बाबो! रोजगार शोधायला जोडपं निघालं अन् अख्खं गावच वसवलं; आता तब्बल ८०० जणांचं कुटुंब

By ऑनलाइन लोकमत | Published: July 23, 2021 09:16 PM2021-07-23T21:16:28+5:302021-07-23T21:20:42+5:30

गावची लोकसंख्या ८०० च्या घरात; सगळे एकाच वंशाचे

देशात लोकसंख्या नियंत्रण कायद्याबद्दल चर्चा सुरू आहे. त्यामुळे राजकारण ढवळून निघालं आहे. संसदेच्या पावसाळी अधिवेशनात यावर चर्चा अपेक्षित आहे. पुढील आठवड्यात याबद्दल संसदेत चर्चा होण्याची शक्यता आहे.

लोकसंख्या नियंत्रण कायद्याची चर्चा सुरू असताना झारखंडच्या कोडरमा जिल्ह्यातलं एक गाव चर्चेत आलं आहे. कोडरमातील नादकरी ऊपरी टोला गावची लोकसंख्या ८०० च्या घरात आहे. विशेष म्हणजे हे सगळे एकाच वंशाचे आहेत.

उत्तीम मिया नावाची एक व्यक्ती १९०५ मध्ये उदरनिर्वाहासाठी भटकंती करत होती. त्यांच्यासोबत पत्नी आणि वडील बाबर अली होते. ते कोडरमा इथे पोहोचले. जंगलात एका ठिकाणी त्यांनी आश्रय घेतला आणि मुक्काम केला.

उत्तीम मिया यांनी त्यांच्या कुटुंबासह आसपासच्या परिसराची साफसफाई केली. जमीन शेतीलायक बनवली. एका झोपडीत ते राहू लागले. त्यानंतर उत्तीम यांचं कुटुंब वाढत गेलं. त्यांना ५ मुलं झाली. पुढे त्यांना मुलं झाली. कुटुंबातील सदस्यांची संख्या ८२ वर पोहोचली. आज ११६ वर्षांनंतर त्यांच्या कुटुंबात ८०० जण आहेत. त्यांचं एक गाव आहे.

कोडरमामध्ये वास्तव्यास असताना उत्तीम यांना ५ मुलं झाली. पुढे त्यांना अपत्यं झाली. यामध्ये २६ मुलं आणि १३ मुलींचा समावेश होता.

सुरुवातीला चुलता भावंडांमध्येच निकाह झाले. त्यातून ७३ मुलं जन्माला आली. उत्तीम यांच्या कुटुंबातील सदस्यांची संख्या आता ८०० वर गेली आहे. उत्तीम यांचं गाव नादकरी ऊपरी टोला नावानं ओळखलं जातं.

गावाचा मुख्य व्यवसाय शेती आहे. त्यातून सगळ्यांचा उदरनिर्वाह चालतो. काही जणांनी रोजगारासाठी शहराची वाट धरली आहे.गावात सध्या ८०० जण वास्तव्यास आहेत. ते एकाच कुटुंबाचे सदस्य आहेत. कुटुंबातील काही मुलांची लग्नं गावाबाहेर झाली आहेत. गावात दोन मशिदी, मदरसा आणि शाळा आहे. गावाला अनेक सरकारी योजनांचा लाभदेखील मिळाला आहे.