Sara Tendulkar : "कसं वागावं, कोणते कपडे घालावे?"; सारा तेंडुलकरने केला सचिनच्या 'कडक' शिस्तीबाबत खुलासा
Updated:May 3, 2026 17:08 IST2026-05-03T16:58:11+5:302026-05-03T17:08:10+5:30
Sara Tendulkar And Sachin Tendulkar : क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकर प्रत्यक्षात वडील म्हणून कसा असेल, असा प्रश्न तुम्हाला कधी पडला आहे का? सचिनची मुलगी सारा तेंडुलकरने 'कर्ली टेल्स' (Curly Tales) सोबतच्या मनमोकळ्या गप्पांमध्ये हे गुपित उघड केलं.

क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकर प्रत्यक्षात वडील म्हणून कसा असेल, असा प्रश्न तुम्हाला कधी पडला आहे का? सचिनची मुलगी सारा तेंडुलकरने 'कर्ली टेल्स' (Curly Tales) सोबतच्या मनमोकळ्या गप्पांमध्ये हे गुपित उघड केलं.
सारा म्हणाली, "आई आणि बाबा दोघेही खूप वेगळे आहेत. माझी आई शिक्षणाबाबत आणि इतर गोष्टींबाबत जास्त कडक होती. पण माझे वडील आम्ही कसं वागावं, काय करावं आणि अगदी कोणते कपडे घालावे यांसारख्या गोष्टींबाबत जास्त शिस्तप्रिय होते."
पालकांकडून मिळालेल्या सल्ल्यांबद्दल बोलताना साराने सचिनने दिलेला एका खास सल्ला सांगितला. सारा म्हणाली, "ते नेहमी सांगतात की, 'तुझ्या स्वातंत्र्याचा आणि स्वावलंबनाचा वापर नेहमी जबाबदारीने कर.'"
भाऊ अर्जुनबद्दल बोलताना सारा मिश्किलपणे म्हणाली, "मी असं म्हणणार नाही की तो जास्त लाडका आहे, पण मला नेहमी वाटतं की धाकट्या मुलाचं आयुष्य सोपं असतं. लहानाची मोठी होत असताना सर्व लढाया मला लढाव्या लागल्या आणि माझ्या भावाला मात्र त्याचे आयते फायदे मिळाले."
या संदर्भात 'आदित्य बिर्ला एज्युकेशन ट्रस्ट'च्या 'एम्पॉवर' (Mpower) मधील मानसशास्त्रज्ञ मुस्कान मारवाह यांनी आपलं मत व्यक्त केलं. त्या म्हणाल्या की, पालकत्व म्हणजे मुलांना मार्गदर्शन, शिस्त आणि प्रेम देणं आणि त्याच वेळी त्यांना स्वतंत्रपणे वाढण्यासाठी आणि शिकण्यासाठी पुरेशी जागा देणे यांचा एक नाजूक समतोल आहे.
पालकांसमोर सर्वात कठीण काम म्हणजे शिस्तप्रिय असणं आणि अतिरेकी नियंत्रण यातील योग्य रेषा ओळखणं. विकासासाठी मर्यादा आवश्यक आहेत, पण त्या मर्यादा ओलांडल्यास त्याचे विपरीत परिणाम होऊ शकतात" असं त्यांनी 'indianexpress.com' शी बोलताना सांगितलं.
त्यांच्या मते, कडक पालकत्वामध्ये स्पष्ट नियम, उच्च अपेक्षा आणि वर्तणुकीचे परिणाम यांचा समावेश असतो. "मुलांना शिस्त आणि दिनचर्येचा फायदा होतो, ज्यामुळे त्यांना सुरक्षित वाटतं. जेव्हा पालक सातत्याने नियम पाळतात आणि स्पष्ट मार्गदर्शक तत्त्वे देतात, तेव्हा मुलांमध्ये निर्णय घेण्याची क्षमता आणि जबाबदारीची भावना विकसित होते."
मात्र, पालकांचा दृष्टिकोन हा नेहमी सकारात्मक असणं गरजेचा आहे. नियम का केले आहेत हे पालकांनी मुलांना समजावून सांगितले पाहिजे आणि जेव्हा मुलं त्यांचं पालन करतात तेव्हा त्यांचं कौतुकही केलं पाहिजे, असंही त्यांनी नमूद केलं.
प्रत्येक गोष्टीचं नीट व्यवस्थापन , अवास्तव अपेक्षा किंवा परिपूर्णतेची मागणी यामुळे मुलांमध्ये कालांतराने चिंता, नैराश्य आणि आत्मविश्वासाचा अभाव निर्माण होऊ शकतो.
मारवाह यांनी पुढे स्पष्ट केलं की, मर्यादा निश्चित करणं आवश्यक असले तरी, 'ओव्हरबेअरिंग' (अति-नियंत्रण ठेवणाऱ्या) पालकत्वामध्ये मुलाच्या प्रत्येक कृतीवर, निर्णयावर आणि सामाजिक भेटीगाठीवर टोकाचे नियंत्रण ठेवले जाते. यामुळे मुलांमध्ये गुदमरल्यासारखी किंवा आपली बाजू समजून घेतली जात नाही अशी भावना निर्माण होऊ शकते.