Sameer Wankhede: समीर वानखेडेंबाबत मोठा दावा; ड्रग्ज कारवाई करताना कसं रचलं जातं षडयंत्र?

By ऑनलाइन लोकमत | Published: October 26, 2021 11:56 AM2021-10-26T11:56:47+5:302021-10-26T12:06:53+5:30

NCB Raid on Mumbai Cruise Drugs Rave Party: एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांच्याविरोधात निनावी पत्र मंत्री नवाब मलिक यांनी ट्विटरवरुन जाहीर करत त्यांच्याविरोधात भ्रष्टाचाराचे आरोप लावले आहेत.

मुंबई क्रुझ ड्रग्ज पार्टीवर(Mumbai Cruise Rave Party) NCB ने छापेमारी करुन अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन याला अटक करण्यात आली. या कारवाईवर राष्ट्रवादी नेते आणि राज्य सरकारमधील मंत्री नवाब मलिक(Nawab Malik) यांनी अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत.

NCB अधिकारी समीर वानखेडे यांच्यावर भ्रष्टाचाराचे आणि वसुलीचे आरोप करत बॉलिवूडमध्ये दहशत पसरवून इंडस्ट्रीला बदनाम करण्याचा आरोप मलिकांनी केला आहे. आता याबाबत मलिकांनी एका अज्ञात एनसीबी कर्मचाऱ्याचं पत्र सार्वजनिक करून वानखेडेंवर २६ प्रकरणात आरोप केले आहेत.

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह(Amit Shah) यांना सांगून NCB चे माजी महासंचालक राकेश अस्थाना यांनी समीर वानखेडेंची नियुक्ती मुंबईत NCB झोनल डायरेक्टर म्हणून केली. राकेश अस्थाना यांच्या सांगण्यावरुनच समीर वानखेडे यांनी बॉलिवूड कलाकारांवर ड्रग्ज प्रकरणात कारवाई करण्यास सुरुवात केली.

या पत्रात म्हटलंय की, बॉलिवूडमधील कलाकारांकडून कोट्यवधी रुपयांची वसुली करण्यात येते. त्यात अस्थाना यांचाही हिस्सा असतो. या कलाकारांकडून वकील अयान खान पैसे जमा करतात. अयाज खान आणि समीर वानखेडे यांची मैत्री आहे. कुठल्याही परमिशनशिवाय अयाज खान NCB कार्यालयात ये-जा करत असतात.

अयाज खान समीर वानखेडे यांना मासिक वसुली करुन देत असतो. बदल्यात कुठल्याही बॉलिवूड कलाकाराला पकडलं तर अयाज खानला वकील बनवण्यास भाग पाडतो. समीर वानखेडे हा मीडियात झळकण्यासाठी काम करतो. ज्यासाठी त्याने अनेक निर्दोष व्यक्तींना खोट्या गुन्ह्याखाली अडकवलं आहे.

खोटे गुन्हे बनवण्यासाठी समीरनं स्वत:ची वेगळी टीम बनवली आहे. यात विश्व विजय सिंह, आशिष रंजन, किरण बाबू, विश्वनाथ तिवारी, सुधाकर शिंदे, OTC कदम, शिपाई रेड्डी, पीडी मोरे आणि विष्णू मीना, विजय अनिल माने, समीरचे खासगी सचिव शरद कुमार यांचाही समावेश आहे.

हे सर्वजण कुणाच्या घरी सर्च करताना कमी ड्रग्ज आढळलं तर वास्तविक प्रमाण न दाखवता जास्त प्रमाण दाखवून आर्थिक व्यवहार केले जात होते. ज्यामुळे त्या आरोपीला जामीन मिळू शकत नाही. IO आशिष रंजन, किरण बाबू, विश्वनाथ तिवारी, सुधाकर शिंदे बनावट पंचनामा बनवायचे.

NCB ऑफिसमध्ये पंचनामा लिहिला जायचा तो मनमर्जीप्रमाणे बनवायचे. समीर वानखेडे त्याच्या माणसांकडून ड्रग्ज खरेदी करायचा आणि खोटे गुन्हे बनवायचे. यात दशरथ, जमील, अफजल, मोहम्मद शेख, नासिर, आदिल उसमानी यांचा समावेश होता. ते समीरला ड्रग्ज पुरवायचे.

ड्रग्ज खरेदी करण्यासाठी समीर सीक्रेट सर्व्हिस फंड आणि लोकांच्या घराची तपासणी करताना जमा केलेले पैशांचा वापर करायचा. इतकचं नाही तर समीर आणि त्याची मंडळी कुणाच्या घरात चेकिंग करताना ड्रग्ज ठेवायचे आणि पकडून खोटे गुन्हे नोंद करायचे.

या पत्रातील गंभीर आरोपामुळे समीर वानखेडे यांच्या कार्यशैलीवर प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे. जेव्हापासून समीर वानखेडे NCB झोनल डायरेक्टर बनलेत तेव्हापासून प्रत्येक केसमध्ये पकडलेल्या माणसांकडून २५ कोऱ्या कागदांवर सह्या घेण्यात आल्या आहेत. मनाप्रमाणे त्यावर पंचनामा लिहिला जातो.

जो अधिकारी समीर वानखेडेला साथ देत नाही त्यांना कुठल्या तरी कारणावरुन निलंबित केले जाते. आतापर्यंत ४ अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आलं आहे. या सर्व प्रकरणांचा तपास करावा आणि पकडलेल्या आरोपींची चौकशी करून सत्य बाहेर आणावं असं या निनावी पत्रात लिहिलं आहे.