अनिल अंबानींच्या अडचणीत वाढ! कर्ज फेडण्यासाठी बँकेलाच विकलं हेड ऑफिस

By ऑनलाइन लोकमत | Published: April 1, 2021 08:27 PM2021-04-01T20:27:43+5:302021-04-01T20:31:57+5:30

कर्ज फेडणे शक्य होत नसल्याने अनिल अंबानी (Anil Ambani) यांनी मोठा निर्णय घेतला आहे. कर्जाची परतफेड करण्यासाठी त्यांनी बँकेला कंपनीचे हेड ऑफिस विकले आहे.

उद्योगपती अनिल अंबानी (Anil Ambani) यांच्यावरील कर्जाचा बोजा वाढतच चालला आहे. बँकेकडून घेतलेल्या कर्जाचे हफ्ते फेडणेही अनिल अंबानी यांना दुरापास्त झाले आहे.

कर्ज फेडणे शक्य होत नसल्याने अनिल अंबानी यांनी मोठा निर्णय घेतला आहे. कर्जाची परतफेड करण्यासाठी त्यांनी येस बँकेला (Yes bank) आपले हेड ऑफिस विकले आहे.

अनिल अंबानी यांनी रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चरचे मुंबई येथील मुख्य कार्यालय येस बँकेला १,२०० कोटी रुपयांना विकल्याची माहिती मिळाली आहे. जुलै २०२० मध्ये येस बँकेने रिलायन्स ईन्फ्राच्या मुख्यालयाचा ताबा घेतला होता.

रिलायन्स कंपनीने दिलेल्या स्पष्टीकरणानुसार, या व्यवहारातून आलेल्या पैशांचा अपयोग येस बँकेकडून घेतलेल्या कर्जाची परतफेड करण्यासठी केला जाणार आहे.

रिलायन्स इन्फ्राने कार्यालय विकल्याची अधिकृतपणे घोषणा गुरुवारी केली. अनिल अंबानी यांच्या रिलायन्स इंफ्रा कंपनीवर असलेल्या २,८९२ कोटी रुपयांच्या कर्ज वसुलीसाठी बँकेना वित्तीय कारवाई केली होती.

बँकेचा दबाव वाढल्याने अधिकृतपणे अंबानी यांच्या कंपनीने मुख्य कार्यालय विकल्याचे जाहीर केले. कोणत्याही बँकेला एखाद्याच्या संपत्तीवर जप्तीची कारवाई करायची असेल तर त्याआधी दोन महिने नोटीस द्यावी लागते.

अनिल अंबानी यांच्या रिलायन्स कंपनीवर वेगवेगळ्या बँकेचे एकूण ३,५१५ कोटी रुपयांचे कर्ज आहे. कर्ज फेडण्यासाठी बंधु मुकेश अंबानी यांची अनिल अंबानी यांना काही प्रमाणात मदत झाली, असे सांगितले जाते.

NCLT ने अनिल अंबानी यांच्या रिलायन्स इन्फ्राटेल कंपनीसाठी एक रिजॉल्यूशन प्लॅन तयार केला होता. या योजनेंतर्गत मुकेश अंबानी यांच्या जिओने रिलायंस इन्फ्राचे जवळपास ४,४०० कोटी रुपयांचे असेट्स खरेदी केले होते.

डिसेंबर २०२० मध्ये मुकेश अंबानी आणि अनिल अंबानी यांच्यात व्यवहार झाला होता. हा व्यवहार झाल्यानंतर रिलायंस इन्फ्रा या कंपनीचे टेलिकॉम टॉवर आणि फायबर असेट्स जिओ कंपनीला मिळाले होते.

अनिल अंबानी यांच्या कंपनीवर कोट्यवधी रुपयांचे कर्ज असले तरी, आगामी काळात आम्ही बँकांचे पूर्ण कर्ज फेडू, असे आश्वासन कंपनीकडून देण्यात आले आहे. सन २०२१ च्या अखेरीपर्यंत कंपनीवरील सर्व कर्ज फिटलेले असेल, असे या कंपनीतील एका अधिकाऱ्याने सांगितले.

Read in English