"एम्सचा अहवाल नाकारण्यासाठी सीबीआयवर दबाव आणला जाऊ शकतो!"

By ऑनलाइन लोकमत | Published: October 9, 2020 07:57 PM2020-10-09T19:57:29+5:302020-10-09T19:59:54+5:30

Sachin Sawant : भाजपाच्या मॉडेलमधला हा मोहरा अडचणीत आल्याने, त्याची विश्वासार्हता पूर्णपणे रसातळाला गेल्याने भाजपा अध्यक्ष जे. पी. नड्डा व प्रकाश जावडेकर हे त्याच्या मदतीसाठी धडपड करत आहेत, असे सचिन सावंत म्हणाले.

CBI may be pressured to reject AIIMS report - sachin sawant | "एम्सचा अहवाल नाकारण्यासाठी सीबीआयवर दबाव आणला जाऊ शकतो!"

"एम्सचा अहवाल नाकारण्यासाठी सीबीआयवर दबाव आणला जाऊ शकतो!"

Next
ठळक मुद्देबिहारच्या निवडणुकीत काही काळ मुखभंग होण्याचे टाळण्यासाठी एम्स पॅनलचा रिपोर्ट नाकारण्याकरता सीबीआयवर दबाव आणण्याची शक्यता नाकारता येत नाही, असे सचिन सावंत म्हणाले.

मुंबई : मुंबई पोलिसांनी उघड केलेल्या टीआरपी घोटाळ्याने लोकशाही विरोधातील कट उघडकीस आला आहे. यातून लोकशाही किती संकटात आहे ते स्पष्ट झाले आहे. लोकशाहीचा चौथा स्तंभ कमजोर करण्याचे हे कारस्थान आहे. फ्रॉड पद्धतीने टीआरपी वाढवल्याचे दाखवून केलेला हा आर्थिक घोटाळा तर आहेच परंतु भारतीय जनता पक्षाच्या षडयंत्राचाही तो एक भाग आहे, अशी घणाघाती टीका करत महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस व प्रवक्ते सचिन सावंत यांनी मुंबई पोलिसांनी उघड केलेला हा घोटाळा लोकशाहीच्या हितासाठी असून आम्ही त्याचे स्वागत करतो, असे म्हटले आहे.

देश पातळीवरती लोकशाहीमध्ये जनमानसाचा स्वंतत्रपणे विचार करुन मत ठरवण्याचा अधिकार संपुष्टात आणण्याकरिता त्यांची विचार करण्याची क्षमताच कुंठीत करण्याचा प्रयत्न सुरु आहे. असत्याला सत्य म्हणून दर्शवावे व विरोधी पक्षांच्या सरकारांविरोधात कृत्रिम जनक्षोभ निर्माण करावा, याकरता मोदी सरकारच्या मदतीने एक कुटील कार्यपद्धती तयार करण्यात आली आहे. यामध्ये मोदी संचालित वाहिन्यांचा मोठा सहभाग आहे. यानुसार मुंबई पोलिसांनी जो घोटाळा उघड केला. त्यामध्ये भाजपाचा अजेंडा राबवणाऱ्या एका वाहिनीने फ्रॉड करुन आपला टीआरपी जास्त आहे हे दाखवण्याचा प्रयत्न केला. याअनुषंगाने आम्ही जे दाखवतो ते सत्य आणि आम्ही जे म्हणतो तीच जनभावना हे दर्शवण्याचा प्रयत्न केला गेला यामध्ये इतर वाहिन्यांचा टीआरपी कमी झाल्याने सदर वाहिनीवर दाखवलेल्या बातम्या जनतेला आवडतात असा समज होऊन त्याही त्याच बातम्या दाखवण्यास सुरुवात करतात. यातून देशाचे नॅरेटीव्ह तयार केले जाते, असे सचिन सांवत यांनी सांगितले.

याचबरोबर, सुशांत सिंह प्रकरणात हेच घडले आहे. सदर वाहिनी सातत्याने सुशांत सिंहची आत्महत्या नसून त्याला मारले गेले आहे, हे बिंबवण्याचा प्रयत्न करत होती व याला अधिक बळ मिळावे, याकरिता सोशल मीडियाध्ये हजारो खोटी फेसबुक, ट्वीटर अकाऊंट व यूट्यूब चॅनेल तयार करण्यात आली. यातून अफवा, खोटी माहिती, खोट्या बातम्यांचा प्रचार करण्यात आला. या खोट्या माहितीच्या आधारावर देशामध्ये जनक्षोभ आहे आणि तो जनक्षोभ महाराष्ट्र विकास आघाडी सरकारविरोधात आहे अशा प्रकारचे वातावरण तयार करुन मुंबई पोलीस व महाराष्ट्राची बदनामी करण्यात आली. त्याचबरोबर बिहारच्या निवडणुकीत सुशांत सिंहच्या मृत्यूचा मुद्दा बनवण्यात आला. या खोट्या नॅरेटीव्हवर स्वार होऊन भाजपाने आपली राजकीय पोळी भाजून घेतली. हीच कार्यपद्धती पालघर साधू हत्याकांडानंतर वापरलेली पाहायला मिळाली. भाजपाच्या मॉडेलमधला हा मोहरा अडचणीत आल्याने, त्याची विश्वासार्हता पूर्णपणे रसातळाला गेल्याने भाजपा अध्यक्ष जे. पी. नड्डा व प्रकाश जावडेकर हे त्याच्या मदतीसाठी धडपड करत आहेत, असे सचिन सावंत म्हणाले. 

सुशांत प्रकरणात मोदी सरकारच्या दबावामुळेच तीन-तीन राष्ट्रीय तपास यंत्रणा या मुंबई पोलिसांचा तपास योग्य दिशेने चालू असल्याची जाणीव असतानाही गुंतवल्या गेल्या. एम्स पॅनेलचा रिपोर्ट आल्यानंतर आता सदर वाहिनीमार्फत चालवलेला अप्रप्रचार खोटा होतो हे उघडकीस आले आहे. परंतु भारतीय जनता पक्ष सदर वाहिनीची गेलेली पत थोड्याफार प्रमाणात सांभाळण्याकरता तसेच बिहारच्या निवडणुकीत काही काळ मुखभंग होण्याचे टाळण्यासाठी एम्स पॅनलचा रिपोर्ट नाकारण्याकरता सीबीआयवर दबाव आणण्याची शक्यता नाकारता येत नाही, असे सचिन सावंत म्हणाले.

Web Title: CBI may be pressured to reject AIIMS report - sachin sawant

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.