मुंबई: व्यवसायिक मनसुख हिरेन यांच्या संशयास्पद मृत्यूनंतर भारतीय जनता पक्षानं पोलीस अधिकारी सचिन वाझे यांच्यावर गंभीर आरोप केले. आता भाजपपाठोपाठ महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनंदेखील सचिन वाझे यांना लक्ष्य केलं आहे. मनसेनं सचिन वाझेंचं शिवसेना कनेक्शन उपस्थित करत काही महत्त्वाचे प्रश्न उपस्थित केले आहेत. त्यामुळे वाझे यांच्यासोबतच सत्ताधारी शिवसेनेच्या अडचणीदेखील वाढण्याची शक्यता आहे. (MNS Leader Sandeep Deshpande hits out at Shiv Sena over Sachin Waze)
मनसुख हिरेन यांच्या मृत्यूचे विधानसभेत पडसाद; विरोधक आक्रमक
मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी ट्विट करून काही महत्त्वाचे प्रश्न विचारले आहेत. 'सचिन वाझे यांनी २००८ साली शिवसेनेत प्रवेश केला होता. त्यामुळे ह्या प्रकरणाचे गूढ अधिकच वाढले आहे. सगळ्या महत्वाच्या केसेस या त्यांच्याकडेच का सोपवल्या जातात? तसेच शिवसेनेचे मुख्यमंत्री झाल्यावर सचिन वाझे पुन्हा शासकीय सेवेत कसे रुजू होतात?, असे प्रश्न देशपांडे यांनी उपस्थित केले आहेत.
मनसुख हिरेन यांच्या मोबाईलवर आलेला तो कॉल नेमका कुणाचा?; मुंबई पोलिसांचं स्पष्टीकरण
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांचे आरोप
या आधी विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनीही मनसुख हिरेन मृत्यूप्रकरणी वाझेंवर काही आरोप केले आहेत. पोलीस अधिकारी सचिन वाझे यांचं घर ठाण्यात आहे. जी गाडी चोरी झाली, ती सुद्धा ठाण्यातच सापडली. इतकंच नाही, जी गाडी चोरी होऊन ज्या मार्गानं आली आणि तिथे पार्क झाली, तिच्यासोबत सफेद इनोव्हा ठाण्यातूनच आली. एक गाडी पार्क झाली आणि एक निघून गेली. त्याच सचिन वाझे यांना या प्रकरणात तपास अधिकारी म्हणून नेमलं आहे. हे आश्चर्यकारक आहे, असं फडणवीस म्हणाले होते.
हिरेन बेपत्ता झाल्यानंतर स्थानिक पोलीस आणि इतर कुणीही क्रॉफर्ड मार्केटला पोहोचले नाहीत. सचिन वाझे सगळ्यात आधी तिथे पोहोचले. त्यांनाच तिथे चिठ्ठी सापडली. त्यांनाच चौकशी अधिकारी नेमलं. आश्चर्य म्हणजे जून-जुलैमध्ये २०२० मध्ये सचिन वाझेंचं या गाडी मालकाशी संभाषण झालं होतं, असा आरोपही फडणवीस यांनी केला आहे.