प्रवाशांना मिळणार सुखद प्रवासाचा नवा अनुभव; महाराष्ट्र दिनापासून एसटीची ‘आपली बस, आपली सेवा’
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 27, 2026 13:12 IST2026-04-27T13:11:19+5:302026-04-27T13:12:59+5:30
१ मे पासून सुरू होणारे हे अभियान केवळ सेवा सुधारण्याचा उपक्रम नसून, एसटी आणि प्रवासी यांच्यातील विश्वासाचा नवा सेतू ठरेल

प्रवाशांना मिळणार सुखद प्रवासाचा नवा अनुभव; महाराष्ट्र दिनापासून एसटीची ‘आपली बस, आपली सेवा’
पुणे: महाराष्ट्राची जीवनवाहिनी ‘लालपरी’ आता नव्या रूपात आणि नव्या उत्साहात प्रवाशांच्या सेवेसाठी सज्ज होत आहे. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने (एसटी) प्रवाशांशी असलेले नाते अधिक घट्ट करण्यासाठी ‘आपली बस, आपली सेवा’ हे अभियान १ मे २०२६ पासून संपूर्ण राज्यात राबविण्याचा निर्णय घेतला आहे. राज्याचे परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी या उपक्रमाची घोषणा केली असून, प्रवाशांचा विश्वास पुन्हा संपादन करणे हा यामागचा मुख्य उद्देश आहे.
एसटीच्या ताफ्यात बसेसची संख्या वाढत असली, तरी प्रवासी संख्या आणि महसुलात अपेक्षित वाढ झालेली नाही. ही बाब लक्षात घेऊन महामंडळाने आता केवळ सेवा न देता, तिला ‘मानवी स्पर्श’ देण्याचे ठरवले आहे. या अभियानांतर्गत एसटीचे चालक आणि वाहक केवळ कर्मचारी न राहता ‘सेवक’ म्हणून प्रवाशांच्या मदतीला धावतील. प्रवासाला सुरुवात करण्यापूर्वी चालक स्वतःची ओळख करून देतील आणि प्रवाशांना प्रवासाचा मार्ग, प्रमुख थांबे आणि पोहोचण्याची वेळ याबद्दल माहिती देतील.
प्रवाशांचेही सहकार्य अपेक्षित
‘आपली बस, आपली सेवा’ हे अभियान यशस्वी करण्यासाठी प्रवाशांनीही ‘सहप्रवासी’ म्हणून साथ द्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे. बसमध्ये स्वच्छता राखणे, ऑनलाइन आरक्षणाचा आणि ‘एनसीएमसी’ स्मार्ट कार्डचा जास्तीत जास्त वापर करणे, तसेच आपल्या सामानाची जबाबदारी घेणे, यांसारख्या सवयींमुळे प्रवास अधिक सुखकर होईल, असे महामंडळाने म्हटले आहे.
अडचणीच्या वेळी तत्काळ आधार
अनेकदा तांत्रिक बिघाड किंवा अन्य कारणांमुळे बस रद्द होते. अशावेळी प्रवाशांचे हाल होऊ नयेत म्हणून तत्काळ पर्यायी व्यवस्था उपलब्ध करून देण्याचे निर्देश अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत. तसेच, प्रवाशांच्या तक्रारींचे निवारण करण्यासाठी एक स्वतंत्र आणि तत्पर यंत्रणा कार्यान्वित केली जाणार आहे. बसस्थानक परिसर स्वच्छ आणि सुरक्षित ठेवण्याची जबाबदारी स्थानिक अधिकाऱ्यांवर निश्चित करण्यात आली आहे.
१ मे पासून सुरू होणारे हे अभियान केवळ सेवा सुधारण्याचा उपक्रम नसून, एसटी आणि प्रवासी यांच्यातील विश्वासाचा नवा सेतू ठरेल. लालपरीच्या चाकांना आता केवळ वेग नाही, तर संवेदनशीलतेचीही दिशा मिळणार आहे. प्रत्येक प्रवाशाला सन्मानपूर्वक अनुभव देणे हेच आमचे ध्येय आहे.-प्रताप सरनाईक, परिवहन मंत्री