Pimpari-chinchwad : अजब शिक्षण विभागाचे काम, दहावी बारावीतील १३२२ गुणवंत विद्यार्थी शिष्यवृत्तीपासून वंचित
By विश्वास मोरे | Updated: April 28, 2026 12:47 IST2026-04-28T12:43:37+5:302026-04-28T12:47:41+5:30
लोकमत विशेष : श्रीमंत महापालिकेत गुणवंत विद्यार्थी बक्षीस वाटपाकडे दुर्लक्ष; वर्ष संपले तरी अर्ज धूळ खात

Pimpari-chinchwad : अजब शिक्षण विभागाचे काम, दहावी बारावीतील १३२२ गुणवंत विद्यार्थी शिष्यवृत्तीपासून वंचित
पिंपरी : महापालिका समाज विकास विभाग इतर कल्याणकारी योजनेंतर्गत दहावी-बारावीतील गुणवंतांना शिष्यवृत्ती दिली जाते. मात्र, आर्थिक वर्ष संपले तरी गेल्या वर्षीच्या ४ हजार २३ अर्जांपॆकी केवळ पन्नास टक्के २ हजार ७०१ जणांना शिष्यवृत्तीचा लाभ मिळाला आहे. चार कोटींची बक्षिसांचे वाटप झाले आहे. मात्र, ३२ टक्के अर्ज मंजुरी होऊन लाभ मिळण्याच्या प्रतीक्षेत पडून आहेत. मुलांना शिष्यवृत्ती मिळणार कधी ? असा प्रश्न विचारला जात आहे. मात्र, मनुष्यबळ नसल्याचे कारण समाज विकास विभागाकडून दिले जात आहे. याबाबत गुणवंत विद्यार्थी आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.
श्रीमंत महापालिका म्हणून पिंपरी- चिंचवड महापालिकेचा लौकिक आहे. मात्र, ऑनलाईन होऊनही नागरिकांना त्रास होत आहे. समाज विकास विभाग इतर कल्याणकारी योजनेंतर्गत अनेक वर्षांपासून अंतर्गत दहावी आणि बारावीमध्ये उत्तीर्ण झालेल्या गुणवंत विद्यार्थ्यांसाठी बक्षीस योजना राबविली जात आहे. मात्र, या योजनेच्या ऑनलाईन अंमलबजावणीबाबत पालकांच्या तक्रारी आहेत. मात्र, त्याकडे प्रशासनाच्या वतीने दुर्लक्ष केले जात आहे.
-----------
ऑनलाईन पद्धतीने भुर्दंड, नागरिकांमध्ये नाराजी
महापालिकेची अर्ज भरण्यासाठीचे संकेतस्थळावर नागरिकांचा गोंधळ उडतो. संकेतस्थळ व्यवस्थित नसल्याची तक्रार आहे. अनेक विद्यार्थ्यांना अर्ज भरता येत नाही, अशा नागरिकांनी तक्रारी केल्या आहेत. तसेच शहरातील झोपडपट्टीमध्ये ऑनलाईन व स्कॅनिंग सुविधा नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांना ऑनलाईन भरण्यासाठी सायबर कॅफेमध्ये जावे लागते. तेथे दीडशे ते तीनशे रुपये आकारले जात असल्याने या सगळ्यात विद्यार्थी व पालकांना भुर्दंड सहन करावा लागत आहे. त्यामुळे ऑनलाईन पद्धत बंद करून प्रत्यक्ष यपूर्वीसारखे अर्ज स्वीकारले जावेत. फॉर्म भरण्यासाठी खूप वेळ लागतो. या कारणामुळे सर्व विद्यार्थी आणि पालकांमध्ये नाराजी आहे.
-----------------
नागरवस्ती योजनेंतर्गत यापूर्वी सर्व प्रत्यक्ष अर्ज भरून सोबत लागणारे सर्व कागदपत्र महापालिकेच्या नागरी सुविधा केंद्र मार्फत स्वीकारत होतो. नागरवस्ती विभागाने सर्व प्रकारचे अर्ज ऑनलाईन पद्धतीने चालू केले आहे. त्यातून अनेक प्रकारचे तक्रारी येत आहेत. तरी यासंदर्भात तातडीने निर्णय घेण्याची गरज आहे, अशी नागरिकांची मागणी आहे. - मारुती भापकर (सामाजिक कार्यकर्ते )
-----------------
वर्ष उलटले तरी...
अर्ज सबमिट केल्यानंतर पालकांना संदेश येतो. त्यानंतर मंजुरीचाही संदेश येतो. मात्र, मंजुरीनंतर प्रत्यक्षात लाभ मिळण्यात अडचणी येत आहेत. गेल्या वर्षी दहावी-बारावीचा निकाल लागल्यानंतर अनेकांनी अर्ज सादर केले. मात्र, ३२ टक्के गुणवंतांचे अर्ज मंजूर झालेले आहेत.
...
इयत्ता, अर्ज भरले, मंजूर
१) दहावीमध्ये ९० टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळविणारे विद्यार्थी : १५१४, ७३९
२) दहावीमध्ये ८० ते ९० टक्के गुण संपादन करणाऱ्या विद्यार्थी : १८५७, १६१६
३) बारावीमध्ये ८० ते ९० टक्के गुण मिळविणारे विद्यार्थी : १४१, ७६
४) बारावीमध्ये ९० टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळविणारे विद्यार्थी ५११, २७०
----------------
एकूण : ४०२३, २७०१