HSC 12th Results 2026 Out : राज्यात काेकणचाच डंका..! लातूर पॅटर्नला पुन्हा घरघर
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 2, 2026 19:10 IST2026-05-02T19:09:47+5:302026-05-02T19:10:00+5:30
बारावीचा निकाल गतवर्षीच्या तुलनेत २.०९ टक्के घटला; यंदा तीन दिवस आधी निकाल प्रसिद्ध

HSC 12th Results 2026 Out : राज्यात काेकणचाच डंका..! लातूर पॅटर्नला पुन्हा घरघर
पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने इयत्ता बारावीचा निकाल शनिवारी (दि. २) दुपारी १२ वाजता ऑनलाइन जाहीर केला. त्यानुसार, राज्याचा निकाल ८९.७९ टक्के लागला आहे. गतवर्षीच्या तुलनेत निकालात २.०९ टक्के घट झाली असून, दरवर्षीप्रमाणे यंदाही मुलींनी (९३.१५) बाजी मारली आहे. मुलांची टक्केवारी (८६.८०) तसेच नऊ विभागांपैकी काेकण (९३.१५) अव्वल स्थानी, तर लातूर विभाग (८४.१४) शेवटच्या स्थानावर असल्याचे स्पष्ट झाले आहे. विशेष म्हणजे राज्यात दाेन विद्यार्थ्यांनी शंभर टक्के गुण मिळवत राज्यात प्रथम येण्याचा मान पटकावला आहे.
राज्य मंडळाने फेब्रुवारी मार्च २०२६ मध्ये राज्यातील पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या नऊ विभागीय मंडळांमार्फत इयत्ता बारावीची परीक्षा घेतली. यासाठी विज्ञान, कला, वाणिज्य, व्यवसाय अभ्यासक्रम व आयटीआय या शाखांसाठी एकूण १४ लाख ४४ हजार ७१३ नियमित विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी १४ लाख ३३ हजार ०५८ विद्यार्थी प्रविष्ट झाले हाेते. त्यापैकी १२ लाख ८६ हजार ८४३ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. याची टक्केवारी ८९.७९ इतकी आहे.
याचबराेबर खासगी विद्यार्थी म्हणून नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांची एकूण संख्या ३७,५५९ हाेती. त्यापैकी ३६,९४१ विद्यार्थी प्रविष्ट झाले असून, २९,६३४ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. तसेच एकूण ५०,८७६ पुनर्परीक्षार्थींनी नोंदणी केली होती. त्यातील ५०,३४६ विद्यार्थी प्रविष्ट झाले हाेते. त्यापैकी १८,३४९ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.
------------
दिव्यांग विद्यार्थ्यांचा निकाल ९०.५८ टक्के :
बारावी परीक्षेसाठी एकूण ८,४४६ दिव्यांग विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी ८,३६७ विद्यार्थी परीक्षेस प्रविष्ट झाले. त्यापैकी ७,५७९ दिव्यांग विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. परीक्षेस नोंदणी केलेल्या पात्र दिव्यांग विद्यार्थ्यांना प्रचलित पद्धतीने सवलतीचे गुण देण्याबाबत कार्यवाही केलेली आहे.
------------
मुलींचीच चलती :
सर्व विभागीय मंडळातून नियमित मुलींची उत्तीर्ण टक्केवारी ९३.१५ टक्के, तर मुलांची ८६.८० टक्के आहे. यात मुलांपेक्षा मुली ६.३५ टक्केने आघाडीवर आहेत.
------------
२६ विषयांचा निकाल शंभर टक्के
राज्य मंडळाने एकूण १५३ विषयांसाठी परीक्षा घेतली. यापैकी २६ विषयांचा निकाल १०० टक्के लागला आहे. बहुतांश शाखांमध्ये थोडी घसरण झाली असून, कला शाखेचा निकाल तुलनेने कमी राहिला आहे. गतवर्षी अर्थात फेब्रुवारी-मार्च २०२५ मध्ये बारावीचा एकूण निकाल ९१.८८ टक्के लागला होता. त्यात यंदा २.०९ टक्केने घसरण हाेऊन ८९.७९ टक्के निकाल लागला आहे.
-----------
शाखानिहाय निकाल
विज्ञान : ८६.४४ टक्के
कला : ७८.०२ टक्के
वाणिज्य : ८७.०३ टक्के
व्यवसाय अभ्यासक्रम : ८२.७४ टक्के
आयटीआय : ८३.७८ टक्के
-----
उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा टक्का :
९० टक्क्यांहून अधिक गुण मिळविणारे विद्यार्थी : ७ हजार ५१०
८५ ते ९० टक्के : २३ हजार ९६४
८० ते ८५ टक्के - ४५ हजार २८६
७५ ते ८० टक्के - ६७ हजार ४९१
७० ते ७५ टक्के - ९० हजार १९६
६५ ते ७० टक्के - १ लाख १६ हजार ४२८
६० ते ६५ टक्के - १ लाख ६४ हजार २४७
४५ ते ६० टक्के - ६ लाख ०१ हजार ०६१
४५ टक्केपेक्षा कमी - २ लाख १८ हजार ६४३
=====