TATA ग्रुपची कमाल! नोकरी देण्यात १ नंबर वर; मुकेश अंबानींना धोबीपछाड देत रतन टाटांची मुसंडी

By ऑनलाइन लोकमत | Published: December 14, 2021 01:54 PM2021-12-14T13:54:10+5:302021-12-14T13:59:34+5:30

रिलायन्सचे मुकेश अंबानी कमाई करण्यात अव्वल ठरले असून, रतन टाटा नोकऱ्या देण्यात आघाडीवर असल्याचे एका रिपोर्टमध्ये म्हटले आहे.

कोरोना काळात हजारो उद्योग, व्यवसाय बंद झाल्याचे पाहायला मिळाले. मात्र, आता कोरोनाच्या परिस्थितीतून उद्योगजगत हळूहळू सावरताना दिसत आहेत. अनेक उद्योग रुळावर येत आहेत. यामुळे नोकऱ्यांची संख्या वाढवणे, नोकरभरती यांना वेग आल्याचे दिसत आहे.

TATA आणि Reliance यांसारख्या अनेक ग्रुपमधील कंपन्या कोरोना काळातही अविरतपणे कार्य करत होत्या. कोरोना काळातही केलेल्या दमदार कामगिरीमुळे शेअर मार्केटमध्ये कंपन्यांची पत चांगलीच वाढल्याचे पाहायला मिळाले. यामुळे गुंतवणूकदारही मालामाल झाले.

TATA ग्रुपमधील एका कंपनीने मार्केटकॅपमध्ये आघाडी घेतली. हीच कंपनी नोकरी देणासंदर्भातील अग्रेसर असल्याचे एका रिपोर्टमधून समोर आले आहे. रिलायन्सचे मुकेश अंबानी कमाई करण्यात अव्वल ठरले असून, रतन टाटा नोकऱ्या देण्यात आघाडीवर असल्याचे एका रिपोर्टमध्ये म्हटले आहे.

हारुन रिपोर्टनुसार, टाटा ग्रुपमधील टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (TCS) ही कंपनी तरुणांना नोकऱ्या देण्यामध्ये देशात अव्वल ठरली आहे. टीसीएसने देशात सर्वाधिक नोकऱ्या दिल्याचे या रिपोर्टमध्ये नमूद करण्यात आले आहे.

हारुन इंडियाने ५०० कंपन्यांची यादी तयार केली असून, यामधील १३९ भारतीय कंपन्यांनी १० हजारांहून अधिक नोकऱ्यांमध्ये तरुणांना संधी दिली आहे. यामध्ये टीसीएस सर्वांत मोठी नोकरदार कंपनी ठरली आहे. मार्केट कॅपिटलच्या दृष्टिनेही टीसीएस दुसऱ्या स्थानी आहे. आयटी क्षेत्र सर्वाधिक नोकऱ्या देणारे ठरले आहे.

TCS ने ५.६ लाखांहून अधिक रोजगार दिले आहेत. यामध्ये दुसऱ्या स्थानावर क्वेस कॉर्प कंपनी असून, या कंपनीने देशात ३.६३ लाख रोजगार दिले. या यादीत लार्सन अँड टुब्रो तिसऱ्या स्थानावर असून, या कंपनीने ३.६० लाख नोकऱ्या दिल्या. चौथ्या स्थानावर असलेल्या इंफोसिसने २.५९ लाख, तर पाचव्या स्थानी असलेल्या रिलायन्सने २.३६ लाख नोकऱ्या दिल्या आहेत.

वित्तीय क्षेत्रात सर्वाधिक नोकऱ्या देणाऱ्यांमध्ये HDFC अव्वल ठरली आहे. एचडीएफसी बँकेने १.२० लाखांहून अधिक रोजगार उपलब्ध करून दिल्याचे या रिपोर्टमध्ये म्हटले आहे. तर ऑटोमोबाइल आणि ऑटो कंपोनेट क्षेत्रात त्या खालोखाल नोकऱ्या उपलब्ध झाल्याचे सांगितले जात आहे. यानंतर आरोग्य क्षेत्र, इंजिनिअरिंग क्षेत्र येते.

दरम्यान, शेअर बाजारातील टॉप १० कंपन्यांपैकी ७ कंपन्यांचे मार्केट कॅप म्हणजेच बाजारमूल्य आठवडाभरात १,२९,०४७.६१ कोटी रुपयांनी वाढले. यामधील टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसला (TCS) याच काळात सर्वांत जास्त फायदा झाल्याचे सांगितले जात आहे.

एका अहवालानुसार, TCS चे मार्केट कॅप ७१,७६१.५९ कोटी रुपयांनी वाढले आहे. टॉप १० कंपन्यांच्या यादीत रिलायन्स इंडस्ट्रीजने पहिले स्थान कायम राखले. त्यानंतर अनुक्रमे टीसीएस, एचडीएफसी बँक, इन्फोसिस, हिंदुस्थान युनिलिव्हर, एचडीएफसी, आयसीआयसीआय बँक, बजाज फायनान्स, एसबीआय आणि भारती एअरटेल यांचा क्रमांक लागतो.

शेअर मार्केटमध्ये सर्वाधिक सूचीबद्ध कंपन्या TATA ग्रुपच्या आहेत. आतापर्यंत अनेकविध क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या TATA ग्रुपच्या एकूण २९ कंपन्या शेअर मार्केटमध्ये सूचीबद्ध झालेल्या आहेत.

तर मार्केट कॅपमध्ये क्रमांक एक वर असलेल्या TATA ग्रुपचा मार्केट कॅप २१.९९ लाख कोटींवर गेला आहे. १८ ऑक्टोबर रोजी TATA ग्रुपचा मार्केट कॅप २३.६९ लाख कोटींवर होता. मात्र, त्यात १.७० लाल कोटींची घसरण झाली. TATA ग्रुपमध्ये टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (TCS) या कंपनीचा शेअर सर्वाधिक आहे.

TATA ग्रुपमधील टीसीएसनंतर टायटन कंपनीचा मार्केट कॅप दुसऱ्या क्रमांकावर आहे. Titan कंपनीचा मार्केट कॅप २.२९ लाख कोटी आहे. शेअर मार्केटमधील सूचीबद्ध ग्रुपचे एकूण मार्केट कॅप २७४ लाख कोटींवर आहे.