Coronavirus : 'निर्बंध हटविल्यास गंभीर परिणाम होतील', जागतिक आरोग्य संघटनेचा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Published: April 12, 2020 02:18 PM2020-04-12T14:18:31+5:302020-04-12T14:47:37+5:30

जगभरात कोरोना व्हायरसने थैमान घातले आहे. अमेरिका, इटली आणि ब्रिटन यासारख्या देशांमध्ये कोरोनाने धुमाकूळ घातला आहे. या देशांमधील परिस्थिती कोरोनामुळे गंभीर झाली आहे. भारतात सुद्धा कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत चालला आहे.

या पार्श्वभूमीवर जगभरातील देशांना जागतिक आरोग्य संघटनेने निर्बंध आणि लॉकडाऊन हटविल्यास गंभीर परिणाम होतील, असा इशारा दिला आहे.

दरम्यान, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जगातील काही देशांमध्ये आणीबाणी घोषित करण्यात आली आहे. तर काही देशांमध्ये लॉकडाऊन सुरु आहे. भारतासह अनेक देशांमध्ये लॉकडाऊन सुरु आहे.

जागतिक आरोग्य संघटनेने शुक्रवारी इशारा दिला आहे की, कोरोना व्हायरसचा संसर्ग रोखण्यासाठी सुरु असलेले लॉकडाऊन किंवा बंदी लवकर हटविली, तर याचे घातक परिणाम होतील.

रॉयटर्सच्या माहितीनुसार, जागतिक आरोग्य संघटनेचे प्रमुख टेड्रोस एडहानोम घेब्रेयासस यांनी जिनिव्हामध्ये पत्रकार परिषदेत सांगितले की, जागतिक आरोग्य संघटनेला सुद्धा लॉकडाऊन किंवा निर्बंध हटविले जावे, असे वाटते. मात्र, हे हटविल्यानंतर गंभीर परिणाम होण्याची शक्यता आहे. कोरोनाचा आपल्याला योग्यरित्या सामना करावा लागणार आहे.

कोरोनावर मात करण्यासाठी भारतात सुद्धा २१ दिवसांचा १४ एप्रिलपर्यंत लॉकडाऊन सुरु आहे. कोरोना संकट आणि लॉकडाऊन यासह अन्य उपाययोजनांवर शनिवारी देशातील राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची बैठक झाली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आणखी दोन आठवड्यासाठी लॉकडाऊन वाढविण्याचे संकेत दिले आहेत. उत्तर प्रदेश, दिल्ली, पंजाब, मध्य प्रदेश आणि छत्तीसगडसह अन्य राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनी लॉकडाऊन वाढविण्यास सहमती दर्शविली आहे.

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही लॉकडाऊन वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. तर पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी ३० एप्रिलपर्यंत लॉकडाऊन वाढविला आहे. याशिवाय, ओडिसा, राजस्थान, तेलंगना आणि पंजाब या राज्यांमध्ये सुद्धा लॉकडाऊन वाढविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

भारतात सुद्धा कोरोनामुळे आतापर्यंत २७३ लोकांचा मृत्यू झाला आहे. तर ८, ३५६ जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. आरोग्य मंत्रालयाकडून रविवारी जारी करण्यात आलेल्या माहितीनुसार, गेल्या २४ तासांत देशात कोरोनाचे ९०९ नवे रुग्ण आढळले आहेत. तर ३४ लोकांचा मृत्यू झाला आहे. यातच दिलासादायक बाब म्हणजे, या आजारापासून ७१६ रुग्ण बरे झाले आहेत.

जगभरात कोरोनाच्या रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. जगभरात १७ लाखांहून अधिक लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. एक लाखापेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाला आहे. अमेरिकेतही पाच लाखांहून अधिक लोकांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. तर १२ हजारहून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे.