पुणे विमानतळावरून पळून जाण्याच्या तयारीत असलेले ३ बांगलादेशी जेरबंद
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 18, 2026 16:57 IST2026-05-18T16:57:05+5:302026-05-18T16:57:16+5:30
गेल्या दहा महिन्यांच्या कालावधीत परिमंडळ १ मधून ९७ बांगलादेशींना ताब्यात घेण्यात आले असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे

पुणे विमानतळावरून पळून जाण्याच्या तयारीत असलेले ३ बांगलादेशी जेरबंद
पुणे : पुणे विमानतळावरून गुवाहाटी (आसाम) येथे पळून जाण्याच्या तयारीत असलेल्या दोन बांगलादेशी महिलांसह एका अल्पवयीन मुलाला खडक पोलिसांनी विमानतळ पोलिसांच्या मदतीने जेरबंद केले. शाहीनूर बेगम शेख (वय ४२), शागुरिका बेगम युलिया शेख (वय २८) आणि टोपू ऊर्फ मुराद अहमद शेख (वय १६ वर्षे ९ महिने) अशी ताब्यात घेतलेल्या संशयितांची नावे आहेत.
पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी शहरात अवैधरीत्या वास्तव्य करणाऱ्या बांगलादेशींविरोधात विशेष मोहीम राबवण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार परिमंडळ १ चे पोलिस उपायुक्त कृषिकेश रावले यांना बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, दोन महिला आणि एक पुरुष असे तीन बांगलादेशी नागरिक पुणे विमानतळावरून गुवाहाटीला जाण्याच्या तयारीत आहेत.
या माहितीच्या आधारे खडक पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक शशिकांत चव्हाण यांनी तपास पथकाला विमानतळावर रवाना केले. विमानतळ पोलिस ठाण्याचे अधिकारी पालवे, सीआयएसएफचे अधिकारी संतोषकुमार अग्निहोत्री व त्यांच्या पथकाच्या मदतीने विमानतळ परिसरात सापळा रचण्यात आला. त्यावेळी संशयितांना ताब्यात घेण्यात आले.
चौकशीत त्यांनी आपण बांगलादेशातील बिगाराट जिल्ह्यातील रहिवासी असल्याचे सांगितले. तसेच ते सोलापूरहून पुण्यात आले असून, पुण्याहून गुवाहाटीला जाणार असल्याची कबुली दिली. पुढील कारवाईसाठी तिघांना विमान नगर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. गेल्या दहा महिन्यांच्या कालावधीत परिमंडळ १ मधून ९७ बांगलादेशींना ताब्यात घेण्यात आले असल्याची माहिती उपायुक्त कृषिकेश रावले यांनी दिली. ही कारवाई पोलिस आयुक्त अमितेश कुमार, सहपोलिस आयुक्त रंजनकुमार शर्मा, अपर पोलिस आयुक्त राजेश बनसोडे, उपायुक्त कृषिकेश रावले आणि एसीपी अनुजा देशमाने यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.