पतीच्या हत्येप्रकरणी पत्नी भोगत होती शिक्षा, पाच वर्षाने परतला; म्हणाला - 'साहेब मी जिवंत आहे'

By ऑनलाइन लोकमत | Published: October 21, 2021 05:10 PM2021-10-21T17:10:18+5:302021-10-21T17:22:01+5:30

Bihar Crime News : ही घटना आहे कटहरी गावातील. कटहरी गावात राहणाऱ्या विकास कुमारने आपला भाऊ राम बहादूर रावच्या हत्येची केस २०१६ मध्ये कोर्टात दाखल केली होती.

बिहारमध्ये एका हत्येप्रकरणी एक अजब घटना समोर आली आहे. इथे पाच वर्षाआधी मृत केलेली व्यक्ती पुन्हा जिवंत झाली आहे. ही पाच वर्षाने आपल्या घरी पोहोचली. ही घटना अजून आश्चर्यकारक यासाठी आहे कारण याच व्यक्तीच्या हत्येच्या आरोपात त्याची पत्नी आणि सासरचे लोक शिक्षा भोगत आहेत. मात्र आता पाच वर्षाने परत येऊन त्याने सांगितलं की, मी जिवंत आहे तर शिक्षा भोगणाऱ्या लोकांच्या जीवात जीव आलाय.

ही घटना आहे कटहरी गावातील. कटहरी गावात राहणाऱ्या विकास कुमारने आपला भाऊ राम बहादूर रावच्या हत्येची केस २०१६ मध्ये कोर्टात दाखल केली होती. या केसमध्य विकासने राम बहादूर रावची पत्नी आणि सासरच्या लोकावर हत्येचा आरोप लावला होता. असं असलं तरी सगळेच आरोपी जामिनावर आहेत. पण अचानक पाच वर्षाने राम बहादूर राव समोर आल्याने एकच खळबळ उडाली आहे.

विकास कुमारने आरोप लावला होता की, २०१५ मध्ये त्याच्या भावाची हत्या करण्यात आली होती. विकासने भावाचा शोध घेतला तर काहीच हाती लागलं नाही. ज्यानंतर त्याने पोलिसात तक्रार देण्याचा प्रयत्न केला. पण केस दाखलच करून घेतली नाही. तेव्हा विकासने केस कोर्टात दाखल केली. अशातच दोन दिवसाआधी मृत राम बहादूर राव घरी परतला तेव्हा घरातील लोकांसहीत गावातील लोकही त्याला पाहून हैराण झाले.

पाच वर्षाने परतलेल्या राम बहादूर रावने सांगितलं की, तो गुजरातच्या एका धागा बनवण्याच्या कंपनीत काम करत होता आणि कंपनीतून घरी परतत असताना त्याचा अपघात झाला. ज्यात तो गंभीरपणे जखमी झाला आणि कोमात गेला होता. यामुळे त्याची बरीच स्मरणशक्तीही गेली होती. बरेच दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर जेव्हा राम बहादूर रावला सगळं आठवलं तेव्हा त्याने आपल्या परिवाराला शोधण्याचा खूप प्रयत्न केला. पण कुणी सापडलं नाही. अशात फेब्रुवारी २०२१ मध्ये त्याने फेसबुकच्या माध्यमातून नातेवाईकांना शोधलं. तेव्हा त्याला फेसबुकवरून त्याचा मुलगा आकाशचा नंबर मिळाला. तेव्हा राम बहादूर रावने मुलाला फोन लावला आणि सगळी कहाणी सांगितली.

वडिलांसोबत बोलल्यानंतर मुलगा आकाश सिंह आपल्या आईसोबत मार्चमध्ये गुजरातमध्ये गेला. तिथे राम बहादूर रावच्या पत्नीने त्याला सांगितलं की, त्याच्या भावाने हत्येचा गुन्हा दाखल केला. नंतर राम बहादूर राव पत्नी आणि मुलासह पोलीस स्टेशनमध्ये पोहोचला. इथे त्याने पोलीस अधिकाऱ्यांना सगळी कहाणी सांगितली. आता अपहरण आणि हत्येच्या केसमध्ये नवं वळण आल्याने पोलीस नव्याने चौकशी करत आहे.

Read in English