5G Launched in India: एअरटेल की रिलायन्स? कोणाचे 5G नेटवर्क पहिले सुरु होणार; मित्तलांनी अंबानींना ऐकवलेच

By ऑनलाइन लोकमत | Published: October 1, 2022 01:56 PM2022-10-01T13:56:34+5:302022-10-01T14:00:43+5:30

5G Network Launched in India: एअरटेलच्या मित्तलांचा मुकेश अंबानींवर मोदींसमोरच निशाना.4G वरून ऐकवले.

दिल्लीतील इंडिया मोबाइल काँग्रेसमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशात ५जी सेवेचा शुभारंभ केला. यामुळे आज भारत हा जगातील 5G संपन्न देशांच्या यादीत ८३ व्या क्रमांकावर विराजमान झाला आहे. आता ही ५ जी सेवा आपल्यापर्यंत कधी पोहोचणार? याची प्रतिक्षा करोडो भारतीयांना लागली आहे. यावर रिलायन्सचे प्रमुख मुकेश अंबानी, एअरटेलचे प्रमुख सुनिल मित्तल आणि व्होडाफोन आयडियाचे कुमारमंगलम बिर्ला यांनी माहिती दिली आहे.

रिलायन्स जिओने देशभरात ५जी नेटवर्क सुरु करणार असल्याची आज घोषणा केली. अंबानी यांनी देशातील काही शहरांत याच महिन्यापासून टेस्टिंग सुरु होणार असल्याचे सांगितले, तर देशातील प्रत्येक नागरिकाकडे ५जी पोहोचविण्यासाठी म्हणजे, तालुका, गाव पातळीवर ५ जी नेटवर्क देण्यासाठी पुढच्या वर्षी म्हणजेच २०२३ चा डिसेंबर उजाडणार असल्याचे ते म्हणाले. तर महत्वाच्या शहरांमध्ये येत्या दिवाळीला रिलायन्स जिओची ५ जी सेवा सुरु होणार आहे. (Reliance Jio 5G)

एअरटलेचे सीईओ सुनिल मित्तल यांनी मुकेश अंबानींच्या पुढे एक पाऊल टाकले आहे. मुकेश अंबानी यांनी आम्हाला ४जी सेवा बळजबरीने आणण्यास भाग पाडले. परंतू, आम्ही आज देशातील ५जी नेटवर्क प्रत्यक्षात सुरु करणारे पहिली कंपनी बनलो आहोत. आजपासून देशातील ८ शहरांत एअरटेल ५जी सेवा सुरु होत आहे. भारतातील प्रत्येक गावात पोहोचण्यासाठी आम्हाला मार्च २०२४ उजाडणार आहे, असे मित्तल म्हणाले. एअरटेल 5G नेटवर्क Delhi, Varanasi, Mumbai आणि अन्य पाच शहरांमध्ये सुरु होणार असल्याचे ते म्हणाले.

व्होडाफोनने अद्याप ५जी बाबात काहीच घोषणा केलेली नाही. आज व्होडाफोन आयडियाकडून आदित्य बिर्ला समूहाचे अध्यक्ष, कुमार मंगलम बिर्ला उपस्थित होते. त्यांनी व्होडाफोन-आयडियाने बरीच तयारी केली आहे. नेटवर्क #5G रूपांतरणासाठी सुसंगत आहे. पंतप्रधानांनी म्हणण्याप्रमाणे, हे केवळ नवीन तंत्रज्ञान नाही तर एक क्रांती आहे. व्होडाफोन-आयडिया या क्रांतीचा भाग होण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करेल, एवढेच म्हटले आहे. यामुळे या कंपनीचे ५जी कधी येईल हे कंपनीचे प्रमुखच सांगू शकत नाहीएत.

'आज 130 कोटी भारतीयांना 5G च्या रूपाने एक अद्भुत भेट मिळत आहे. 5G नव्या युगाची दार ठोठावत आहे. ही अनेक संधींची सुरुवात आहे. यासाठी मी प्रत्येक भारतीयाचे खूप खूप अभिनंदन करतो, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले. आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते देशात 5G सेवांचा शुभारंभ करण्यात आला. याअगोदर देशाला बाहेरुन मोबाईल आयात करावे लागत होते, पण आता देश मोबाईल निर्यात करत आहे. जगात भारत मोबाईल निर्मिती करण्यात दुसऱ्या क्रमांकावर आहे. आत्मनिर्भर भारताने हे करुन दाखवले आहे, असंही मोदी म्हणाले.