CoronaVirus Live Updates : मोठा दिलासा! महाराष्ट्रात कोरोनाची लाट ओसरतेय; 23 महिन्यांनी झाली सर्वात कमी मृत्यूची नोंद

By ऑनलाइन लोकमत | Published: February 28, 2022 11:27 AM2022-02-28T11:27:32+5:302022-02-28T11:43:59+5:30

CoronaVirus Marathi News and Live Updates: देशाची आर्थिक राजधानी मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रात कोरोना लाट आटोक्यात आल्याचं चित्र पाहायला मिळत आहे.

भारतामध्ये काही दिवसांपूर्वी कोरोनाचा धोका वाढला असून रुग्णांची संख्यादेखील वाढत होती. मात्र आता सध्या देशात कोरोनाचा वेग मंदावताना दिसत आहे. देशातील कोरोनाग्रस्तांच्या संख्येने तब्बल तीन कोटींचा आकडा पार केला आहे.

कोरोनाच्या संकटात आता मोठा दिलासा मिळाला आहे. देशातील नव्या रुग्णांच्या संख्येत मोठी घट झाली आहे. आता सुखावणारी आकडेवारी समोर आली आहे. देशात गेल्या 24 तासांत कोरोनाचे 10 हजारांहून कमी नवे रुग्ण आढळून आले आहेत.

कोरोनामुळे देशात 5,13,843 अधिक लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. आरोग्य मंत्रालयाने याबाबत माहिती दिली आहे. सोमवारी (28 फेब्रुवारी) केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, गेल्या 24 तासांत देशभरात कोरोनाचे 8,013 नवे रुग्ण आढळून आले आहेत.

देशातील कोरोनाग्रस्तांपैकी 1,02,601 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. देशात 4,23,07,686 जणांनी कोरोनावर मात केली आहे. लाखो लोक उपचारानंतर बरे झाले असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे. तर आतापर्यंत 1,77,50,86,335 लोकांचं लसीकरण करण्यात आलं आहे.

देशाची आर्थिक राजधानी मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रात कोरोना लाट आटोक्यात आल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. दैनंदिन रुग्णसंख्या आणि कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूची संख्या कमी झाल्यामुळे हा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.

रविवारी राज्यात कोरोनामुळे दोन जणांचा मृत्यू झाला आहे. नवी मुंबई आणि सोलापूरमध्ये मृत्यू झाल्याची नोंद आहे. यापूर्वी कोरोना मृत्यूची सर्वात कमी नोंद पहिल्या लाटेदरम्यान झाली होती.

30 मार्च 2020 रोजी कोरोनामुळे दोघांचा मृत्यू झाल्याची नोंद आहे. 23 महिन्यांनी राज्यात कमी मृत्यूची नोंद झाली आहे. सध्याच्या परिस्थितीत राज्यात 7228 सक्रिय रुग्ण आहेत. त्यात पुण्यातील रुग्णसंख्या सर्वाधिक आहे.

पुण्यात 2541 सक्रिय रुग्ण आहेत. त्यानंतर दुसऱ्या क्रमांकावर मुंबई आहे. मुंबईत 838 सक्रिय रुग्ण आहेत. तिसऱ्या स्थानी अहमदनगर आणि चौथ्या स्थानी ठाणे आहे. अहमदनगरमध्ये 645 आणि ठाण्यात 558 सक्रिय रुग्ण आहेत.

राज्यात होम क्वारंटाईनमध्ये असलेल्या रुग्णांच्या संख्येत मोठी घट झाली आहे. 27 दिवसांत होम क्वारंटाइन रुग्णांची संख्या 87 टक्क्यांनी घटली आहे. 1 फेब्रुवारीला होम क्वारंटाइन रुग्णांची संख्या 10,69,596 होती. ती 27 फेब्रुवारीला कमी होऊन 1,36,445 पर्यंत आली आहे.

कोविड सेंटरमध्ये हीच परिस्थिती देखील पाहायला मिळतेय. कोविड सेंटरमधील रुग्णसंख्या 73 टक्क्यांनी कमी झाली आहे. 1 फेब्रुवारीला कोविड सेंटरमध्ये 2731 रुग्ण क्वारंटाइन होते, तर 27 फेब्रुवारीला संख्या कमी होऊन 744 वर आली आहे.

कोरोनामुळे मृत्यू होण्याचे प्रमाण कमी झाले आहे. मुंबईत दुसऱ्या लाटेदरम्यान सातव्यांदा शून्य मृत्यूची नोंद झाली होती. दुसऱ्या लाटेत डिसेंबरमध्ये सातव्यांदा शून्य मृत्यूची नोंद झाली झाली होती.

तिसऱ्या लाटेदरम्यान फेब्रुवारीत आठव्यांदा शून्य मृत्यूची नोंद झाली आहे. राज्यात ओमायक्रॉनचे देखील रुग्ण आढळून आले आहेत. संसर्ग रोखण्यासाठी उपाय केले जात आहेत. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.