मुलींची सुरक्षितता कागदावरच, गुन्ह्यांचे आकडे वाढताहेत, खाकीचा धाक आहे कुठे? व्यवस्थेचा बळी ठरताहेत निष्पाप बालके!
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 4, 2026 17:07 IST2026-05-04T17:07:07+5:302026-05-04T17:07:15+5:30
Pune Crime: महिलांवरील अत्याचार रोखण्यात पोलीस प्रशासन आणि यंत्रणा वारंवार अपयशी ठरत असून आरोपींना कायद्याची भीती उरली नाही, हे दिसून येत आहे

मुलींची सुरक्षितता कागदावरच, गुन्ह्यांचे आकडे वाढताहेत, खाकीचा धाक आहे कुठे? व्यवस्थेचा बळी ठरताहेत निष्पाप बालके!
पुणे : आज प्रत्येक आई-वडिलांच्या मनात एकच भीती घर करून बसली आहे, ‘आपली मुलं खरंच सुरक्षित आहे का? रस्त्यावर, शाळेत, घराजवळ किंवा अगदी सोसायटीच्या परिसरातही मुली आणि महिला सुरक्षित नाहीत, हे वारंवार घडणाऱ्या आणि गुन्ह्यांच्या वाढत्या घटनांमधून सिद्ध होत आहे.’ नसरापूर येथील चिमुकलीवर अत्याचार करून तिची निर्घृण हत्या आणि महाळुंगे येथील चिमुकल्यावरील अत्याचार आणि गळा चिरून केलेल्या हत्येच्या घटनांनी महाराष्ट्र हादरला आहे. याविरोधात प्रचंड जनक्षोभ उसळला असून, आरोपीला फाशीची शिक्षा देण्याची मागणी होत आहे.
स्वारगेट येथील अत्याचाराच्या घटनेनंतर पुणेकरांनी असाच आक्रोश केला होता. कायदे आहेत, योजना आहेत, पोलिस यंत्रणा आहे. तरीदेखील महिलांवरील अत्याचार रोखण्यात पोलिस प्रशासन आणि यंत्रणा वारंवार अपयशी ठरत आहेत. आरोपींना कायद्याची भीती उरली नाही. पीडितांना न्याय मिळण्यात होणाऱ्या दिरंगाईने आरोपी मोकाटच असल्याचे भीषण वास्तव आहे. भयंकर म्हणजे, शहरात २०२४ मध्ये ५०५ महिलांवर बलात्काराचे गुन्हे नोंदवले गेले, तर ८६४ महिलांचा विनयभंग केल्याच्या घटनांची नोंद झाली. २०२५ मध्ये शहरात ४७३ महिलांवर बलात्काराच्या घटना आणि ८३६ महिलांचा विनयभंग केल्याच्या घटना घडल्या आहेत. राज्यभरात केवळ २०२४-२५ मध्येच ९४ हजार महिला बेपत्ता, त्यात हजारो अल्पवयीन मुलींचा समावेश असल्याचे भीषण वास्तव आहे.
यापूर्वी शहरात घडलेल्या महिला अत्याचारांच्या घटना...
१) स्वारगेट बसस्थानकात महिलेवर बलात्कार...
स्वारगेट बसस्थानकात एका २६ वर्षीय तरुणीवर दत्तात्रय गाडे नामक आरोपीने बसमध्ये बलात्कार केला. ही घटना फेब्रुवारी २०२५ मध्ये घडली होती. गुन्हा घडल्यानंतर ७२ तासांत पोलिसांनी आरोपीला शिरूर तालुक्यातील गुनाट गावातील एका शेतातून ताब्यात घेतले होते.
२) मालधक्का चौकात चिमुकलीचा खून...
नसरापूरप्रमाणेच पुण्यातील मालधक्का चौक परिसरातही असाच माणुसकीला काळिमा फासणारा प्रकार घडला होता. फुटपाथवर आई-वडिलांसोबत झोपलेल्या अडीच वर्षांच्या चिमुकलीचे अपहरण करून नराधमाने तिला रेल्वेच्या एका बोगीत नेऊन अमानुष मारहाण केली. तिच्या शरीराचे ठिकठिकाणी चावे घेतले. गंभीर दुखापत झालेल्या अवस्थेत सापडलेल्या या बालिकेचा ससून रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला.
३) दिव्यांग मुलीवर अत्याचार...
भारती विद्यापीठ पोलिस ठाण्याच्या हद्दीत एका नराधमाने १५ वर्षांच्या दिव्यांग अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याचा प्रकार उघडकीस आला होता. याप्रकरणी पोलिसांनी चार आरोपींना बेड्या ठोकल्या होत्या.
४) सुरक्षा रक्षकाकडून मुलीवर बलात्कार
लक्ष्मीनगर भागातील एका सोसायटीत शैलेश कुमार (वय २५) या सुरक्षारक्षकाने एका १५ वर्षीय मुलीवर वारंवार लैंगिक अत्याचार केले. ‘तुला आणि तुझ्या कुटुंबाला संपवून टाकीन,’ अशी तिला धमकी दिली. प्रकृती बिघडल्याने या मुलीला ससून रुग्णालयात दाखल केल्यानंतर ती पाच महिन्यांची गरोदर असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला होता.
५) अल्पवयीन मुलींना धमकावून बलात्कार...
चंदननगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत मार्च २०२६ मध्ये दोन घटनांमध्ये अल्पवयीन मुलींना धमकावून त्यांच्यावर बलात्कार केल्याच्या घटना घडल्या. याप्रकरणी ‘पोक्सो’ कायद्यांतर्गत दोघा आरोपींना अटक केली होती.
गुन्हेगारांना शिक्षा का नाही?
कायद्याच्या कागदोपत्री तरतुदी असूनही प्रत्यक्षात न्याय प्रक्रिया संथ आहे. पुण्यासारख्या शिक्षणाचे माहेरघर म्हणवल्या जाणाऱ्या शहरात २०२४ मध्ये बलात्कार प्रकरणांमध्ये केवळ १३ ते १८ % शिक्षा दर असल्याचे दिसून येते. या घटनांमध्ये न्यायालयात अनेकदा साक्षीदार फिरतात, तडजोडी होतात, पोलिस तपासात त्रुटी राहतात अथवा राजकीय दबाव परिणामी आरोपी मोकाट फिरतात आणि पीडित कुटुंबे न्यायासाठी भटकत राहतात.
पोलिसांच्या भूमिकेवरच प्रश्नचिन्ह
सरकारकडून महिला सुरक्षेसाठी योजना जाहीर केल्या जातात, पण प्रत्यक्षात पोलिसांची अपुरी गस्त, संवेदनशील भागांवर कमी लक्ष, तक्रारी दाखल करून घेण्यास अनेकदा विलंब यामुळे पोलिसांच्या भूमिकेवरदेखील अनेकदा प्रश्न उपस्थित केले जातात. भोर तालुक्यातील नसरापूर येथील चिमुकलीवरील अत्याचार आणि हत्या हा फक्त गुन्हा नाही, तर संपूर्ण यंत्रणेचा पराभव आहे. आरोपीवर यापूर्वीही महिला अत्याचाराचे गुन्हे दाखल होते. गावकऱ्यांनी आरोपी भीमराव कांबळे याने प्राण्यांवरदेखील अत्याचार केल्याचे सांगितले. यामुळे अशा आरोपीवर पोलिसांनी योग्य ती प्रतिबंधात्मक कारवाई करणे गरजेचे होते.
आकडे काय सांगतात?
- २०२२ साली राज्यात २ हजार ९०४ बलात्काराचे गुन्हे दाखल
- २०२३ मध्ये राज्यात ७ हजार ५२४ बलात्काराचे गुन्हे दाखल
- २०२४ मध्ये राज्यात ७ हजार ९४० बलात्काराचे गुन्हे दाखल
- विनयभंग प्रकरणांमध्येदेखील १७ हजार ३२८ वरून १७ हजार ६७१ पर्यंत वाढ
- २०२४-२५ मध्ये राज्यात ९४ हजार महिला बेपत्ता, त्यात हजारो अल्पवयीन मुलींचा समावेश