महाराष्ट्रात राहणाऱ्या प्रत्येकाने मराठी शिकलीच पाहिजे; पण भाषेच्या नावावर हिंसा नको: फडणवीस
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 1, 2026 08:10 IST2026-05-01T08:09:14+5:302026-05-01T08:10:24+5:30
Devendra Fadnavis On Marathi Language: राज्यात गेल्या काही दिवसांपासून मराठी भाषेचा मुद्दा चांगलाच चर्चेत आहे. रिक्षा आणि टॅक्सी चालकांना व्यवसाय करण्यासाठी मराठी भाषा येणे बंधनकारक करण्याच्या सरकारच्या निर्णयानंतर, आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावर आपली भूमिका स्पष्ट केली आहे.

महाराष्ट्रात राहणाऱ्या प्रत्येकाने मराठी शिकलीच पाहिजे; पण भाषेच्या नावावर हिंसा नको: फडणवीस
राज्यात गेल्या काही दिवसांपासून मराठी भाषेचा मुद्दा चांगलाच चर्चेत आहे. रिक्षा आणि टॅक्सी चालकांना व्यवसाय करण्यासाठी मराठी भाषा येणे बंधनकारक करण्याच्या सरकारच्या निर्णयानंतर, आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावर आपली भूमिका स्पष्ट केली आहे. "महाराष्ट्रात राहणाऱ्या प्रत्येकाने मराठी भाषा शिकलीच पाहिजे, पण भाषेच्या नावावर केली जाणारी हिंसा आम्हाला मान्य नाही," असे वक्तव्य देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे.
फडणवीस काय म्हणाले?
महाराष्ट्र दिनानिमित्त पत्रकारांशी संवाद साधताना फडणवीसांनी भाषा आणि प्रादेशिक अस्मितेवर भाष्य केले. मुख्यमंत्री म्हणाले की, "प्रत्येकाला आपल्या स्वभाषेचा सार्थ अभिमान असलाच पाहिजे आणि महाराष्ट्रात राहणाऱ्यांना मराठीचा अभिमान असणे स्वाभाविक आहे. जे लोक महाराष्ट्रात वास्तव्यास आहेत, त्यांनी मराठी शिकलीच पाहिजे. जे शिकण्याचा प्रयत्न करत आहेत त्यांचे स्वागत आहे, पण ज्यांना अद्याप ही भाषा येत नाही, त्यांना आम्ही ती शिकवू."
भाषेच्या आधारावर हिंसा नको
"भाषेच्या आधारावर हिंसा करणे किंवा एखाद्याला भाषा येत नाही म्हणून त्याला मारहाण करणे, हे आमच्या संस्कृतीत बसत नाही आणि ते आम्हाला अजिबात मान्य नाही. आपली मराठी भाषा अत्यंत सुंदर आणि सोपी आहे, जी कोणालाही सहज शिकवता येते", असे फडणवीस म्हणाले आहेत.