SSC Exam 2025: मुलांनो तयारी झाली का? उद्यापासून दहावीच्या परीक्षेला सुरुवात, राज्यातून १६ लाख विद्यार्थी
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 20, 2025 15:17 IST2025-02-20T15:15:00+5:302025-02-20T15:17:35+5:30
विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी अर्धा तास आगोदर म्हणजे १०.३० वाजताच परीक्षा केंद्रांवर पोहचावे

SSC Exam 2025: मुलांनो तयारी झाली का? उद्यापासून दहावीच्या परीक्षेला सुरुवात, राज्यातून १६ लाख विद्यार्थी
पुणे: राज्यातील नऊ विभागातील ५ हजार मुख्य केंद्रांवर उद्यापासून (दि. २१) इयत्ता दहावीची अंतिम परीक्षा सुरू होणार आहे. राज्यातील एकूण १६ लाख ११ हजार ६१० विद्यार्थी ही परीक्षा देणार असून ही संख्या गतवर्षीच्या तुलनेत २ हजार १६५ ने जास्त आहे. अशी माहिती महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी पत्रकार परिषदेत दिली.
राज्य शिक्षण मंडळाच्या वतीने पुणे, नागपूर, छत्रपती संभाजी नगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या नऊ विभागांमध्ये २१ फेब्रुवारी ते १७ मार्च २०२५ या दरम्यान इयत्ता दहावीची अंतिम परीक्षा घेतली जात आहे. ही परीक्षा राज्यातील २३ हजार ४९२ माध्यमिक शाळांमधील १६ लाख ११ हजार ६१० विद्यार्थी देणार आहेत. यामध्ये ८ लाख ६४ हजार १२० मुले, ७ लाख ४७ हजार ४७१ मुली आणि १९ तृतियपंथीय विद्यार्थ्यांचा समावेश आहे. मागील वर्षी १६ लाख ९ हजार ४४५ विद्यार्थ्यांनी दहावीची परीक्षा दिली होती. यंदात यात २ हजार १६५ विद्यार्थ्यांची वाढ झाली आहे.
राज्याचीस एकूण ५ हजार १३० केंद्रांवर होणाऱ्या या परीक्षेसाठी १ लाख ८० मनुष्यबळ लागणार आहे. या परीक्षेचे वेळापत्रक मंडळाच्या संकेतस्थळावर २१ नोव्हेंबर २०२४ रोजी जाहीर करण्यात आले आहे. मागील वर्षी १६ लाख ९ हजार ४४५ विद्यार्थ्यांनी दहावीची परीक्षा दिली होती. यंदात यात २ हजार १६५ विद्यार्थ्यांची वाढ झाली आहे. परीक्षेच्या प्रश्नपत्रिकांची वाहतुक करणाऱ्या कर्मचाऱ्याच्या प्रवासावर जीपीएस ट्रॅकरद्वारे नजर राहणार असून परीक्षा केंद्रावर प्रश्नपत्रिका देतानाचे व त्या स्विकारून कपाटामध्ये ठेवतानाचे चित्रण मोबाईलवर करणे बंधनकारक करण्यात आले आहे. परीक्षा केंद्रावरील गैरप्रकार टाळण्यासाठी आणि कॉपीमुक्त परीक्षा होण्यासाठी बैठी पथके व २७१ भरारी पथकांची नेमणुक करण्यात आली आहे. तसेच आवश्यकतेनुसार संवेदनशिल केंद्रांवर ड्रोन कॅमेरा व व्हीडीओ चित्रीकरण करण्यात येणार आहे. गैरप्रकार उघडकीय येणाऱ्या केंद्रांची मान्यता कायमस्वरुपी रद्द करून संबंधीतांवर दखलपात्र व अजामीनपात्र गुन्हे दाखल करण्यात येणार असल्याचेही गोसावी यांनी नमूद केले.
विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी अर्धा तास आगोदर म्हणजे १०.३० वाजताच परीक्षा केंद्रांवर पोहचावे. सकाळच्या सत्रातील परीक्षेसाठी ११ नंतर आणि दुपारच्या सत्रातील परीक्षेसाठी ३ नंतर विद्यार्थ्याला कोणत्याही परीस्थीतीमध्ये परीक्षा हॉलमध्ये प्रवेश दिला जाणार नाही. तसेच दिव्यांग विद्यार्थ्यांना शासनाच्या निर्णयानुसार सर्व सवलती दिल्या जाणार असल्याचेही गोसावी यांनी सांगितले.
गैरप्रकार घडलेल्या ७०१ केंद्रांवर संपूर्ण स्टाफ नवीन
कोरोना काळातील २०२१ व २०२२ या दोन परीक्षा वगळून मागील पाच वर्षात म्हणजे २०१८, २०१९, २०२०, २०२३ आणि २०२४ या परीक्षांमध्ये गैरप्रकार आढळून आलेल्या ७०१ केंद्रामधील सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांना बदलून त्या केंद्रांवर संपूर्ण नीव स्टाफची नियुक्ती करण्यात आली आहे. पुणे विभागात १३९ केंद्रावर नवीन स्टाफ असेल. याशिवाय नागपूर विभागात ८६, छत्रपती संभाजीनगर १५५, मुंबई १८, कोल्हापूर ५३, अमरावती ९८, नाशिक ९३, लातूर ५९ अशा केंद्रावर नवीन स्टाफची नेमणुक असेल. कोकण विभागात गेल्या पाच वर्षात एकाही केंद्रावर गैरप्रकार घडलेला नाही, त्यामुळे त्या विभागातील एकाही केंद्रावरील स्टाफ बदलण्यात येणार नसल्याचे गोसावी यांनी स्पष्ट केले.
विभागनिहाय विद्यार्थी संख्या
पुणे – २७५००४
नागपूर – १५१५०९
छत्रपती संभाजीनगर – १८९३१७
मुंबई – ३६०३१७
कोल्हापूर – १३२६७२
अमरावती - १६३७१४
नाशिक – २०२६१३
लातूर – १०९००४
कोकण – १७३९८
एकूण – १६११६१०
१५ मे पर्यंत निकाल
शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात येत असलेल्या दहावी व बारावीच्या परीक्षेचा निकाल मे महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात म्हणजे १५ मे पर्यंत लावण्यात येणार आहे, अशीही माहिती शरद गोसावी यांनी दिली.