"RSS महिलांचा सन्मान करत नाही; ही फॅसिस्ट, पुरुषवादी संघटना", राहुल गांधींचा हल्लाबोल

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 24, 2021 08:40 IST2021-01-24T08:37:29+5:302021-01-24T08:40:09+5:30

Congress Rahul Gandhi And BJP : राहुल गांधी यांनी मोदींवर टीकास्त्र सोडलं आहे. याच दरम्यान राहुल यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघावरही हल्लाबोल केला आहे.

tamilnadu assembly election 2021 rahul gandhi attacked the center from tirupur | "RSS महिलांचा सन्मान करत नाही; ही फॅसिस्ट, पुरुषवादी संघटना", राहुल गांधींचा हल्लाबोल

"RSS महिलांचा सन्मान करत नाही; ही फॅसिस्ट, पुरुषवादी संघटना", राहुल गांधींचा हल्लाबोल

नवी दिल्ली - काँग्रेस नेते राहुल गांधी सध्या तामिळनाडूच्या दौऱ्यावर आहेत. जनतेला संबोधित करताना त्यांनी विविध मुद्द्यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. राहुल गांधी निवडणूक प्रचाराचा शुभारंभ करण्यासाठी कोईंबत्तूरमध्ये पोहचले आहेत. तामिळनाडूमध्ये विधानसभा निवडणूक होणार आहे. या पार्श्वभूमीवर तीन दिवसीय दौऱ्यावर आलेल्या राहुल गांधी यांनी मोदींवर टीकास्त्र सोडलं आहे. याच दरम्यान राहुल यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघावरही हल्लाबोल केला आहे. शनिवारी राहुल यांनी तिरुपूरमधील जनतेला संबोधित केलं. त्यावेळी त्यांनी आरएसएसवर टीकास्त्र सो़डलं आहे. आरएसएसमध्ये महिलांचा सन्मान नाही, ही पुरुषवादी संघटना असल्याचं राहुल यांनी म्हटलं आहे.

"महिलांना समान स्थान दिल्याशिवाय कोणताही देश प्रगती करू शकत नाही या गोष्टीशी मी सहमत आहे. दुर्दैवाने देशावर नियंत्रण ठेवणारी ही संघटना फॅसिस्ट, पुरुषवादी आहे. आरएसएसमध्ये महिलांना समाविष्ट होण्याची परवानगी नाही. आरएसएसमध्ये सुरुवातीपासूनच महिलांशी भेदभाव केला जात होता. ते महिलांचा आदर करत नाहीत. आदर केला असता तर त्यांनी महिलांचा संघटनेत समावेश केला असता" असं राहुल गांधी यांनी म्हटलं आहे. तसेच 'नरेंद्र मोदी एक एक करून देशातील जनतेशी संबंधित असलेली प्रत्येक वस्तू विकत आहेत. मोदींनी बड्या उद्योजकांशी भागीदारी केली आणि जनतेच्या मालकीचं सर्व काही विकत आहेत' असा आरोप देखील राहुल गांधी यांनी केला आहे. 

राहुल गांधी यांनी व्यापाऱ्यांशी संवाद साधताना जीएसटीचा मुद्दा उपस्थित केला. आम्ही सत्तेत आल्यावर जीएसटीची पुनर्रचना करू. मोदी सरकारने जीएसटीची योग्यप्रकारे अंमलबजावणी केली नाही. जीडीपीमधील घसरणीचं एक प्रमुख कारण जीएसटीचे अपयश असल्याचा दावा राहुल गांधींनी केला आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. तामिळनाडूमध्ये तीन दिवसीय दौऱ्यावर आलेल्या राहुल गांधी यांनी पंतप्रधान मोदींवर टीकास्त्र सोडलं आहे. "मोदी तामिळनाडूची संस्कृती, भाषा आणि लोकांचा आदर करत नाहीत" असा घणाघात राहुल गांधी यांनी केला आहे. 

"मोदी तामिळनाडूची संस्कृती, भाषा आणि लोकांचा आदर करत नाहीत", राहुल गांधींचा घणाघात

"पंतप्रधान नरेंद मोदी तामिळनाडूची संस्कृती, भाषा आणि लोकांचा आदर करत नाहीत. तामिळनाडुतील लोकं, भाषा व संस्कृतीने त्यांच्या विचारांच्या आणि संस्कृतीच्या अधीन असायला हवं असं त्यांचं मत आहे. तसेच न्यू इंडियाची त्यांची धारणा आहे की, तामिळनाडूतील लोकांनी देशात दुसऱ्या दर्जाचे नागरीक असायला हवं. या देशात अनेक भाषा आहेत. आम्हाला असं वाटतं की सर्व भाषा, तामिळ, हिंदी, बंगाली, इंग्रजी इत्यादींचे या देशात स्थान आहे" असं राहुल गांधी यांनी म्हटलं आहे. राहुल गांधी यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून रोड शो चा एक व्हिडीओ देखील शेअर केला आहे. तसेच यासोबत पुन्हा एकदा तामिळनाडूमध्ये येऊन खूश असल्याचं म्हटलं आहे.

Web Title: tamilnadu assembly election 2021 rahul gandhi attacked the center from tirupur