"महाराजांनी दिलेल्या शिक्षेची आठवण होते...", नसरापूर प्रकरणावर रितेश देशमुखची प्रतिक्रिया
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 3, 2026 16:47 IST2026-05-03T16:47:13+5:302026-05-03T16:47:48+5:30
'राजा शिवाजी' सिनेमामुळे चर्चेत असलेल्या रितेश देशमुखनेही या घटनेवर संताप व्यक्त केला आहे.

"महाराजांनी दिलेल्या शिक्षेची आठवण होते...", नसरापूर प्रकरणावर रितेश देशमुखची प्रतिक्रिया
पुण्यातील भोर तालुक्यातील नसरापूर येथे चार वर्षीय चिमुकलीवर अत्याचार करुन तिची निर्घृण हत्या करण्यात आली. या घटनेने अख्खा महाराष्ट्र पेटून उठला आहे. ६५ वर्षीय त्या नराधमाला तात्काळ फाशी व्हावी म्हणत सर्वच भडकले आहेत. अनेकांनी शिवरायांच्या काळात हे घडलं असतं तर कशी शिक्षा असती याची आठवण करुन दिली. सध्या 'राजा शिवाजी' सिनेमामुळे चर्चेत असलेल्या रितेश देशमुखनेही या घटनेवर संताप व्यक्त केला आहे.
माध्यमांना दिलेल्या मुलाखतीत रितेश देशमुख म्हणतो, "अशा घटना घडल्या की छत्रपती शिवाजी महाराजांची जी चौरंग करण्याची शिक्षा आहे त्याची आठवण येते. या अशा घटना घडल्यावर आपण काहीच करु शकत नाही आहोत याचा रागही येतो. न्यायालयाने लवकरात लवकर निर्णय देऊन कारवाई करावी इतकीच आशा आपण व्यक्त करु शकतो. कारवाईही अशी कडक असली पाहिजे की पुन्हा कोणी असं कृत्य करण्याचा विचारही करु शकणार नाही. तेवढा तो दरारा असला पाहिजे."
तो पुढे म्हणाला, "मला वाटतं अशा गोष्टी घडतात तेव्हा जनआक्रोश होणं साहजिकच आहे. अटक करणं, मग ते प्रकरण न्यायालयात जाणं यात वेळ लागतो. फास्टट्रॅक कोर्टात अशा केसेस चालवणं गरजेचं आहे. आधीचा काळ वेगळा होता आणि आजचा वेगळा आहे हेही आपण समजून घेतलं पाहिजे. नियमात राहूनच सगळं करावं लागतं. आपलं संविधान आहे, न्यायव्यवस्था आहे. त्यामुळे अशा घटना घडल्यावर जितक्या लवकर निर्णय घेतले जातील तितकं बरं."