पावसामुळे आवक घटली, भाज्यांनी शंभरी ओलांडली; पालेभाज्यांचे दर सामान्यांच्या आवाक्याबाहेर, गड्डी ७० रुपये

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 6, 2025 11:03 IST2025-06-06T10:59:56+5:302025-06-06T11:03:15+5:30

राज्यातील काही भागांत जोरदार पावसामुळे भाज्यांची काढणी थांबली असून काही भागांत पावसामुळे भाज्यांचे नुकसान झाले आहे

Inflows reduced due to rain, vegetables crossed the 100 mark; prices of leafy vegetables are beyond the reach of the common man, a bundle costs Rs 70 | पावसामुळे आवक घटली, भाज्यांनी शंभरी ओलांडली; पालेभाज्यांचे दर सामान्यांच्या आवाक्याबाहेर, गड्डी ७० रुपये

पावसामुळे आवक घटली, भाज्यांनी शंभरी ओलांडली; पालेभाज्यांचे दर सामान्यांच्या आवाक्याबाहेर, गड्डी ७० रुपये

पुणे : मागील आठवड्यात पुणे जिल्ह्यात पडलेल्या मुसळधार पावसामुळे बाजारात पालेभाज्यांची आवक घटली आहे. त्यात काही भाज्यांचे नुकसान झाले आहे, तर काही भाज्यांची तोडणी थांबली आहे. त्यामुळे एकीकडे बाजारातील फळभाज्यांची आवक घटली असून दुसरीकडे ग्राहकांकडून भाज्यांना मागणी वाढली आहे. त्यामुळे बहुतांश प्रकारच्या भाज्यांच्या दराने शंभरी ओलांडली आहे. भाज्यांच्या दरात २० ते ३० टक्क्यांनी वाढ झाली आहे. पावसामुळे दराची स्थिती काही दिवस टिकून राहणार असल्याची माहिती ज्येष्ठ आडते विलास भुजबळ यांनी दिली.

मार्केटयार्डातील भाजीपाला विभागात इतर वेळी राज्य आणि परराज्यातून सुमारे ९० ट्रकची आवक होते. गेल्या काही दिवसांत ही आवक घटली आहे. राज्यातील काही भागांत जोरदार पावसामुळे भाज्यांची काढणी थांबली आहे, तर काही भागांत पावसामुळे भाज्यांचे नुकसान झाले आहे. तसेच सद्यस्थितीत बाजारात विक्रीसाठी दाखल होत असलेल्या भाज्यांमध्ये चांगल्या प्रतीच्या मालाचे प्रमाण कमीच आहे. त्यामुळे चांगल्या प्रतीच्या मालाला अधिकचा दर मिळत असल्याने सध्या पालेभाज्यांचे दर सामान्यांच्या आवाक्याबाहेर गेले आहेत.
पावसाच्या विश्रांतीनंतर ही भाज्या महाग

मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात पुणे जिल्ह्यासह विभागात जोरदार ते मुसळधार पाऊस पडला. या पावसात काढणीच्या आलेल्या भाज्यांची तोडणी न करता आल्यामुळे नुकसान झाले. तसेच पालेभाज्यांचेही मोठे नुकसान झाले. मध्येच चार दिवस पावसाने विश्रांती घेतली. त्यामुळे पावसातून शिल्लक राहिलेल्या भाज्यांची तोडणी सुरू झाली होती. मात्र, पुन्हा सर्वत्र पावसाला सुरुवात झाली आहे. त्यामुळे पुढील काही दिवस फळभाज्या आणि पालेभाज्यांची आवक वाढणार नसल्याचे दरात वाढ राहील असे व्यापाऱ्यांनी सांगितले.

भाज्यांचे किलोचे दर

गवार : १२०
शेवगा : १०० ते १२०
मटार : १२० ते १६०
दोडका : १०० ते १२०
भेंडी : १०० ते १२०
सिमला मिरची : १०० ते १२०

मेथीची जुडी ७० रुपये; सामान्यांच्या ताटातून पालेभाज्या गायब

पावसाला सुरुवात झाली की, पालेभाज्यांचे मोठे नुकसान होते. त्यामुळे शेतकऱ्यांच्या हाती काहीच मिळत नाही. तसेच चांगल्या दर्जाच्या भाज्यांची आवक कमी झाल्याने परिणामी दरवाढ प्रचंड प्रमाणात होते. यामुळे गुरुवारी किरकोळ बाजारात मेथीच्या गड्डीची ६० ते ७० रुपयांनी विक्री करण्यात आली. आतापर्यंतचा हा उच्चांकी दर असल्याचे किरकोळ बाजारातील विक्रेते प्रकाश ढमढेरे यांनी सांगितले. तसेच कोथिंबीर, पालक, अंबाडी, कांदापात या पालेभाज्यांचे दरही वाढले आहेत. या भाज्यांच्या गड्डीचा दर ३० ते ४० रुपयापर्यंत गेले आहेत. यामुळे सर्वसामान्यांच्या ताटातून पालेभाज्यादेखील गाबय झाल्या असल्याने सामान्यांनी जगावे तरी कसे? असा सवाल उपस्थित केला जात आहे.

Web Title: Inflows reduced due to rain, vegetables crossed the 100 mark; prices of leafy vegetables are beyond the reach of the common man, a bundle costs Rs 70

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.