महाराष्ट्रातील भाजपा नेते अडचणीत; झारखंड सरकार पाडण्याचं षडयंत्र उघड झाल्यानं खळबळ

By ऑनलाइन लोकमत | Published: July 27, 2021 07:45 AM2021-07-27T07:45:36+5:302021-07-27T07:48:02+5:30

झारखंड षड् यंत्राची महाराष्ट्रात चाैकशी?; आराेपींना भेटले राज्यातील भाजप नेते

BJP leaders in Maharashtra in trouble over conspiracy to overthrow Jharkhand government exposed | महाराष्ट्रातील भाजपा नेते अडचणीत; झारखंड सरकार पाडण्याचं षडयंत्र उघड झाल्यानं खळबळ

महाराष्ट्रातील भाजपा नेते अडचणीत; झारखंड सरकार पाडण्याचं षडयंत्र उघड झाल्यानं खळबळ

googlenewsNext
ठळक मुद्देझारखंडमध्ये आमदारांचा घाेडेबाजार करून सरकार पाडण्याचा कट रचण्यात आला हाेता. पाेलिसांनी एका हाॅटेलमधून अभिषेक दुबे, अमित सिंह आणि निवारण महताे यांना अटक केलीपोलिसांनी छापा टाकण्याच्या १५ मिनीटांपूर्वीच हे सर्व नेते निघून गेले हाेते. अन्यथा त्यांनाही अटक झाली असती.

एस. पी. सिन्हा

रांची : झारखंडमध्ये हेमंत साेरेन यांचे सरकार पाडण्याच्या षड्यंत्राचा पाेलिसांनी भांडाफाेड केल्यानंतर खळबळ उडाली आहे. याप्रकरणी तीन जणांना अटक करण्यात आली. अटक करण्यात आलेल्या आराेपींचे महाराष्ट्र कनेक्शन समाेर आले आहे. मात्र, पाेलिसांनी केलेल्या या कारवाईवरच आता संशय व्यक्त करण्यात येत आहे. महाराष्ट्रातील भाजप पदाधिकाऱ्यांच्या भेटींमागे हवाला कनेक्शनचा शक्यता असून ते लपविण्यासाठी सरकार पाडण्याचा कट असल्याचे प्रकरण पाेलीसांनी उभे केल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे.  याप्रकरणी महाराष्ट्रातील नेत्यांची चाैकशी हाेण्याची शक्यता आहे.

झारखंडमध्ये आमदारांचा घाेडेबाजार करून सरकार पाडण्याचा कट रचण्यात आला हाेता. याबाबत आमदार अनुप सिंह यांनी केलेल्या तक्रारीवरून पाेलिसांनी छापे मारले हाेते. पाेलिसांनी एका हाॅटेलमधून अभिषेक दुबे, अमित सिंह आणि निवारण महताे यांना अटक केली हाेती. हे तिघे २१ जुलैला जयकुमार बेलखोडे, माेहित कंबाेज, अनिल कुमार, जयकुमार शंकरराव आणि आशुताेष ठक्कर यांना हाॅटेल ली-लॅकमध्ये भेटल्याचा दावा पाेलिसांनी केला आहे. पोलिसांनी छापा टाकण्याच्या १५ मिनीटांपूर्वीच हे सर्व नेते निघून गेले हाेते. अन्यथा त्यांनाही अटक झाली असती. बेलखोडे हा भाजपचे माजी आमदार व मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा भाचा आहे, तर माेहित कंबाेज हे मुंबईतील माेठे व्यावसायिक व मुंबई प्रदेश भाजपचे माजी उपाध्यक्ष आहेत, तर दुबे हा फळ विक्रेता असून, सिंह हा ठेकेदार आहे.

झारखंडमध्ये भाजपचे २५ आमदार आहेत. बहुमतासाठी ४२ आमदारांचे समर्थन आवश्यक आहे. त्यामुळे झारखंडमध्ये सरकार पाडणे भाजपसाठी साेपे नाही. त्यातच संशयित आराेपी असलेले किरकाेळ व्यावसायिक आणि महाराष्ट्रातील भाजप नेत्यांच्या मदतीने सरकार पाडण्याचे कारस्थान रचण्याची काय गरज पडली? झारखंडमध्ये नेत्यांची कमतरता आहे का? असे प्रश्न उपस्थित करण्यात येत आहेत. रांची पाेलिसांनी याप्रकरणी एसआयटी स्थापन केली आहे. चार पथके हाॅटेलपासून विमानतळापर्यंत विविध ठिकाणी तपासामध्ये गुंतले आहेत. 

एसआयटी नेमून चौकशी करा
माजी मुख्यमंत्री बाबुलाल मरांडी यांनी साेरेन सरकारवर महाराष्ट्राप्रमाणेच पाेलिसांचा गैरवापर करण्यात येत असल्याचा आराेप केला आहे. या एकूण प्रकरणाची उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली एसआयटी स्थापन करून चाैकशी करण्याची मागणी मरांडी यांनी केली आहे.

महाराष्ट्रातील नेत्याचे हवाला कनेक्शन?
महाराष्ट्रातून रांचीला आलेल्या लाेकांचे हवाला कनेक्शनदेखील असण्याचा दाट संशय सूत्रांनी व्यक्त केला आहे. महाराष्ट्र, झारखंड, बिहार आणि छत्तीसगढचा परिसर हवाला काॅरीडाेर म्हणून ओळखला जाताे. माेठ्या आर्थिक देवाण-घेवाणीसंदर्भात महाराष्ट्रातील पदाधिकारी आराेपींना भेटले असावे. मात्र, पाेलिसांनी हवालाऐवजी सरकार पाडण्याच्या कटाचे प्रकरण उभे केले. हवाला ॲंगलमध्ये राज्यातील बडे नेते अडकले असते आणि परिणामी सरकारची बदनामी झाली असती, असे सूत्रांचे म्हणणे आहे. यावरुन अनेक आमदारांनीही वक्तव्ये केली आहेत.

Web Title: BJP leaders in Maharashtra in trouble over conspiracy to overthrow Jharkhand government exposed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.