Heatwave Warning: कोणत्या जिल्ह्यात उष्णतेची लाट, कोणत्या जिल्ह्यात पडणार पाऊस? IMD कडून सतर्कतेचा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 13, 2026 13:26 IST2026-03-13T13:20:14+5:302026-03-13T13:26:56+5:30

Rain Alert in Maharashtra: गेल्या काही दिवसांतच राज्यातील हवामान प्रचंड बदल झाले असून, तापमान वाढल्यामुळे उकाडा वाढला आहे. मात्र पुढील काही दिवस महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागात वेगवेगळी परिस्थिती असणार आहे.

Heatwave and Rain Alert for Maharashtra: उन्हाचा पारा वाढत असल्यामुळे उकाडा वाढला आहे. त्यातच पुढील तीन-चार दिवसांत हवामानात कमालीचा बदल होण्याचा अंदाज आहे. काही जिल्ह्यात उष्णतेची लाट येणार असून, काही भागात अवकाळी पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

भारतीय हवामान विभागाने काही जिल्ह्यामध्ये उष्णतेची लाट येण्याचा इशारा दिला आहे, तर काही जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह पाऊस पडणार असल्याचा अंदाज वर्तवला आहे.

शुक्रवारी (१३ मार्च) मुंबई, ठाणे, पालघर, रायगड या जिल्ह्यांमध्ये उष्णतेची लाट असणार आहे. तर विदर्भातील यवतमाळ, चंद्रपूर, मराठवाड्यातील लातूर आणि पश्चिम महाराष्ट्रातील सोलापूरमध्ये विजांच्या कडकडाटासह मध्यम ते हलका पाऊस होणार असल्याची शक्यता आहे.

शनिवारीही (१४ मार्च) कोकण आणि उर्वरित महाराष्ट्रात हवामानातील बदल कायम राहण्याचा अंदाज आहे. मुंबई, मुंबई उपनगर, पालघर, ठाणे, रायगडमध्ये उष्णतेची लाट असणार आहे. तर पूर्व विदर्भातील काही जिल्हे, मराठवाड्यातील काही जिल्हे आणि पश्चिम महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये मेघगर्जनेसह वादळी पाऊस पडण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

रविवारी (१५ मार्च) म्हणजे सुट्टीच्या दिवशी अनेकांचा फिरण्याचा प्लॅन फसू शकतो. कारण विदर्भ, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह अवकाळी पाऊस होणार असल्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.

सोमवारी (१६ मार्च) नागपूर, अमरावती, वर्धा, भंडारा, गोंदिया या विदर्भातील जिल्ह्यांसह मराठवाड्यातील आठही जिल्ह्यात तुरळक ठिकाणी वादळी वारे आणि विजांच्या कडकडाटासह पाऊस होण्याचा अंदाज आहे. त्याचबरोबर मध्य आणि पश्चिम महाराष्ट्रातील काही जिल्ह्यातही वादळी पाऊस होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. यातील काही जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे.

काही जिल्ह्यात गारपीट होण्याचा अंदाज असून, राज्य सरकारने नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन केले आहे. हवामान विभागाच्या अंदाजावर लक्ष ठेवून शेतीच्या कामांचे नियोजन करावे आणि संभाव्य पाऊस व वादळी वाऱ्यांपासून पिकांचे नुकसान टाळण्यासाठी आवश्यक ती खबरदारी घ्यावी, असे कृषी विभागाने म्हटले आहे.