"माझ्या डोळ्यांदेखतच माझी पत्नी आणि नातू..." जबलपूर दुर्घटनेतून वाचलेल्या पर्यटकाचा टाहो!
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 1, 2026 10:29 IST2026-05-01T10:28:10+5:302026-05-01T10:29:17+5:30
Madhya Pradesh Jabalpur Boat Accident: मध्य प्रदेशातील जबलपूर येथील प्रसिद्ध पर्यटन स्थळ असलेल्या बर्गी धरणात एक मोठी हृदयद्रावक दुर्घटना घडली.

"माझ्या डोळ्यांदेखतच माझी पत्नी आणि नातू..." जबलपूर दुर्घटनेतून वाचलेल्या पर्यटकाचा टाहो!
मध्य प्रदेशातील जबलपूर येथील प्रसिद्ध पर्यटन स्थळ असलेल्या बर्गी धरणात एक मोठी हृदयद्रावक दुर्घटना घडली. सोसाट्याचा वारा आणि उसळणाऱ्या लाटांमुळे पर्यटकांनी खचाखच भरलेली एक क्रूझ बोट अचानक पाण्यात बुडाली. या दुर्घटनेत आतापर्यंत ९ जणांचा मृत्यू झाला असून, प्रशासनाकडून युद्धपातळीवर शोध आणि बचाव मोहीम राबवली जात आहे. या भीषण दुर्घटनेतून सैय्यद रियाज हुसैन नावाचे पर्यटक एका चमत्कारासारखे वाचले आहेत. त्यांनी सांगितलेला अनुभव ऐकून कोणाच्याही काळजाचा ठोका चुकेल.
हुसैन यांच्या सांगण्यानुसार, जेव्हा बोट उलटली तेव्हा ते सुद्धा पाण्यात बुडू लागले होते. आपला जीव जाणार याची त्यांना खात्री पटली होती. परंतु, काही वेळानंतर स्वत: जिवंत पाहून ते शॉक झाले. हुसैन म्हणाले की, "मी कसा वाचलो हे मला आता आठवतही नाही. बुडत असताना धरणातील एका विशिष्ट ठिकाणी माझी मान अशा प्रकारे अडकली की, माझे संपूर्ण शरीर पाण्याखाली होते, पण माझे डोके पाण्यावर राहिले. यामुळे मला श्वास घेणे शक्य झाले. मी तिथे जवळपास दोन तास मृत्युच्या विळख्यात अडकून पडलो होतो. माझ्या आजूबाजूला इतर मृतांचे मृतदेह तरंगताना दिसत होते. सुदैवाने, श्वास थांबण्यापूर्वीच बचाव पथकाची माझ्यावर नजर मा पडली आणि मी वाचलो.
स्वतःचा जीव वाचला असला तरी हुसैन यांचे दु:ख अथांग आहे. त्यांचे कुटुंबीय अद्यापही बेपत्ता आहेत. हुसैन यांनी दिलेल्या माहितीनुसार, क्रूझ पाण्यात बुडाली तेव्हा, त्यांची पत्नी, नातू आणि मुलाची सासू पाण्यात वाहून गेली आहे. हे सर्व जण अद्यापही बेपत्ता आहेत. दुर्दैवाने या दुर्घटनेत आतापर्यंत ९ जणांचा मृत्यू झाला असून १५ हून अधिक जणांना वाचवण्यात यश आले आहे. त्यांच्यावर जवळच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. घटनास्थळी बचावकार्य सुरू असून मृतांच्या आकड्यात वाढ होण्याची भीती स्थानिक प्रशासनाकडून व्यक्त केली जात आहे.