वीज गायब, अधिकाऱ्यांचा फोन बंद; नागरिक-नगरसेवक वीज कार्यालयात आंदोलन करत तिथे जाऊन थेट झोपले
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 17, 2026 17:16 IST2026-04-17T17:16:32+5:302026-04-17T17:16:56+5:30
उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर नागरिकांना उकाड्याने त्रास होत असून महावितरणकडूनही प्रतिसाद मिळत नसल्याने नागरिकांनी हा आक्रमक पवित्र घेतला होता

वीज गायब, अधिकाऱ्यांचा फोन बंद; नागरिक-नगरसेवक वीज कार्यालयात आंदोलन करत तिथे जाऊन थेट झोपले
पिंपरी : निगडी-प्राधिकरणातील सेक्टर २२ मध्ये बुधवारी (दि. १५) मध्यरात्री वीजपुरवठा खंडित झाला. वारंवार वीज जात असल्याने संतप्त नागरिक व येथील लोकप्रतिनिधींनी महावितरण कार्यालयात आंदोलन करत तिथेच झोपण्याचा आक्रमक पवित्रा घेतला. यादरम्यान झालेल्या दगडफेकीत कार्यालयाची काच फुटली. काही काळ परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. पोलिसांनी मध्यस्थी केल्याने प्रकरण निवळले.
सेक्टर २४ येथील वीजवाहिनीमध्ये बिघाड झाल्याने सेक्टर २२ व आसपासच्या भागातील वीजपुरवठा खंडित झाला होता. उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर नागरिकांना उकाड्याने त्रास होत होता. महावितरणकडूनही प्रतिसाद मिळत नव्हता. दरम्यान, रात्री उशिरा नागरिकांसह भाजपच्या अनिल घोलप, उत्तम केंदळे या दोन नगरसेवकांनी वीज कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन केले. कार्यालयाच्या प्रवेशद्वारातच झोपत निषेध नोंदविला. काही जणांनी दगडफेक केल्याने कार्यालयाची काच फुटल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतल्यानंतर अधिकारी आणि लोकप्रतिनिधींची शुक्रवारी बैठक घेण्याचे ठरले. त्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले आणि परिस्थिती नियंत्रणात आली.
दोन टप्प्यांत वीजपुरवठा सुरळीत
महावितरणच्या माहितीनुसार, रात्री ९:३४ वाजता बिघाड झाला. पावणेअकरापर्यंत सुमारे ७० टक्के वीजपुरवठा पूर्ववत करण्यात आला. उर्वरित एक ते दीड हजार घरांचा वीजपुरवठा मध्यरात्री १:१७ वाजता सुरळीत करण्यात आला.
फोन न उचलल्याने संताप वाढला
वीज खंडित झाल्यानंतर महावितरणकडून संपर्क साधूनही प्रतिसाद मिळत नसल्याची तक्रार नागरिकांनी केली. उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर दोन-तीन तास वीज नसल्याने संताप अधिकच वाढल्याचे स्थानिकांनी सांगितले.
रात्री दोन तास वीज नव्हती. फोन करूनही योग्य प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे नागरिकांसह आम्ही ठिय्या आंदोलन केले.- अनिल घोलप, नगरसेवक
वीज गेल्याने आम्ही महावितरण कार्यालयात गेलो होतो. रात्री तिथेच झोपून आंदोलन केले. मात्र काच नेमकी कशी फुटली, याबाबत माहिती नाही.- उत्तम केंदळे, नगरसेवक
महावितरणच्या वीजवाहिन्यांमध्ये बिघाड झाल्यानंतर टप्प्याटप्प्याने वीजपुरवठा सुरळीत करण्यात आला. जमावातील एकाने दगड मारल्याने काच फुटली, मात्र मोठे नुकसान झाले नाही. तेथील वीजपुरवठा सुरळीत ठेवण्यावर भर आहे.- विकास पुरी, जनसंपर्क अधिकारी, महावितरण