Mega Submarine: भारतीय नौदलाची ताकद वाढणार; चीनच्या वर्चस्वाला शह देण्यासाठी ‘मेगा-सबमरिन प्रोजेक्ट’

By ऑनलाइन लोकमत | Published: July 22, 2021 12:11 PM2021-07-22T12:11:09+5:302021-07-22T12:16:58+5:30

Mega Submarine: केंद्र सरकारने गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या सबमरिन प्रोजेक्ट म्हणजेच पाणबुडी प्रकल्पासाठीचे कंत्राट जाहीर केले आहे.

नवी दिल्ली: चीनच्या विस्तारवादी धोरणाचा आणि महत्त्वाकांक्षेमुळे भारतासह अनेक देशांना धोका असल्याचे पाहायला मिळत आहे. चीनची आक्रमक भूमिका, आर्थिक सक्षमता आणि वर्चस्वासाठी चाललेला लढा याचा अनेक देशांना फटका बसत आहे. (mega submarine programme)

हिंदी महासागरात चीन आपले वर्चस्व वाढवण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे दिसून येत आहे. यासाठी श्रीलंकेचा वापर चीनकडून केला जात असल्याचे सांगितले जात आहे. मात्र, भारताकडून चीनच्या वर्चस्वाला शह देण्यासाठी मोठा प्रोजेक्ट हाती घेतला जात असल्याचे सांगितले जात आहे.

केंद्र सरकारने गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या सबमरिन प्रोजेक्ट म्हणजेच पाणबुडी प्रकल्पासाठीचे कंत्राट जाहीर केले आहे. हे कंत्राट जवळपास ४० हजार कोटी रुपयांचे आहे. या प्रकल्पाच्या माध्यमातून हिंदी महासागरातील चीनच्या असलेल्या वर्चस्वाला शह देण्याचा प्रयत्न भारताचा असेल.

या प्रकल्पाच्या माध्यमातून सहा पाणबुड्यांची निर्मिती करण्यात येणार असून त्यामुळे भारतीय नौदलाची ताकत वाढणार आहे. संरक्षण मंत्रालयाने एका मोठ्या प्रक्रियेनंतर भारतातील माझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेड आणि लार्सन अँड टूब्रो या दोन कंपन्यांना या टेंडर संबंधी निवेदन सादर करण्यास सांगितले आहे.

या दोन कंपन्यांना विदेशातील पाच सूचीबद्ध कंपन्यांशी भागिदारी करुन हा प्रकल्प पूर्ण करायचा आहे. या पाच कंपन्यांमध्ये देवू शिपबिल्डर्स (दक्षिण कोरिया), थायसिनक्रुप मरिन सिस्टम (जर्मनी), नवांटिया (स्पेन), नेवल ग्रुप (फ्रान्स) आणि जेएससी आरओई (रशिया) यांचा समावेश आहे.

भारतीय नौदलाकडून २०३० पर्यंत संरक्षण क्षमता वाढवण्यासाठी सहा आण्विक पाणबुड्यांसह २४ नव्या पाणबुड्या खरेदी करण्यात येणार आहे. सध्या भारताकडे १५ परंपरिक पाणबुड्या आणि दोन आण्विक पाणबुड्या आहेत.

चीनकडे सध्या ५० पाणबुड्या असल्याचे सांगण्यात येत आहे. संरक्षण मंत्रालयाने गेल्या महिन्यात 'प्रोजेक्ट-७५' नावाच्या योजनेला प्रोत्साहन देण्यासाठी प्रयत्न सुरु केले आहेत. त्या माध्यमातून भारतीय नौदलाची क्षमता वाढवण्याचा प्रयत्न केला जातोय.

या प्रकल्पाच्या माध्यमातून ७५ पाणबुड्या आणि युद्ध नौका निर्माण करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. तसेच युद्धनौका संबधी उपकरणांचीही निर्मिती या प्रोजेक्टच्या माध्यमातून करण्यात येणार आहे.

हिंदी महासागरातील वर्चस्वासाठी चीनने पावले उचलायला सुरुवात केली असून या भागातील अनेक देशांच्या सीमांवर आपले नौदल तैनात केले आहे. चीनच्या या वाढत्या वर्चस्वाला शह देण्यासाठी भारत-अमेरिका-जपान-ऑस्ट्रेलिया या क्वाड देशांचा प्रयत्न आहे.

अलीकडेच या क्वाड देशांची एक बैठक पार पडली. क्वाड गटामुळे चीनचा चांगलाच तीळपापड झाला आहे. तर, यासंदर्भात रशिया चीनला पाठींबा देत असल्याचे सांगितले जात आहे.