By ऑनलाइन लोकमत | Updated: January 11, 2022 16:48 IST
1 / 10आगामी ५ राज्याच्या विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने सगळेच राजकीय पक्ष कामाला लागले आहेत. उत्तर प्रदेशातील सत्ता टिकवण्यासाठी भाजपाने जय्यत तयारी केली आहे. परंतु विधानसभा निवडणुका घोषित होऊन काहीच दिवस उलटले नाहीत तोवर राज्यात भाजपाला धक्का बसला आहे.2 / 10उत्तर प्रदेशात भाजपाला एकापाठोपाठ एक असे ३ झटके बसले आहेत. योगी सरकारच्या कॅबिनेटमध्ये मंत्री असलेले स्वामी प्रसाद मौर्य यांच्यानंतर मंगळवारी ३ भाजपा आमदारांनी भाजपाची साथ सोडली आहे. यात बांदा येथील तिंदवारी मतदारसंघाचे आमदार ब्रजेश प्रजापति, आमदार रोशनलाल वर्मा, भगवती सागर यांनी पक्षाला रामराम ठोकला आहे.3 / 10मिळालेल्या माहितीनुसार, या भाजपा आमदारांनी स्वामी प्रसाद मौर्य यांच्या नेतृत्वाखाली भाजपाची साथ सोडली आहे. स्वामी प्रसाद मौर्य यांनी भारतीय जनता पार्टीचा राजीनामा देत अखिलेश यादव यांच्या नेतृत्वात समाजवादी पक्षाचा झेंडा हाती घेतला आहे. आता राजीनामा दिलेले तिन्ही आमदार सपात जाण्याची शक्यता आहे.4 / 10आमदार रोशनलाल यांनी पक्ष सोडताना सांगितले की, योगी सरकारच्या काळात ५ वर्ष अनेक तक्रारी केल्या परंतु त्यावर कुठलीच कारवाई झाली नाही. ज्यामुळे भाजपा सोडण्याचा निर्णय घ्यावा लागला असं ते म्हणाले. तर स्वामी प्रसाद मौर्य यांनी राजीनामा का दिला याची कल्पना नसल्याचं उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य यांनी म्हटलं आहे.5 / 10उत्तर प्रदेशाच्या निवडणुकीत संघटन मंत्री सुनील बंसल आणि भाजपा प्रदेशाध्यक्ष स्वतंत्र देव सिंह यांना पक्षात नाराज असलेल्या नेत्यांची समजूत काढण्याची जबाबदारी दिली आहे. केंद्रीय नेतृत्वाच्या निर्देशानुसार हे दोन्ही नेते पक्षात नाराज असलेल्यांची समजूत काढणार आहेत.6 / 10तत्पूर्वी भाजपाचे बदायू जिल्ह्यातील बिल्सी मतदारसंघाचे आमदार आरके शर्मा यांनी भाजपाचा राजीनामा देत सोमवारी समाजवादी पार्टीत प्रवेश केला. तर आरके शर्मा यांचा जनतेशी संवाद नव्हता. मोदींच्या नावावर आरके शर्मा विजयी झाले होते असा टोला भाजपा नेत्यांनी लगावला. 7 / 10मात्र स्वामी प्रसाद मौर्य यांच्या भाजपा एक्झिटनंतर पक्षाला मोठा धक्का बसल्याचं मानलं जात आहे. स्वामी प्रसाद मौर्य हे योगी सरकारच्या कॅबिनेटमध्ये मंत्री होते. ओबीसी नेते म्हणून त्यांना ओळखलं जाते. भाजपा पक्षातून बाहेर पडल्यानंतर अखिलेश यादव यांच्यासोबत त्यांचा फोटो व्हायरल झाला. तेव्हाच ते समाजवादीत प्रवेश करणार असल्याचं स्पष्ट झालं.8 / 10भाजपातून एका पाठोपाठ एक पक्षातून सोडून जात असताना समाजवादी पक्षाचे प्रवक्ते आईपी सिंह यांनी भाजपाला टोला लगावला आहे. ओमप्रकाश राजभर, जयंत चौधरी, कृष्णा पटेल, संजय चौहान आणि आता स्वामी प्रसाद मौर्य सपात आले आहेत. १० मार्चनंतर भाजपाच्या ऑफिसला टाळं लावावं लागेल. सपाची लाट उत्तर प्रदेशात येतेय असं त्यांनी म्हटलं आहे. 9 / 10स्वामी प्रसाद मौर्य यांच्यासोबत भाजपाचे अनेक आमदार पक्षातून बाहेर पडणार असल्याची चर्चा सुरु होती. त्यात दारासिंह चौहान, धर्म सिंह सैनी यांच्याही नावाचा समावेश होता. परंतु आतापर्यंत ३ आमदारांनी राजीनामा दिल्याने भाजपाची डोकेदुखी वाढली आहे.10 / 10स्वामी प्रसाद मौर्य २०१७ च्या निवडणुकीत बसपासोडून भाजपात आले होते. परंतु बसपा प्रमाणे भाजपाच्या सत्ता काळात त्यांना महत्त्वाचं स्थान दिले नाही. त्यात स्वामी प्रसाद मौर्य सुरुवातीपासून दलित, ओबीसी यांचं राजकारण करतात ते भाजपाच्या राजकारणात फारसं जुळणारं नव्हतं.