‘आरटीई’साठी पहिल्या फेरीचा आज शेवटचा दिवस; बुधवारपर्यंत २९३१ प्रवेश निश्चित
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 30, 2026 15:15 IST2026-04-30T15:13:45+5:302026-04-30T15:15:55+5:30
आरटीई सोडत जाहीर झाल्यानंतर पहिल्या फेरीसाठी आकुर्डी केंद्रात ११५ शाळांसाठी २६२९ अर्ज आले होते.

‘आरटीई’साठी पहिल्या फेरीचा आज शेवटचा दिवस; बुधवारपर्यंत २९३१ प्रवेश निश्चित
पिंपरी : शिक्षण हक्क कायद्यानुसार (आरटीई) २५ टक्के राखीव जागांसाठी शहरात सुरू असलेल्या पहिल्या फेरीच्या प्रवेशप्रक्रियेची मुदत गुरुवारी (दि. ३० एप्रिल) संपणार असून पालकांसाठी आता केवळ एकच दिवस शिल्लक आहे. तर बुधवारपर्यंत (दि. २९ एप्रिल) आकुर्डी व पिंपरी उन्नत साधन सुविधा केंद्रांमधील एकूण १७९ शाळांमध्ये २९३१ बालकांचे प्रवेश निश्चित झाले आहेत.
आरटीई सोडत जाहीर झाल्यानंतर पहिल्या फेरीसाठी आकुर्डी केंद्रात ११५ शाळांसाठी २६२९ अर्ज आले होते. त्यापैकी कागदपत्रांची पडताळणी झालेल्या २०१६ विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात आला. तर चुकीचे व अपूर्ण कागदपत्र सादर केलेले ३४ अर्ज नामंजूर झाले आहेत. अद्याप ५७९ जागांवर प्रवेश होणे बाकी आहे. तसेच पिंपरी केंद्रात ६४ शाळांसाठी १३०२ अर्ज प्राप्त झाले असून ९१५ विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित झाले आहेत, तर १९ अर्ज नाकारण्यात आले आहेत. येथे ३६८ जागा अद्याप रिक्त आहेत.
या दोन्ही केंद्रांतील एकूण चित्र पाहता १७९ शाळांसाठी सोडतीद्वारे ३९३१ अर्ज आले. त्यापैकी २९३१ विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित झाले असून, ५३ अर्ज नामंजूर झाले आहेत. तरीही ९४७ जागा अद्याप भरायच्या बाकी आहेत. पहिल्या फेरीची मुदत संपण्यासाठी अवघा एक दिवस शिल्लक असल्याने पालकांनी तत्काळ प्रक्रिया पूर्ण करण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
दरम्यान, आरटीईसाठी एकूण तीन फेऱ्या होतात. गुरुवारी पहिल्या फेरीची प्रवेशप्रक्रिया पूर्ण होणार आहे. त्यानंतर उर्वरित दोन फेऱ्या होतील. गरज भासल्यास आणखी फेरी देखील होऊ शकते, असे प्रशासनाकडून सांगण्यात आले.
आरटीई प्रवेशप्रक्रियेतील पहिल्या फेरीचा गुरुवारी शेवटचा दिवस आहे. अपूर्ण किंवा चुकीची कागदपत्रे सादर केलेल्या तसेच अद्याप पडताळणी न झालेल्या पालकांनी सकाळी १० ते सायंकाळी ६ या वेळेत संबंधित केंद्रात आवश्यक कागदपत्रांसह हजर राहावे. - संगीता बांगर, प्रशासन अधिकारी, शिक्षण विभाग, महापालिका.