Eknath Khadse: ४० वर्षांनंतर 'नाथाभाऊं'ची भाजपाला सोडचिठ्ठी; जाणून घ्या त्यांचा संपूर्ण राजकीय प्रवास

By प्रविण मरगळे | Published: October 21, 2020 01:43 PM2020-10-21T13:43:38+5:302020-10-21T15:25:31+5:30

BJP Eknath Khadse will Join NCP News: अनेक वर्षांचा अनुभवी नेता, राज्यातील विविध विषयाचा अभ्यास असणारा नेता राष्ट्रवादीत येत आहे, त्यांचे स्वागत आम्ही करतो. खडसेंच्या येण्याने राष्ट्रवादीला बळ मिळेल. राष्ट्रवादीकडून त्यांना योग्य तो सन्मान दिला जाईल असं जयंत पाटील यांनी सांगितले आहे.

Eknath Khadse leaves BJP after 40 years; Know about entire political journey | Eknath Khadse: ४० वर्षांनंतर 'नाथाभाऊं'ची भाजपाला सोडचिठ्ठी; जाणून घ्या त्यांचा संपूर्ण राजकीय प्रवास

Eknath Khadse: ४० वर्षांनंतर 'नाथाभाऊं'ची भाजपाला सोडचिठ्ठी; जाणून घ्या त्यांचा संपूर्ण राजकीय प्रवास

googlenewsNext
ठळक मुद्देअनेक वर्षांचा अनुभवी नेता, राज्यातील विविध विषयाचा अभ्यास असणारा नेता राष्ट्रवादीत येत आहे - जयंत पाटील१९८० मध्ये एकनाथ खडसे यांनी भाजपा कार्यकर्त्याच्या रुपात सक्रिय राजकारणात प्रवेश केलापहिली निवडणूक कोथडी ग्रामपंचायतीची होती. मात्र पहिल्याच निवडणुकीत खडसेंना पराभवाचा धक्का बसला होता. सलग सहा टर्म (१९८९ – २०१९) म्हणजे तब्बल तीस वर्ष मुक्ताईनगर हा खडसेंचा बालेकिल्ला राहिला

मुंबई – भाजपा नेते एकनाथ खडसे यांच्याबाबत सुरु असलेल्या चर्चेला अखेर पूर्णविराम मिळाला आहे. एकनाथ खडसे शुक्रवारी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याची घोषणा प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केली आहे. गेल्या अनेक दशकापासून एकनाथ खडसे यांनी भाजपा वाढवण्यासाठी प्रयत्न केले, परंतु अलीकडच्या काळात खडसेंना पक्षात डावललं जात असल्याचं दिसून आलं होतं.

याबाबत जयंत पाटील म्हणाले की, एकनाथ खडसेंनी भाजपाचा त्याग केलेला असल्याने शुक्रवारी दुपारी २ वाजता ते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करतील, अनेक वर्षांचा अनुभवी नेता, राज्यातील विविध विषयाचा अभ्यास असणारा नेता राष्ट्रवादीत येत आहे, त्यांचे स्वागत आम्ही करतो. खडसेंच्या येण्याने राष्ट्रवादीला बळ मिळेल. राष्ट्रवादीकडून त्यांना योग्य तो सन्मान दिला जाईल असं त्यांनी सांगितले आहे.

“महाराष्ट्रात राजकीय भूकंप! खडसेंसोबत भाजपाचे अनेक आमदार पक्ष सोडण्याच्या तयारीत"

एकनाथ खडसेंचा राजकीय प्रवास कसा होता?

१९८० मध्ये एकनाथ खडसे यांनी भाजपा कार्यकर्त्याच्या रुपात सक्रिय राजकारणात प्रवेश केला. उत्तर महाराष्ट्रात भाजपाचा पाया प्रस्थापित करण्यात एकनाथ खडसेंचा मोठा वाटा मानला जातो. लेवा समाजातील असलेल्या खडसेंकडे ओबीसी नेतृत्व म्हणून पाहिले जाते. एकनाथ खडसे यांनी लढवलेली पहिली निवडणूक कोथडी ग्रामपंचायतीची होती. मात्र पहिल्याच निवडणुकीत खडसेंना पराभवाचा धक्का बसला होता. पुढे, १९८७ मध्ये त्याच कोथडी गावाचे ते सरपंच झाले. १९८९ मध्ये मुक्ताईनगर मतदारसंघातून ते विधानसभेवर आमदार म्हणून निवडून आले. सलग सहा टर्म (१९८९ – २०१९) म्हणजे तब्बल तीस वर्ष मुक्ताईनगर हा खडसेंचा बालेकिल्ला राहिला.

१९९५ ते १९९९ मध्ये शिवसेना-भाजप युती सरकारमध्ये खडसेंनी अर्थ आणि सिंचन या दोन मंत्रालयांची जबाबदारी स्वीकारली होती. खडसेंनी नोव्हेंबर २००९ ते ऑक्टोबर २०१४ या काळात विरोधी पक्षनेते म्हणून काम पाहिले आहे. (Eknath Khadse Political Career)

२०१४ मध्ये एकनाथ खडसे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत अग्रस्थानी मानले जात होते. पण अखेर देवेंद्र फडणवीस यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले. फडणवीस सरकारमध्ये त्यांच्याकडे महसूल मंत्रालयाची धुरा होती. मात्र भ्रष्टाचाराच्या आरोपातून ३ जून २०१६ रोजी एकनाथ खडसेंवर मंत्रिपदाचा राजीनामा देण्याची वेळ आली. २०१९ मधील विधानसभा निवडणुकीत भाजपाने एकनाथ खडसे यांना तिकीट नाकारलं होतं. त्यांच्याऐवजी कन्या रोहिणी खेवलकर-खडसे यांना उमेदवारी देण्यात आली. मात्र राष्ट्रवादी पुरस्कृत अपक्ष उमेदवार चंद्रकांत लिंबा पाटील यांनी १९८७ मतांनी त्यांचा पराभव केला.

महाराष्ट्रातील मोठी राजकीय बातमी; एकनाथ खडसेंचा भाजपाला 'राम-राम', शुक्रवारी राष्ट्रवादीचं 'घड्याळ' बांधणार!

राज्यातील विविध प्रश्न त्यांनी विधानसभेत प्रखरतेने मांडले आहेत. आपल्या भाषणातून कायम त्यांनी शेतकऱ्यांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रयत्न केले. १९९७ ते १९९९दरम्यान पाटबंधारे मंत्री म्हणून त्यांनी महाराष्ट्रातील महत्त्वपूर्ण सिंचन प्रकल्पांना मंजुरी दिली व अपूर्ण कामे पूर्ण केली. कृष्णा खोरे विकास महामंडळांतर्गत सिंचन प्रकल्पांनाही खडसेंनी गती दिली. सर्वात महत्त्वाचे म्हणजे त्यांनी "प्रथम पुनर्वसन आणि नंतर सिंचन प्रकल्प" याचा पुरोगामी निर्णय घेतला. एकनाथ खडसेंनी उत्तर महाराष्ट्रासाठी तापी खोरे विकास महामंडळ स्थापन केले होते.

उच्च व तंत्रशिक्षणमंत्री म्हणून काम करत असताना एकनाथ खडसेंनी राज्यातील प्रत्येक तहसिलमध्ये एक आयटीआय स्थापन केली आणि अशा प्रकारे त्यांनी राज्यभरात ३५८ आयटीआय स्थापन केले आहेत. या आयटीआयमध्ये मुलींसाठी ३०% जागा राखीव ठेवण्याच्या महत्त्वपूर्ण प्रगतीशील निर्णय आणि काश्मीरमधील हिंदू शरणार्थींसाठी २% जागा राखीव ठेवण्याचा निर्णयही खडसेंनी घेतला. एकनाथ खडसेंनी ट्रस्ट रूग्णालयातील बीपीएल लाभार्थ्यांसाठी १० टक्के खाट आरक्षित करण्यासही सरकारला भाग पाडले.

विरोधी पक्षनेते म्हणून दमदार कामगिरी

एकनाथ खडसे यांनी विधानसभेचे विरोधी पक्षनेते म्हणूनही दमदार कामगिरी केली आहे. अभ्यासू आणि लोकांच्या प्रश्नांवर आक्रमकपणे त्यांनी अनेकदा विधानसभेत सरकारला धारेवर धरले. आकडेवारी, पुराव्यांसह ते सरकारच्या मंत्र्यावर तुटून पडत होते. एकेकाळी नागपूर अधिवेशनात व्हॅट प्रश्नावर चर्चा करताना एकनाथ खडसेंनी सलग साडे आठ तास भाषण करून विक्रम नोंदवला. याच भाषणामुळे तत्कालीन पंतप्रधान चंद्रशेखर यांनी एकनाथ खडसेंचा विशेष सन्मान केला.

Web Title: Eknath Khadse leaves BJP after 40 years; Know about entire political journey

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.