२-३ रुपयांत केळी विकण्यापेक्षा शेतातच सोडून दिलं पीक..! बारामतीतील शेतकऱ्याचा संतापजनक निर्णय
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 14, 2026 12:38 IST2026-04-14T12:38:25+5:302026-04-14T12:38:48+5:30
- बाजारभावातील घसरण, युद्धजन्य परिस्थिती आणि व्यापाऱ्यांच्या मनमानीमुळे शेतकरी हवालदिल

२-३ रुपयांत केळी विकण्यापेक्षा शेतातच सोडून दिलं पीक..! बारामतीतील शेतकऱ्याचा संतापजनक निर्णय
सोमेश्वरनगर : बारामती तालुक्यातील होळ येथील एका प्रयोगशील शेतकऱ्याने केळीच्या दरातील मोठ्या घसरणीला कंटाळून तब्बल एक एकराचे उभे पीक नांगरून शेतात गाडण्याचा निर्णय घेतला आहे. व्यापाऱ्यांकडून केवळ २ ते ३ रुपये किलो दराने केळी खरेदी करण्याच्या ऑफर येत असल्याने, उत्पादन खर्चही निघत नसल्याने हा टोकाचा निर्णय घ्यावा लागल्याची माहिती शेतकरी किशोर कारंडे यांनी दिली.
कारंडे यांनी आपल्या एक एकर क्षेत्रात केळीची लागवड करताना रोपे, खते, औषधे आणि मजुरीसाठी सुमारे दीड ते पावणेदोन लाख रुपये खर्च केले होते. सुरुवातीला निर्यातबंदीमुळे बाजारभाव दबावात होता. मात्र, नंतर परिस्थिती सुधारत २५ ते ३० रुपये किलोपर्यंत दर पोहोचल्याने शेतकऱ्यांमध्ये आशेचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र, आंतरराष्ट्रीय स्तरावरील तणाव - विशेषतः अमेरिका, इराण आणि इस्रायल यांच्यातील युद्धजन्य परिस्थिती - याचा थेट परिणाम शेतीमालाच्या निर्यातीवर झाला. निर्यातीत अडथळे निर्माण झाल्याने केळीचे दर घसरत गेले.
२०-२२ रुपये किलोवर असलेले दर अचानक १०-१२ रुपयांवर आले आणि शेवटी व्यापाऱ्यांनी केवळ २-३ रुपये किलो दराने खरेदीची मागणी केली. या परिस्थितीत उत्पादन खर्च तर दूरच, किमान मजुरीही मिळणे कठीण झाले. त्यामुळे “व्यापाऱ्यांची चांदी करण्यापेक्षा पीक शेतात गाडून जमिनीला खत करणेच योग्य,” अशी संतप्त प्रतिक्रिया कारंडे यांनी व्यक्त केली. बारामती परिसर प्रामुख्याने ऊसपट्टा म्हणून ओळखला जातो. मात्र, उसालाही अपेक्षित भाव मिळत नसल्याने अनेक शेतकरी केळी लागवडीकडे वळले होते. आता केळीच्या दरातील अनिश्चिततेमुळे त्यांनाही मोठा फटका बसत आहे. बाजारभावातील सततच्या चढ-उतारामुळे परिसरातील केळी उत्पादक शेतकरी सध्या आर्थिक संकटात सापडले आहेत.
खर्च वाढतो, मात्र उत्पन्न घटते
व्यापाऱ्यांकडून दर ठरविताना पारदर्शकता नसल्याची तक्रारही शेतकऱ्यांकडून केली जात आहे. बाजार समित्यांमध्ये योग्य दर न मिळाल्याने शेतकऱ्यांना थेट व्यापाऱ्यांवर अवलंबून राहावे लागते. परिणामी, दर पाडून खरेदी करण्याचे प्रकार वाढल्याचा आरोप शेतकरी करत आहेत. तसेच हवामानातील बदल, अवकाळी पाऊस आणि रोगराई यामुळे उत्पादनावरही परिणाम होत आहे. यामुळे खर्च वाढतो, मात्र उत्पन्न घटते, अशी दुहेरी कात्री शेतकऱ्यांना बसत आहे. कर्जबाजारीपणातही वाढ होत असून अनेक शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले आहेत.
सुरुवातीला दर चांगले होते; पण युद्ध सुरू झाल्यानंतर भाव थेट १०-१२ रुपयांवर आले. शेवटी व्यापारी २-३ रुपये किलो दर देऊ लागले. अशा दरात विकण्यापेक्षा पीक शेतात गाडलेलेच बरे, त्यामुळे जमिनीला तरी खत मिळेल. - किशोर कारंडे, केळी उत्पादक शेतकरी, होळ