CoronaVirus News : बापरे! कोरोनाच्या दीर्घकाळ संसर्गानंतर 'या' आजारांचा धोका; रिसर्चमधून मोठा खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Published: March 25, 2021 11:04 AM2021-03-25T11:04:54+5:302021-03-25T11:23:20+5:30

CoronaVirus Marathi News and Live Updates : कोरोना व्हायरसबाबत संशोधनातून सातत्याने नवनवीन माहिती समोर येत आहे.

जगभरात कोरोनाचा हाहाकार पाहायला मिळत आहे. कोरोनाग्रस्तांच्या संख्येने 12 कोटींचा टप्पा पार केला असून एकूण रुग्णसंख्या 125,436,149 वर पोहोचली आहे. तर आतापर्यंत कोरोनामुळे 2,756,765 लोकांचा मृत्यू झाला आहे.

कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत. जगभरात संशोधन सुरू असून अनेक ठिकाणी चाचण्यांना यश आले आहे. काही ठिकाणी कोरोनामुळे गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे.

कोरोनाचा वाढता धोका लक्षात घेता अनेक ठिकाणी पुन्हा एकदा लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली आहे. जगभरातील रुग्णालयात कोरोनाग्रस्तांवर उपचार सुरू असून अनेकांनी त्यावर मात केली आहे.

कोरोना व्हायरसबाबत संशोधनातून सातत्याने नवनवीन माहिती समोर येत आहे. कोरोनामुळे दीर्घकाळ आजारी असणाऱ्या रुग्णांनी आजारावर मात केल्यानंतरही त्यांना काही शारीरीक समस्यांना सामोरे जावे लागण्याची दाट शक्यता आहे.

कोरोनाबाधितांना छातीत दुखणे, स्ट्रोक येणे आणि रक्ताच्या गाठी तयार होण्याचे आजार होऊ शकतात. व्हायरसवर मात केल्यानंतरही त्यानंतर शरीरावर होणाऱ्या परिणामांचा अभ्यास करण्यासाठी 30 तज्ज्ञांनी संशोधन केले. रिसर्चमध्ये हा खुलासा करण्यात आला आहे.

कोलंबिया विद्यापीठाच्या संशोधकांनी आपल्या रिसर्चमध्ये दीर्घकाळ कोरोनाबाधित असणाऱ्यांना फुफ्फुसात रक्ताच्या गाठी जमण्यासह अन्य काही त्रास होण्याची शक्यता असल्याचं म्हटलं आहे.

रिसर्चमध्ये संशोधकांनी ज्या रुग्णांमध्ये दीर्घकाळ कोरोनाची लक्षणे दिसली, त्यांच्यात याआधी आरोग्याशी संबंधित काहीतरी आजार होते हे देखील स्पष्ट केलं आहे. तसेच कोरोनाशी कसा संबंध आहे हे सांगितलं आहे.

कोलंबिया विद्यापीठाच्या इलेन वाय वॅन यांनी दिलेल्या माहितीनुसार, काही तरूण रुग्णांमध्ये कोरोनाच्या संसर्गानंतर त्यांच्या हृदयाचे ठोके हे जलदगतीने पडत असल्याचं आढळून आलं आहे.

तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार, कोरोना संसर्गानंतर हृदयाच्या ठोक्यांची गती थांबणे, स्ट्रोकही येऊ शकतो. हा त्रास कोरोना झाल्यानंतर होण्याची शक्यता असल्याची माहिती संशोधक एनी नलबांदियन यांनी दिली आहे. काही रुग्णांना संसर्गानंतरही अंगदुखी होण्याचा त्रास जाणवू शकतो असंही म्हटलं आहे.

तज्ज्ञांनी कोरोनानंतर आरोग्याच्या समस्या टाळण्यासाठी नियमित वैद्यकीय सल्ला घेणे आवश्यक आहे. कोरोनावर मात करणाऱ्यांनी आपल्या आरोग्याबाबत अधिक सतर्क असले पाहिजे असं म्हटलं आहे.

हृदय संबंधी, पचन संस्थेसंबंधी, फुफ्फुस अथवा श्वसनाबाबत काही त्रास जाणवत असल्यास तातडीने डॉक्टरांना भेटून वैद्यकीय सल्ला घेण्याची आवश्यकता असल्याचं तज्ज्ञांनी म्हटलं आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.

कोरोनाने संपूर्ण जगाला विळखा घातला आहे. अमेरिकेसारखा देशही कोरोनापुढे हतबल झाला आहे. वेगाने पसरणाऱ्या कोरोनाने सर्वत्र भीतीचे वातावरण निर्माण केले आहे. लाखो लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

देशामध्ये कोरोनाचा धोका दिवसेंदिवस वाढत असून, रुग्णांची संख्यादेखील वाढतेच आहे. देशातील कोरोनाग्रस्तांच्या संख्येने तब्बल एक कोटीचा टप्पा पार केला आहे. गेल्या 5 महिन्यांत पहिल्यांदाच रुग्णसंख्येत मोठी वाढ झाली आहे. पुन्हा एकदा कोरोनाची धडकी भरवणारी आकडेवारी समोर आली आहे.

कोरोनामुळे देशातील स्थिती चिंताजनक आहे. यावर मात करण्यासाठी देशात अनेक ठिकाणी लॉकडाऊन सुरू आहे. मात्र तरीही कोरोनाग्रस्तांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. गेल्या 24 तासांत रुग्णसंख्येत मोठी वाढ झाली असून आता चिंता वाढवणारी आकडेवारी समोर आली आहे.

गेल्या 24 तासांत देशभरात कोरोनाचे तब्बल 53,476 नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर 251 लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. त्यामुळे आता भारतातील कोरोनाग्रस्तांचा आकडा वाढला असून रुग्णांची एकूण संख्या 1,17,87,534 वर पोहोचली आहे. आरोग्य मंत्रालयाने याबाबत माहिती दिली आहे.

देशातील कोरोनाग्रस्तांपैकी 3,95,192 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तर 1,12,31,650 रुग्ण उपचारानंतर बरे झाले असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न केले जात आहेत. गेल्या काही दिवसांपासून देशात पुन्हा एकदा कोरोनाबाधितांच्या संख्येत मोठी वाढ होत आहे.