९ महिन्यांत १५५२ जणांना सुमारे १४ कोटींचा दंड; वीजचोरी आणि विजेचा गैरवापर करणाऱ्यांना महावितरणचा दणका
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 21, 2026 17:06 IST2026-04-21T17:06:19+5:302026-04-21T17:06:33+5:30
आकडा टाकून किंवा मीटरला छेडछाड करुन थेट वीजचोरी करणाऱ्यांविरुद्ध पुणे परिमंडलात एकूण १ हजार ४५ वीजचोरीची प्रकरणे उघडकीस आली आहेत

९ महिन्यांत १५५२ जणांना सुमारे १४ कोटींचा दंड; वीजचोरी आणि विजेचा गैरवापर करणाऱ्यांना महावितरणचा दणका
पुणे: महावितरणच्या पुणे परिमंडलाने वीजचोरी आणि विजेचा गैरवापर करणाऱ्यांविरुद्ध मोठी कारवाई केली आहे. भारतीय विद्युत कायदा २००३ च्या विविध कलमांनुसार पुणे परिमंडलात एप्रिल २०२५ ते जानेवारी २०२६ या ९ महिन्यांच्या काळात तब्बल १ हजार ५५२ ग्राहकांवर कारवाई केली आहे. त्यानुसार या कारवाईत या ग्राहकांकडून एकूण १४ कोटी रुपयांहून अधिक दंड वसूल करण्यात आला आहे.
१०४५ वीजचोरांवर कारवाई
आकडा टाकून किंवा मीटरला छेडछाड करुन थेट वीजचोरी करणाऱ्यांविरुद्ध विद्युत कायद्याच्या कलम १३५ नुसार पुणे परिमंडलात एकूण १ हजार ४५ वीजचोरीची प्रकरणे उघडकीस आली असून, त्यांना ९ कोटी ९९ लाख २३ हजार रुपयांचा दंड आकारण्यात आला आहे.
५०७ ग्राहकांकडून विजेचा गैरवापर
एखादा ग्राहक घरगुतीसाठी वीज घेत असेल आणि त्याचा वापर वाणिज्यिक किंवा इतर कारणांसाठी करत असेल तर त्यास कलम १२६ अंतर्गत दंड आकारण्यात येतो. या प्रकरणांत ५०७ ग्राहकांवर कारवाई करण्यात आली असून त्यांना ४ कोटी १ लाख ८८ हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे.
मंडलनिहाय आकडेवारी (कलम १३५)
पुणे ग्रामीण : ४५१ प्रकरणे (२८९.०२ लाख रुपये)
रास्ता पेठ शहर : २८८ प्रकरणे (३८५.१२ लाख रुपये)
गणेशखिंड शहर : ३०६ प्रकरणे (३२५.०९ लाख रुपये)
मंडलनिहाय आकडेवारी (कलम १२६)
पुणे ग्रामीण : २९ प्रकरणे (५१.४ लाख रुपये)
रास्ता पेठ शहर : १४० प्रकरणे (६९.३१ लाख रुपये)
गणेशखिंड शहर : ३३८ प्रकरणे (२८१.१७ लाख रुपये)
महावितरणचे आवाहन
महावितरणने ग्राहकांना आवाहन केले आहे की, ग्राहकांनी अधिकृत वीज जोडणी घेऊनच विजेचा वापर करावा आणि वीजचोरी टाळावी. वीजचोरी करणे हा गंभीर गुन्हा असून यामध्ये दंडात्मक कारवाईसोबतच कारावासाच्या शिक्षेचीही तरतूद आहे.