जगप्रसिद्ध 'या' दोन गावांमध्ये परस्परांशी होत नाही सोयरीक; कारण वाचून थक्कच व्हाल!

By ऑनलाइन लोकमत | Published: February 28, 2020 11:04 PM2020-02-28T23:04:07+5:302020-02-28T23:12:53+5:30

भगवान श्रीकृष्ण अन् राधाचं नातं हे सर्वश्रुत आहे. त्यांच्या प्रेमाच्या कथाही आजही अनेकांसाठी प्रेरणास्थान आहे. राधा ही भगवान श्रीकृष्णांची निस्सीम भक्त होती.

राधा आणि भगवान श्रीकृष्णाच्या कथेनुसारच त्यांची गावंसुद्धा प्रसिद्ध आहेत. उत्तर प्रदेशातील बरसाना आणि नंदगाव ही गावंसुद्धा होळीच्या पार्श्वभूमीवर चर्चेत येत असतात.

लठमार होळी पाहण्यासाठी इथे देश-विदेशातून पर्यटक मोठ्या संख्येने येथे येत असतात. स्थानिक रहिवाशांच्या म्हणण्यानुसार या दोन्ही गावांतील लोकांचे परस्परांशी संबंध खूप चांगले संबंध आहेत, तरीसुद्धा दोन्ही गावांतील लोकांनी आजवर एकमेकांशी कधीच सोयरीक केलेली नाही.

या दोन्ही गावांमध्ये सोयरीक न होण्याच्या पाठीमागे भगवान श्रीकृष्ण आणि त्यांची सखी राधा यांची अमर प्रेमकहाणी असल्याचे म्हटले जाते. राधा बरसाना गावाची राहणारी होती, तर श्रीकृष्ण नंदगावातले रहिवासी होते.

या दोघांचा विवाह झाला नसला, तरी या दोघांची प्रेमकहाणी अतिशय पवित्र मानली जाते. श्रीकृष्णाला बरसाना गावाचे जावई आणि राधेला नंदगावाची सून मानले जाते.

. बरसाना गावाचे जावई केवळ श्रीकृष्ण आणि नंदगावाची सून केवळ राधा अशी मान्यता असल्यामुळे इतर कोणाचीही सोयरिक दोन्ही गावांतील लोक करीत नाहीत.

या परंपरेच्या अनुसार राधा बरसाना गावाची लेक आणि नंदगावाची सून मानली जाते. आपल्याकडे असलेल्या प्रथेनुसार मुलीच्या सासरच्या घरी तिचे आईवडील किंवा कोणी नातेवाईक गेल्यानंतर तेथील पाणीही न पिण्याची पद्धत आहे.

हीच पद्धत अनुसरून आजच्या काळामध्ये बरसाना गावातील वयस्कर लोक जर नांदगावात गेले, तर आजही तेथील पाणी पीत नसल्याचे म्हटले जाते.

तसेच नंदगावामधून बरसानामध्ये पाहुणे मंडळी आल्यास, ती मुलीच्या सासरहून आली आहेत, असे समजून त्यांचे यथायोग्य मानपान करण्याची प्रथा येथे रूढ आहे.