Coronavirus: कोरोनाविरुद्ध भारतानं बनवलं सुरक्षा कवच; अँन्टीबॉडी तपासणीसाठी स्वदेशी ‘एलिसा’ सज्ज

By ऑनलाइन लोकमत | Published: May 11, 2020 08:58 AM2020-05-11T08:58:29+5:302020-05-11T09:03:07+5:30

देशात दिवसेंदिवस कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. आतापर्यंत ६२ हजारांहून जास्त लोकांना कोरोनाची लागण झाली आहे तर २ हजारांपेक्षा जास्त रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

कोरोनामुळे देशात लॉकडाऊन सुरु असलं तरी प्रत्येक दिवशी कोरोनाचे नवीन रुग्ण आढळून येत आहेत. कोरोना संक्रमण साखळी तोडण्यासाठी देशात लॉकडाऊनसोबतच जास्तीत जास्त लोकांची कोरोना चाचणी करणे गरजेचे आहे. ज्यामुळे कोरोना संसर्ग पसरण्यापासून रोखला जाऊ शकतो.

कोरोना विषाणूच्या तपासणीसंदर्भात भारताने मोठे यश संपादन केले आहे. भारताने कोविड -१९ अँन्टिबॉडी चाचणी किट विकसित केली आहे.

इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च (आयसीएमआर) आणि पुण्यातील नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजी (एनआयव्ही) ने कोविड -१९ च्या अँन्टिबॉडी शोधण्यासाठी स्वदेशी आयजीजी एलिसा चाचणी 'कोविड कवच एलिसा' विकसित केली आहे.

केंद्रीय आरोग्य मंत्री हर्षवर्धन यांनी सांगितले की, पुणे येथील नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजीने कोविड -१९ ची अँन्टिबॉडी शोधण्यासाठी पहिली स्वदेशी एंटी-सार्स-सीओव्ही -२ मानवी आयजीजी एलिसा चाचणी किट यशस्वीरित्या विकसित केली आहे.

'या किटला मुंबईत 2 ठिकाणी मान्यता देण्यात आली होती. यात उच्च संवेदनशीलता आणि अचूकता आढळली आहे. याद्वारे अडीच तासात ९० नमुना चाचण्या एकाच वेळी केल्या जाऊ शकतात. जिल्हा पातळीवरही एलिसा आधारित चाचणी सहज शक्य आहे असंही केंद्रीय आरोग्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.

त्याच वेळी, आता ही चाचणी किट मोठ्या प्रमाणात तयार केली जाईल. यासाठी आयसीएमआरने एलिसा चाचणी किटच्या मोठ्या प्रमाणात उत्पादनासाठी झाइडस कॅडिलाबरोबर(Zydus Cadila) भागीदारी केली आहे. लवकरच या चाचणी किटद्वारे लोकांची मोठ्या प्रमाणात तपासणी केली जाईल.

दुसरीकडे, भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद (आयसीएमआर) ने देशातील कोविड -१९ ची लस तयार करण्याच्या दृष्टीने इंडिया बायोटेक इंटरनेशनल लिमिटेडबरोबर काम सुरू केले आहे. हे दोघेही कोरोनाच्या उपचारांसाठी देशात लस तयार करण्याचा प्रयत्न करीत आहेत.

तत्पूर्वी भारताने चीनकडून १५ लाख पीपीई किट्स मागवल्या आहेत. चीनच्या मोठ्या खासगी कंपन्यांकडून मिळालेल्या बर्‍याच किट्स सुरक्षा चाचणीत अपयशी ठरल्या होत्या.

तसेच भारताने चीनकडून टेस्टिंग किट्स घेतल्या होत्या. त्याबद्दल अनेक राज्यांनी या किट्सच्या कार्यपद्धतीवर शंका उपस्थित केल्यानंतर भारताने या टेस्टिंग किट्सद्वारे करणाऱ्या चाचण्या थांबवण्याचे आदेश दिले होते.