IPL 2026 Chennai Super Kings won by 8 wkts vs Mumbai Indians : कर्णधार ऋतुराज गायकवाड आणि IPL च्या इतिहासातील महागडा अनकॅप्ड खेळाडू कार्तिक शर्माच्या नाबाद अर्धशतकाच्या जोरावर चेन्नई सुपर किंग्सच्या संघाने चेपॉकच्या मैदानात मुंबई इंडियन्सला ८ विकेट्स राखून पराभूत केले. या विजयासह चेन्नई सुपर किंग्सच्या संघाने प्लेऑफ्सच्या शर्यतीत आपली दावेदारी कायम ठेवली आहे. दुसरीकडे यंदाच्या हंगामातील ९ सामन्यातील सातव्या पराभवासह मुंबई इंडियन्सच्या संघानं स्वबळावर प्लेऑफ्सचं तिकीट मिळवण्याची संधी गमावली आहे. आता MI च्या संघाने उर्वरित सर्व सामने जिंकले तरी स्पर्धेत टिकून राहण्याचे त्यांचे भवितव्य हे इतर संघाच्या निकालावर अवलंबून असेल.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
MI कडून नमन धीरचं अर्धशतक, CSK कडून अंशुल कंबोजची हवा
चेपॉकच्या मैदानात हार्दिक पांड्याने नाणेफेक जिंकून पहिल्यांदा फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. अंशुल कंबोज याने सलामीवीर विल जॅक्सला अवघ्या १ धावावेर बाद करत MI ला पहिला धक्का दिला. रायन रिकल्टन आणि नमन धीर यांनी संघाचा डाव सावरत ३२ चेंडूत ५२ धावांची भागीदारी रचली. पण नूर अहमदने ही जोडी फोडली. रिकल्टन २४ चेंडूत ३७ धावांवर उर्विल पेटलच्या हाती झेल देऊन परतला. नमन धीरनं ३७ चेंडूत केलेल्या ५७ धावा आणि सूर्यकुमार यादवने चांगली सुरुवात केल्यावर १२ चेंडूत २१ धावांवर तंबूचा रस्ता धरल्यावर तळाच्या फलंदाजीत कुणाला धमक दाखवता आली नाही. हार्दिक पांड्याने २३ चेंडूत फक्त १८ धावा केल्या. परिणामी मुंबई इंडियन्सचा संघ निर्धारित २० षटकात ७ विकेट्सच्या मोबदल्यात फक्त १५९ धावांपर्यंत मजल मारू शकला. चेन्नई सुपर किंग्सकडून अंशुल कंबोज याने सर्वाधिक ३ तर नूर अहमद २ आणि रामकृष्ण घोष आणि जेमी ओवर्टन यांनी प्रत्येकी १-१ विकेट घेतली.
नाशिककर Ramakrishna Ghosh ची कमाल! आधी सुपरमॅन झाला, मग सूर्याच्या विकेटसह पदार्पणात लुटली मैफील
ऋतुराज-कार्तिक जोडी जमली, पराभवासह MI चं गणित बिघडलं
१६० धावांचा बचाव करताना यंदाच्या हंगामात विकेटसाठी संघर्ष करत असलेल्या जसप्रीत बुमराहनं आपल्या पहिल्याच षटकात संजू सॅमसनला माघारी धाडतं MI ला चांगली सुरुवात करून दिली. अल्लाह गझनफर याने उर्विल पटेलच्या रुपात CSK ला आणखी दुसरा धक्का दिला. पण त्यानंतर कर्णधार ऋतुराज गायकवाड आणि IPL मधील सर्वात महागडा अनकॅप्ड खेळाडू कार्तिक शर्मा जोडी जमली. ऋतुराज गायकवाडनं ४८ चेंडूत नाबाद ६७ धावांची खेळी साकारली. दुसऱ्या बाजूला कार्तिक शर्मानं पदार्पणातील हंगामातील ६ व्या सामन्यात ४० चेंडूत नाबाद ५४ धावांची खेळी साकारली. त्याचे IPL मधील हे पहिले अर्धशतक ठरले. विजयासह आगामी सामन्यासाठी CSK साठी ही चांगली बातमी आहे. दुसरीकडे या पराभवासह MI चं प्लेऑफ्सच गणित बिघडलं आहे. अधिकृतरित्या ते शर्यतीत आउट झाले नसले तरी यंदाच्या हंगामात आघाडीच्या चारमध्ये पोहचणं त्यांच्यासाठी मुश्किलच आहे.