मी ३० सेकंदात झोपतो, 'अशी' आहे नरेंद्र मोदींची जीवनशैली, विद्यार्थ्यांना सल्ला

By ऑनलाइन लोकमत | Published: January 29, 2024 07:54 PM2024-01-29T19:54:16+5:302024-01-29T19:58:01+5:30

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २९ जानेवारी रोजी 'परीक्षा पे चर्चा'च्या माध्यमातून २ कोटींहून अधिक विद्यार्थ्यांशी संवाद साधला. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुलांना परीक्षेच्या तणावातून मुक्त होण्याचा सल्ला दिला.

त्याचसोबत मला ३० सेकंदात झोप लागते सांगत स्क्रिनटाईमपासून दूर राहण्याचं आवाहन मुलांना केले. स्क्रिन टाईममुळे झोपेमध्ये व्यत्यय येतो. संतुलित जीवनशैली राखण्यासाठी प्रत्येक गोष्टीचा अतिरेक टाळला पाहिजे.

निरोगी मनासाठी निरोगी शरीर महत्वाचे आहे आणि त्यासाठी काही दिनचर्या कराव्यात. सूर्यप्रकाशात वेळ घालवणे आणि नियमित आणि पूर्ण झोप घेणे आवश्यक आहे. स्क्रिन टाईम सारख्या सवयीमुळे आवश्यक झोपेची वेळ वाया जाते, जी आधुनिक आरोग्य विज्ञानाने खूप महत्वाची मानली आहे.

'स्क्रीन टाइम' हा शब्द सामान्यतः एखादी व्यक्ती मोबाइल आणि टेलिव्हिजन स्क्रीन वापरून घालवलेल्या वेळेला म्हटलं जाते. PM नरेंद्र मोदी म्हणतात, मी बेडवर गेल्यावर ३० सेकंदात गाढ झोपेत जाण्याचा नित्यक्रम पाळला आहे.

जेव्हा तुम्ही जागे व्हाल तेव्हा पूर्णपणे जागृत राहणे आणि जेव्हा तुम्ही झोपायला जाता तेव्हा गाढ झोप असणे हे एक संतुलन आहे जे साध्य करता यायला हवे. विद्यार्थ्यांना ताण येणार नाही यासाठी शिक्षक आणि पालकांची भूमिका देखील महत्त्वाची आहे.

परीक्षेची तयारी आणि निरोगी जीवनशैली यांच्यात समतोल राखण्याचा मुद्दा उपस्थित करत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी संतुलित आहाराच्या गरजेवर भर दिला आणि तंदुरुस्तीसाठी नियमित व्यायाम आणि शारीरिक हालचालींच्या महत्त्वावर भर दिला

‘परीक्षा पे चर्चा’ या नवी दिल्ली येथील भारत मंडपम येथे आयोजित कार्यक्रमाच्या माध्यमातून मोदी यांनी देशभरातील विद्यार्थ्यांशी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे संवाद साधला. मुंबईत राजभवन येथे आयोजित या कार्यक्रमात राज्यपाल रमेश बैस यांच्यासह शालेय विद्यार्थी सहभागी झाले. विद्यार्थ्यांमध्ये सकारात्मक स्पर्धा आवश्यक असल्याचे सांगून विद्यार्थ्यांनी प्रतिभावान मित्र वाढवावेत आणि त्यांच्यापासून प्रेरणा घ्यावी, असा सल्ला मोदी यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना दिला.

स्पर्धा नसेल तर जीवन चेतनाहीन बनेल. यासाठी विद्यार्थ्यांनी एकमेकांशी इर्षा न ठेवता स्वतःशी स्पर्धा करून प्रगती होण्यासाठी सकारात्मक प्रयत्न करावेत, आत्मविश्वास बाळगावा, शिक्षणाबरोबरच आरोग्यदायी जीवन जगण्यासाठी व्यायाम आणि खेळ यांचाही मेळ साधावा. स्वस्थ मनासाठी स्वस्थ शरीराची आवश्यकता असून त्यासाठी सूर्यप्रकाश, पूर्ण झोप आणि संतुलित आहार या बाबी गरजेच्या असल्याकडे त्यांनी लक्ष वेधले.

तंत्रज्ञानापासून आपल्याला दूर जाता येणार नाही, तथापि, त्याचा अती वापर टाळून योग्य वापर करण्याचा सल्लाही मोदींनी दिला. तंत्रज्ञानाच्या वापरामुळे लिहिण्याचा सराव कमी होत आहे, याचा दुष्परिणाम परीक्षेमध्ये दिसून येतो. यासाठी विद्यार्थ्यांनी लिहिण्याचा सराव नियमित ठेवून ते तपासावे आणि त्यात सुधारणा कराव्यात, यामुळे परीक्षेत येणारा ताण निश्चित कमी होईल, असा विश्वास मोदींनी व्यक्त केला.

शिक्षक, पालकांनी विद्यार्थ्यांसोबत सकारात्मक राहावे. शिक्षकांनी विद्यार्थ्यांशी बंध वाढवावेत. विद्यार्थ्यांची इतरांशी तुलना न करता त्यांच्यातील गुणांचे कौतुक करावे, यामुळे त्यांचा आत्मविश्वास वाढेल. विद्यार्थ्यांची तुकडी बदलते तथापि शिक्षक तेच असतात त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केल्यास त्यांच्यावरील ताण निश्चित कमी होऊ शकेल असंही मोदी म्हणाले.