सुनेत्रा पवारांच्या ऐतिहासिक विजयावर सुनील तटकरेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “अजितदादा…”
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 4, 2026 21:09 IST2026-05-04T21:09:56+5:302026-05-04T21:09:56+5:30
Sunil Tatkare News: सुनेत्रा पवार यांचा केलेला विक्रम चंद्र-सूर्य-तारे असेपर्यंत राहणार आहे, असा विश्वास सुनील तटकरे यांनी व्यक्त केला.

सुनेत्रा पवारांच्या ऐतिहासिक विजयावर सुनील तटकरेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “अजितदादा…”
Sunil Tatkare News: संपूर्ण भारतात विधानसभेचा आतापर्यंतचा विक्रम मोडत बारामतीकरांनी स्वर्गीय नेते, महाराष्ट्राचे विकासपुरुष अजितदादांना जी भावपूर्ण श्रद्धांजली समर्पित केली. त्याबद्दल तमाम बारामतीकरांनाराष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांनी मानाचा मुजरा केला. प्रदेश कार्यालयात पत्रकार परिषद घेत सुनिल तटकरे यांनी या निवडणूकीबद्दल आपल्या भावना व्यक्त केल्या.
वहिनींनी रेकॉर्डब्रेक म्हणजे २ लाख १८ हजार मताधिक्याने विजय मिळवला. सरासरी ९८ टक्के झालेल्या मतदानामध्ये हे मतदान बारामतीकरांनी वहिनींच्या पाठीशी उभे करत दादांनी आजवर जी काही बारामतीची सेवा केली, त्याची योग्य पद्धतीने अंत:करणापासून भावना व्यक्त केली, असे सांगतानाच दादांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करत असताना वहिनींचे सुनील तटकरे यांनी अभिनंदन केले. आजवर क्रिकेटच्या इतिहासात जसा सचिन तेंडुलकरचा विक्रम आहे तसाच विधानसभेत वहिनींनी केलेला विक्रम चंद्र - सूर्य - तारे असेपर्यंत राहणार आहे, असा विश्वास सुनील तटकरे यांनी व्यक्त केला.
महायुती सरकारवर राज्यातील जनतेने दृढ विश्वास व्यक्त केला
अकरा वेळा अर्थसंकल्प आणि सहा वेळा उपमुख्यमंत्री असा दादांच्या नावाने विक्रम आहेच; शिवाय वहिनी पहिल्या उपमुख्यमंत्री म्हणून त्यांची नोंद महाराष्ट्राच्या इतिहासात झालीच आहे. आजचे मतदान एका वेगळ्या भावनेकडे घेऊन जाणारे आहे असेही सुनिल तटकरे यांनी स्पष्ट केले. देवेंद्र फडणवीस व एकनाथ शिंदे, सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्वाखालील महायुती सरकारवर राज्यातील जनतेने दृढ विश्वास व्यक्त केला आहे. त्याबद्दल राज्यातील जनतेचे आभार मानतानाच जसे बारामतीकरांनी प्रेम व्यक्त केले तसेच खासदार पार्थ पवार, जय पवार आणि बारामतीतील राष्ट्रवादी काँग्रेसचे असंख्य पदाधिकाऱ्यांनी मतदारांपर्यंत पोचण्याचे जे अचूक नियोजन केले, त्याबद्दल सुनील तटकरे यांनी अभिनंदन केले.
दरम्यान, देशाला जगाच्या पाठीवर उत्तम पद्धतीने अधिक विकसित राष्ट्र करणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी, देशाचे कणखर गृहमंत्री अमित शहा यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत पश्चिम बंगाल मध्ये १५ वर्षाच्या प्रदीर्घ कालखंडानंतर परिवर्तन झाले ते अभूतपूर्व अशा पद्धतीचे आहे. अमित शहा हे पश्चिम बंगालमध्ये गेले वर्षभर जी रणनीती करत होते त्यांचे हे यश आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा करिश्मा संबंध देशव्यापी प्रभावित होत आहे, अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांनी आपली प्रतिक्रिया पत्रकार परिषदेत व्यक्त केली.