CoronaVirus Live Updates : कोरोनाचा प्रकोप! चीनच्या 'या' शहरात नवव्यांदा लॉकडाऊन; रुग्णवाहिकेच्या लाईनमध्ये मरताहेत लोक

By ऑनलाइन लोकमत | Published: April 28, 2022 12:49 PM2022-04-28T12:49:03+5:302022-04-28T13:04:00+5:30

CoronaVirus Marathi News and Live Updates: चीनमध्ये कोरोनाचा सुस्साट वेग पाहायला मिळत असून तो पुन्हा एकदा कोरोनाच्या विळख्यात सापडला आहे.

जगभरात कोरोनाने धुमाकूळ घातला आहे. अनेक देशांमध्ये गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. रुग्णांच्या संख्येने तब्बल 51 कोटींचा टप्पा पार केला आहे. तर लाखो लोकांना कोरोनामुळे आपला जीव गमवावा लागला आहे.

चीनमध्ये कोरोनाचा सुस्साट वेग पाहायला मिळत असून तो पुन्हा एकदा कोरोनाच्या विळख्यात सापडला आहे. शांघाईमध्ये परिस्थिती अत्यंत बिकट झाली आहे. लॉकडाऊनमुळे दिवसातून एकदाच लोकांना जेवण मिळतं.

शांघाईमध्ये कडक ल़ॉकडाऊन लावण्यात आला आहे. कडक लॉकडाऊनमुळे लोकांना अनेक मोठ्या समस्यांचा सामना करावा लागत आहे. अन्नधान्याचा तुडवडा निर्माण झाला आहे. धक्कादायक बाब म्हणजे रुग्णवाहिकेच्या लाईनमध्ये लोकांचा मृत्यू होत आहे.

चीनमधील एक छोटं शहर झिरो कोविड पॉलिसीचा सामना करत आहे. येथे नवव्यांदा लॉकडाऊन लावण्यात आला आहे. रुइली असं या शहराचं नवा असून हे शहर चीन आणि म्यानमारमधील व्यापाराचं मोठं केंद्र आहे.

गेल्या अनेक आठवड्यापासून येथे लॉकडाऊन आहे. यामुळेच तब्बल दोन लाखांहून अधिक लोक हे शहर सोडून गेले आहेत.160 दिवसांहून अधिक काळ लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. यामुळे लोक प्रचंड त्रस्त झाले आहेत.

रुइलीच्या एका हॉटेलमध्ये काम करणाऱ्या यँगने न्यूज एजन्सीला दिलेल्या माहितीनुसार, अर्थव्यवस्था बिघडली आहे. अनेक व्यापारी हे शहर सोडून जात आहे. गेल्या सात दिवसांपासून तो क्वारंटाईनमध्ये आहे.

कोरोनामुळे छोट्या छोट्या शहरांकडे अधिक लक्ष दिलं जात आहे. रुइली हे शहर व्यापाराचं केंद्र असल्याने कोरोनाचा प्रसार आणखी वेगाने होण्याची जास्त शक्यता वर्तवण्यात येत आहे. लोकांवर उपचार करणं देखील कठीण होत आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.

चीनमधील शांघाईमध्ये कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे लोकांची अवस्था दयनीय झाली आहे. शहरात कडक लॉकडाऊन लागू करण्यात आल्याने खाद्यपदार्थांच्या वितरणात अनेक अडचणी येत आहेत. अन्नपदार्थांचा मोठा तुटवडा निर्माण झाला आहे.

मेगा सिटीतील लोक खाण्यापिण्यासाठी तडफडत आहेत. शहरातील नागरिकांना दिवसातून फक्त एकदाच अन्न मिळत आहे. स्थानिक लोकांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की, त्यांना दिवसातून एकदाच जेवण मिळते. ते किती दिवस जिवंत आहेत, हे त्यांनाच माहीत नाही.

कोरोना संसर्गावर मात करण्यासाठी सरकारने शांघाईमध्ये कडक लॉकडाऊन लागू केले. शहरातील सर्व लोकांची कोरोना चाचणी करण्यासाठी सरकारने हजारो वैद्यकीय कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली. त्यासाठी लष्कराच्या डॉक्टरांनाही पाचारण करण्यात आले होते.

मोठ्या प्रमाणावर कोरोना चाचणी केली जात आहे. असे असूनही शांघाईमध्ये कोरोनाचा संसर्ग अजूनही आटोक्यात येऊ शकला नाही. लोकांना त्यांच्या घरात कैद करण्यास भाग पाडले गेले आहे. झिरो कोविड धोरणांतर्गत येथे कडक निर्बंध लादण्यात आले आहेत.

फक्त एक व्यक्ती गंभीर आजारी आहे. जगभरातील कोरोनाग्रस्त देशांच्या तुलनेत चीनचे असे आकडे पूर्णपणे विरुद्ध आहेत. चीनमुळे पुन्हा एकदा जगाचं टेन्शन वाढलं आहे. दिवसागणिक रुग्णसंख्या वाढत आहे.

शांघाईमधील रुग्णालये रुग्णांनी खचाखच भरली आहेत. सर्व वॉर्ड भरलेले असून नव्या रुग्णांना जागाच शिल्लक राहिलेली नाही. आरोग्य यंत्रणेवर देखील ताण आला असून प्रशासनाची चिंता वाढली आहे.

लोकांनी दावा केला आहे की खाण्या-पिण्याचं सामान संपत आहे. तसेच सुपरमार्केट आणि दुकानातील स्टॉक देखील कमी होत आहे. वेगाने पसरणाऱ्या कोरोनामुळे लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.