Corona Vaccine : कोरोनाविरोधातील लढ्यात किती प्रभावी ठरतेय 'लस' ?; ICMR ने राज्यांकडून मागितली 'ही' महत्त्वाची माहिती

By ऑनलाइन लोकमत | Published: May 23, 2021 06:22 PM2021-05-23T18:22:32+5:302021-05-23T18:44:39+5:30

CoronaVirus Marathi News and Live Updates : गेल्या 24 तासांत देशात कोरोनाचे 2,40,842 नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर 3,741 जणांचा मृत्यू झाला आहे.

देशात कोरोनाचा कहर पाहायला मिळत आहे. कोरोनामुळे काही राज्यांमध्ये गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले जात आहेत. मास्क, क्वारंटाईन, सोशल डिस्टंसिंगच्या माध्यमातून काळजी घेतली जात आहे.

गेल्या काही दिवसांमध्ये कोरोनाचा वेग थोडा मंदावताना दिसत आहे. तसेच कोरोनाच्या नव्या रुग्णांच्या संख्येत घट होत आहे. मात्र मृतांचा आकडा वाढत असल्याने कोरोनाचा धोका अद्याप कायम आहे.

काही राज्यांमध्ये कोरोनामुळे प्रशासनाच्या चिंतेत भर पडली आहे. देशातील कोरोनाग्रस्तांची संख्या 2,65,30,132 वर पोहोचली आहे. कोरोनामुळे आतापर्यंत देशभरात तब्बल 2,99,266 लोकांना जीव गमवावा लागला आहे.

गेल्या 24 तासांत देशात कोरोनाचे 2,40,842 नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर 3,741 जणांचा मृत्यू झाला आहे. याच दरम्यान देशात कोरोना लसीकरणाला सुरुवात झाली असून लाखो लोकांनी लसीचा डोस घेतला आहे.

कोरोना व्हायरसविरोधातील लस किती प्रभावी आहे? हा तपास करण्यासाठी आता भारतीय आयुर्विज्ञान संशोधन परिषदेकडून (ICMR) माहिती गोळा करण्यात येत आहे. आयसीएमआरने या संबंधी राज्यांकडून माहिती मागवली आहे.

कोरोनावरील लस घेतल्यानंतर किती नागरिकांना रुग्णालयात दाखल करावं लागलं? याची आकडेवारी सर्व राज्ये आणि केंद्र शासित प्रदेशांनी तयार ठेवावी, असं आयसीएमआरने सांगितलं आहे.

लस घेतल्यानंतर कोरोनाचा प्रादुर्भाव खरंच कमी होतोय का? यासाठी ही माहिती घेतली जात असल्याचं तज्ज्ञांनी म्हटलं आहे. राज्यांमध्ये आतापर्यंत किती जणांनी लस घेतली आहे? किती जण सक्रीय आहेत? तसेच उपचारासंबंधी प्रोटोकॉल आणि कोरोना संसर्ग रुग्ण रुग्णालयामध्ये दाखल असण्याचा कालावधीसंबंधी माहिती आयसीएमआरने मागितली आहे.

आयसीएमआरचे वरिष्ठ महामारीत तज्ज्ञ डॉ. समीरन पांडा यांनी कॉमन पोर्टल डेटा अपलोड करण्यासाठी राज्यांना प्रोत्साहन देण्यात येत आहे. यातून कोरोनाविरोधी लस खरंच किती प्रभावी आहे? हे समजण्यात मदत होईल असं म्हटलं आहे.

आरोग्यासंबंधीच्या पायाभूत सुविधांवर किती ताण पडत आहे? याचीही माहिती मिळेल. लस घेतल्यानंतरही माहिती मिळाल्यानंतर नागरिकांमधील गैरसमज दूर करण्यास मदत होईल, असं देखील म्हटलं आहे.

देशात 16 जानेवारीपासून ते आतपार्यंत 19.49 कोटी नागरिकांचे लसीकरण करण्यात आले आहे. यापैकी 15.19 कोटी नागरिकांना पहिला डोस देण्यात आला आहे. कोरोनावरील लसीचा दुसरा डोस घेणाऱ्यांची संख्या ही 4.30 कोटी आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.

वेगाने पसरणाऱ्या कोरोनामुळे लोकांच्या मनात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. अनेक देशात गंभीर परिस्थिती निर्माण झाली असून काही ठिकाणी पुन्हा एकदा लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली आहे.

जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) कोरोनामुळे झालेल्या मृत्यूबद्दल महत्त्वाचं विधान केलं आहे. कोरोना महामारीत होणाऱ्या सर्वच मृत्यूंची नोंद झालेली नाही असं म्हटलं आहे. सरकारी आकडेवारीनुसार जे आकडे आपल्यासमोर येत आहेत त्यापेक्षा खूप जास्त रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झालेला आहे.

WHO म्हणण्यानुसार आतापर्यंत 60 ते 80 लाख लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. मात्र, आत्तापर्यंत अधिकृत जगात 34.46 लाख लोकांचा मृत्यू झाल्याची नोंद आहे. कोरोनाचा कहर पाहायला मिळत आहे.

वार्षिक ग्लोबल हेल्थ स्टॅटिस्टिक्स रिपोर्ट जारी करताना जागतिक आरोग्य संघटनेनं म्हटलं आहे की, कोरोनामुळे वर्ष 2020 मध्येच जवळपास 30 लाख लोकांचा मृत्यू झाला आहे. मात्र, जगातील विविध देशांनी केलेल्या नोंदीनुसार ही आकडेवारी 12 लाखांच्या आसपास आहे.

कोरोनामुळे प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष मोठ्या प्रमाणात लोकांचा मृत्यू होत आहे. मात्र, या सर्वच आकडेवारीची आपल्याकडे नोंद झालेली नाही. अनेक ठिकाणाहून समोर येणारे आकडे प्रत्यक्षात खूप मोठे असल्याची भीती आरोग्य संघटनेनं व्यक्त केली आहे.