2026 15:13 IST2026-04-17T15:12:18+5:302026-04-17T15:13:13+5:30
इराणमध्ये सुरू असलेल्या युद्धामुळे केवळ मध्यपूर्वेतील शांतता भंग पावली नाही, तर संपूर्ण जगाच्या अर्थव्यवस्थेचा वेगही मंदावला आहे.

चीन, अमेरिका की सौदी... इराण युद्धात कोणाचं जास्त नुकसान? आयएमएफच्या नव्या रिपोर्टने जगात खळबळ
इराणमध्ये सुरू असलेल्या युद्धामुळे केवळ मध्यपूर्वेतील शांतता भंग पावली नाही, तर संपूर्ण जगाच्या अर्थव्यवस्थेचा वेगही मंदावला आहे. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने प्रसिद्ध केलेल्या ताज्या अहवालानुसार, या युद्धामुळे जागतिक विकास दराला मोठा ब्रेक लागला आहे. विशेष म्हणजे, अमेरिका आणि ब्रिटनसारख्या महासत्तांना या युद्धाचा मोठा फटका बसला असून, महागाईने गेल्या अनेक वर्षांतील उच्चांक गाठला आहे.
विकासाचा दर घटला, महागाई वाढली
आयएमएफने २०२६ साठी जागतिक विकास दराचा अंदाज ३.४% वरून घटावून ३.१% केला आहे. युद्धामुळे तेल पुरवठा विस्कळीत झाला असून होर्मुज सामुद्रधुनीतील अडथळ्यांमुळे कच्च्या तेलाच्या किमती गगनाला भिडल्या आहेत. परिस्थिती अशीच राहिली तर जगाचा विकास दर २% पर्यंत घसरू शकतो आणि जागतिक महागाई ६% च्या पार जाऊ शकते, असा इशारा आयएमएफचे मुख्य अर्थशास्त्रज्ञ पियरे-ओलिवियर गौरिंचास यांनी दिला आहे.
कोणाला बसला सर्वाधिक फटका?
अमेरिका आणि ब्रिटन: अमेरिकेत पेट्रोलच्या किमती वाढल्याने मंदीचे सावट आहे. ब्रिटनच्या विकास दरात ०.५% ची कपात करण्यात आली आहे.
सौदी अरब: तेल उत्पादक देश असूनही सौदीच्या विकास दरात १.४% ची मोठी घट झाली आहे.
चीन आणि कॅनडा: या दोन्ही देशांच्या विकास दरात ०.१% ची घट नोंदवण्यात आली आहे.
भारत आणि पाकिस्तानसाठी आनंदाची बातमी!
जगातील बड्या अर्थव्यवस्था युद्धाच्या झळा सोसत असताना, भारत आणि पाकिस्तानसाठी मात्र आयएमएफने सकारात्मक अंदाज वर्तवला आहे. भारताच्या २०२६ आणि २०२७ च्या विकास दरात ०.१%ची वाढ करण्यात आली आहे. २०२५ मध्ये भारताचा विकास दर ७.६% राहण्याचा अंदाज असून, त्यानंतर तो ६.५% वर स्थिर राहण्याची शक्यता आहे. दुसरीकडे, पाकिस्तानच्या अर्थव्यवस्थेतही लक्षणीय सुधारणा दिसत असून त्यांच्या विकास दरात ०.४% ते ०.६% पर्यंत वाढ होण्याची शक्यता आहे.
युद्धाचा धोका अजूनही कायम
आयएमएफने चेतावणी दिली आहे की, जर हे युद्ध अधिक काळ चालले किंवा इतर देशांमध्ये पसरले, तर जागतिक अर्थव्यवस्थेचे अपरिमित नुकसान होऊ शकते. वाढते कर्ज आणि देशांमधील तणाव यामुळे बाजारात अनिश्चितता निर्माण झाली आहे. मात्र, जर एआय (AI) तंत्रज्ञानाचा वापर वाढला आणि व्यापारात सुधारणा झाली, तर ही परिस्थिती निवळण्यास मदत होऊ शकते.