PM Security Breach : पंतप्रधान सुरक्षा प्रकरणी पहिला एफआयआर दाखल; केंद्रात हालचाली दिसताच पंजाब झाला सावध

By ऑनलाइन लोकमत | Published: January 7, 2022 11:42 AM2022-01-07T11:42:39+5:302022-01-07T11:52:16+5:30

PM Narendra Modi Security Breach : याप्रकरणी एफआयआर दाखल करण्यात आल्याची माहिती पंजाबच्या मुख्य सचिवांनी दिली आहे.

पंजाबच्या फिरोजपुरमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या (PM Narendra Modi) सुरक्षा व्यवस्थेत झालेल्या ढिसाळपणाबद्दल केंद्र सरकार आता 'अ‍ॅक्शन मोड'मध्ये आलं आहे.

पंतप्रधानांच्या सुरक्षेत कोणतीही हयगय अजिबात सहन केली जाणार नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सुरक्षेत झालेल्या चुकीबाबत सविस्तर अहवाल केंद्रीय गृहमंत्रालयानं (Home Ministry) पंजाब सरकारकडे (Punjab Government) मागितला होता.

याप्रकरणी आता पंजाबच्या मुख्य सचिवांनी केंद्रीय गृह सचिवांना लिखित रिपोर्ट सोपवला आहे. यामध्ये याप्रकणी स्थापन केलेली समिती तीन दिवसांत अहवाल सोपवणार असल्याचं म्हटलंय. याशिवाय केंद्रीय गृह मंत्रायलानंदेखी पंतप्रधानांच्या सुरक्षेत झालेल्या त्रुटीप्रकरणी एक समिती स्थापन केली आहे.

मुख्य सचिवांनी गृह सचिवांना सांगितलं की या प्रकरणी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला असून राज्य सरकारनं या प्रकरणाच्या चौकशीसाठी एक समिती स्थापन केली आहे. ही समिती तीन दिवसांत अहवाल सादर करणार आहे.

"पंजाबचे मुख्यमंत्री चरणजीत सिंह चन्नी यांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यासाठी एक समिती स्थापन केली आहे. निवृत्त न्यायमूर्ती मेहताब सिंग गिल आणि प्रधान सचिव, गृह आणि न्याय, अनुराग वर्मा यांना तीन दिवसांत अहवाल सादर करण्यास सांगितलं आहे. अहवाल आल्यानंतरच दोषींवर कारवाई केली जाईल," असं चन्नी म्हणाले होते.

गृहमंत्रालयाकडून मिळालेल्या माहितीनुसार पंजाबच्या फिरोजपूर दौऱ्यादरम्यान, ज्याप्रकारे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सुरक्षाव्यवस्थेत चूक झाली त्यामुळे केंद्रीय गृहमंत्रालयाकडून खूप गंभीरपणे पावले उचलली जात आहेत. या प्रकरणाचे गांभीर्य पाहून गृहमंत्रालयाने या पूर्ण घटनेच्या तपासासाठी एका समितीची स्थापना केली आहे.

या चौकशी समितीचे नेतृत्व सुधीरकुमार सक्सेना, सचिव (संरक्षण), कॅबिनेट सचिवालय हे करतील. त्यांच्यासोबत या समितीमध्ये बलबीर सिंह, संयुक्त संचालक आयबी आणि एस सुरेश (आयजी) एसपीजी हेही सहभागी असतील. तसंच समितीला लवकरात लवकर अहवाल सपूर्द करण्याची सूचना देण्यात आली आहे.

बुधवारी सकाळी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे भटिंडा येथे पोहोचले होते. तेथून ते हेलिकॉप्टरच्या हुसेनीवाला येथे राष्ट्रीय शहीद स्मारकामध्ये जाणार होते. मात्र पाऊस आणि खराब दृष्यमानतेमुळे पंतप्रधानांनी सुमारे २० मिनिटे हवामान स्वच्छ होण्याची वाट पाहिली. मात्र तरीही हवामान सुधारले नाही. त्यामुळे पंतप्रधानांनी रस्तेमार्गाने राष्ट्रीय शहीद स्मारकाचा दौरा करण्याचा निर्णय घेतला. त्यामध्ये दोन तास लागणार होते.

गृहमंत्रालय सांगितले की, डीजीपी पंजाब पोलिसांकडून अत्यावश्यक सुरक्षा व्यवस्थेचा दुजोरा देण्यात आला होता. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी रस्ते मार्गानं पुढे निघाले.

मात्र मोदींचा ताफा एका फ्लायओव्हरवर आला असताना आंदोलकांनी रस्ता ब्लॉक केलेला होता. त्यामुळे मोदींचा ताफा फ्लायओव्हरवर १५-२० मिनिटे अडकून पडला होता. ही मोदींच्या सुरक्षेमधील मोठी चूक मानली जात आहे.

गृहमंत्रालयाने सांगितले की, पंतप्रधानांच्या कार्यक्रमाची आणि दौऱ्याची माहिती पंजाब सरकारला आधीच देण्यात आली होती. प्रक्रियेनुसार त्यांना सुरक्षेसोबत इतर व्यवस्था तयार ठेवण्यास सांगितलं होतं.

त्यामध्ये सांगण्यात आलंय की, आकस्मिक योजना तयार ठेवण्यासाठी पंजाब सरकारला रस्ते मार्गावरील कुठल्याही वाहतुकीला सुरक्षित ठेवण्यासाठी आणि बंद करण्यासाठी अतिरिक्त सुरक्षा व्यवस्था करण्यात येणे आवश्यक होते. मात्र असं झालं नाही. कारण कुठल्याही प्रकारच्या सुरक्षा व्यवस्थेची तैनाती करण्यात आली नव्हती.